Thursday, April 7, 2011

अगोरा

अनेक 'यशस्वी' चित्रपट पाहिल्यानंतर काय सापडतं? विशेषतः तो चित्रपट ऐतिहासिक काळातल्या घटनांवर बेतलेला असेल तर? आजही फार काही वेगळं दिसत नाही आणि मुळात मानवी स्वभाव बदलत नाही. भाषा, वेशभूषा, तंत्रज्ञान बदलतं पण स्वभावाला औषध नाही. जमावाला तुच्छतावाद शिकवला की सत्ता हस्तगत करता येते, असलेली सत्ता अबाधित राखता येते. दुसर्‍या जमावाला तुच्छ लेखण्यासाठी भाषा, धर्म, जात, प्रांतिक ओळख किंवा इतर काही मानवनिर्मित ओळख असेल किंवा वंश, लिंग अशी निसर्गनिर्मित असेल. 'अगोरा' हा अलेहांड्रो अमेनाबार या दिग्दर्शकाचा चित्रपट पाहून सर्वप्रथम आठवला तो वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळ्या जमावाप्रती दाखवलेला तुच्छतावाद.

चित्रपट घडतो साधारण इ.स. चौथ्या शतकात इजिप्तमधल्या, अलेक्झांड्रीया शहरात. रोमन साम्राज्याचा अस्त होण्याचा, पेगन पद्धती मागे पडून ख्रिश्चॅनिटीची भरभराट होण्याचा हा काळ! हायपेशिया ही तत्त्ववेत्ती चित्रपटातली प्रमुख व्यक्तीरेखा आहे. पेगन हायपेशिया खगोलशास्त्राची शिक्षिका आहे, तिचे वडील थिऑन हे अलेक्झांड्रीयाच्या पेगन ग्रंथालयाचे प्रमुख आहेत. पेगन आणि ख्रिश्चन समाजातही बुद्धीवादी थिऑन आणि हायपेशिया यांना मान आहे. सुंदर आणि तरूण हायपेशियाला लग्न करण्यात, व्यक्तीगत आयुष्यात फारसा रस नाही. सामाजिक आणि धार्मिक बदल घडत असताना एकीकडे आकाशातल्या ज्योतींबद्दलचे पारंपारिक विचार हायपेशिया तिचे तरूण, उच्चवर्गातील विद्यार्थी, ओरेस्टेस, सायनेसियस आणि तसेच गुलाम दावूस, इत्यादींना शिकवत असते. ओरेस्टेस आणि दावूस या दोघांचंही हायपेशियावर प्रेम असतं. ती, जशी आहे तशी, स्वीकारण्याची ओरेस्टसची तयारी नसते आणि दावूस जसा आहे तसा, स्वीकारण्याची तिची तयारी नसते म्हणून ती तत्त्वज्ञान आणि खगोलशास्त्र यांच्या अभ्यासालाच सर्वस्व समजते. टॉलेमीच्या विचारधारेवर विश्वास ठेवणार्‍या हायपेशियाच्या हार्मनीबद्दल वेगळ्या कल्पना नाहीत, प्राचीन ग्रीकांप्रमाणेच वर्तुळ हाच अचूक आकार आहे, यावर तिचाही विश्वास आहे. पण त्याही बरोबरच नवीन पद्धतीचा विचार विद्यार्थ्यांनी मांडल्यास, त्याचं स्वागत करण्यात तिला कमीपणाही वाटत नाही. आपल्या कामात गर्क असणार्‍या हायपेशिया आणि इतर बुद्धीवादी पेगन लोकांचा सामान्य जनतेशी फारसा संपर्क राहिलेला नाही.

एकीकडे ख्रिश्चन समाजाची वाढत्या ताकदीला सीरिल नामक धर्मगुरू उन्मादाचं रूप देण्यास सुरूवात करतो. त्याच्या नेतृत्त्वाखाली अनेक ठिकाणी ख्रिश्चन समाज पेगन देवतांची विटंबना करण्यात मग्न असतो. दुसर्‍या बाजूने अधिकाधिक लोकांना ख्रिस्ताचा करूणा, प्रेम, दया हा संदेश सांगूनही ख्रिश्चॅनिटीकडे ओढण्याचं कामही सिरील करत असतो. एका बेसावध क्षणी, पेगन धर्मगुरू आणि त्याच्या जोडीला ग्रंथालय प्रमुख, थिऑन, पेगन समाजाला देवतांच्या विटंबनाचा बदला घेण्यासाठी, पेगन समाजाला ख्रिश्चन समाजाविरूद्ध हत्यार उचलण्याची अनुज्ञा देतात. हायपेशियाचा हिंसेला विरोध मान्य करून तिचे अनेक विद्यार्थी या संघर्षापासून लांब रहातात तरीही ओरेस्टस पेगनांच्या बाजूने हत्यार उचलतो. ख्रिश्चनांची वाढती संख्या पाहून पेगन, सेरापियम या त्यांच्या ग्रंथालयाचा आश्रय घेतात. काही दिवसांनी रोमन साम्राज्याकडून पेगन लोकांना माफ केल्याचा हुकूमनामा येतो पण त्यांना त्यांचं ग्रंथालय, ग्रंथांसकट ख्रिश्चनांच्या हवाली करावं लागतं. ग्रंथालय सोडून पळून जाताना, हायपेशिया, थिऑन, ओरेस्टस आणि पेगन विद्यार्थी, जमतील तेवढे ग्रंथ आणि चीजवस्तू वाचवण्याचा प्रयत्न करतात. या गदारोळात हायपेशियाकडून दावूसचा अपमान होतो आणि ती ओरेस्टसच्या मदतीने महत्त्वाचे ग्रंथ घेऊन तिथून निसटते. पेगन विद्यार्थ्यांच्या हिंसेचा बदला सेरापियम नष्ट करून ख्रिश्चन लोक घेतात.

द्रष्ट्या नेतृत्वाच्या अभावामुळे सीरिलला पुढे महत्त्व मिळतं. त्याची भडकाऊ भाषणं आणि वागण्यामुळे बराचसा पेगन समाज ख्रिश्चन होतो आणि ज्यू समाज अलेक्झांड्रीयामधून हद्दपार होतो. सीरिलचा लोकसंग्रह आणि पाठींबा वाढतच जातो. तेवढ्यावरच सीरिल समाधानी नसतो. त्याला अलेक्झांड्रीयाचा सर्वेसर्वा होण्यात, स्वत:चं संपूर्णपणे निरंकुश साम्राज्य निर्माण करण्यातच रस असतो. दावूसबद्दल आपलेपणा वाटणारी हायपेशिया, ग्रंथालयातून निघून जाताना, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करते; ग्रंथ वाचवण्यासाठी, तिचा ओरेस्टसबरोबर जाण्याचा निर्णय संपूर्ण अलेक्झांड्रीयाचं, तिथल्या समाजाचं, कदाचित खगोलविज्ञानाच्या प्रगतीचं आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अस्तित्त्वाचंही भवितव्य ठरवतो का?

हायपेशियाचा रस फक्त खगोलविज्ञान आणि तत्त्वज्ञानात असतो. प्रयोगांची निरीक्षणं आणि त्यातून निघणारी अनुमानं जर टॉलेमी किंवा इतर कोणा ज्ञानी पूर्वसूरींच्या निष्कर्षांच्या विपरीत असतील तरीही त्या अनुमानांवर विश्वास ठेवणार्‍या हायपेशियाबद्दल आदर वाटतो. पण सामाजिक, राजकीय परिस्थितीचा अंदाज नसणारी हायपेशिया व्यक्तिगत निर्णय घेताना, गडबडीच्या क्षणी गुलामाला त्याच्या गुलाम असण्याची जाणीव करून देताना सामान्य वाटते; कदाचित आपल्या एका निर्णयामुळे सीरिलसारखा हिंसक, अविचारी धर्मगुरू जिंकला ही पराभवाची जाणीव तिला बरीच उशीरा होते.

असामान्य बुद्धीमत्तेचा लोकसंग्रहाशिवाय उपयोग होत नाही; समाजापासून बुद्धीवादी फटकून वागले, आपल्याच हस्तिदंती मनोर्‍यात ग्रह-तार्‍यांमधेच रममाण राहिले म्हणून सीरिलसारखा, लोकांना अज्ञानात ठेवणारा लोकसंग्रह करू शकला आणि त्या जोरावर ठोकशाही मार्गाने सत्ता हस्तगत करू शकला. चौथ्या शतकात (म्हणे) हायपेशियाला ग्रहांच्या दीर्घवर्तुळाकार कक्षांचा शोध लागला. दीर्घवर्तुळातली हार्मनीही* तिने शोधून काढली. पण गॅलिलेओपर्यंत भूकेंद्री विश्वाची संकल्पना सर्वत्र मान्य होती. १७ व्या शतकातल्या योहान्नेस केप्लरपर्यंत ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार असल्याचा समज होता. एक हजार वर्षांच्या अंधारयुगात वैज्ञानिक विचार आणि दृष्टीकोन मागे पडला, धर्मसत्तेचं समाजावर प्राबल्य राहिलं आणि उरला तो वेगवेगळ्या प्रकारचा तुच्छतावाद. आजही एकविसाव्या शतकात धर्म, भाषा, जातींच्या आधारावर हिंसा होते आणि त्याला समाजाच्या काही गटांमधून का होईना, पाठिंबा मिळतोच.

*दीर्घवर्तुळाच्या (ellipse) परीघावरील कोणत्याही बिंदूच्या दोन्ही नाभींपासूनच्या (foci) अंतराची बेरीज समान असते.

हा लेख इथेही प्रसिद्ध केला आहे, त्यावरचा हा प्रतिसाद वाचनीय आहे.

Thursday, February 24, 2011

नर्मदा बचाव आंदोलन: एक संवाद

१६ फेब्रुवारीला IISER (Indian Institute for Science Education and Research) पुणे इथे श्रीपाद धर्माधिकारी यांचं On Narmada Struggle and Beyond या विषयावर व्याख्यान होतं. श्रावण आणि मी तिथे गेलो होतो.

'नर्मदा बचाव आंदोलना'ची त्यांनी ओळख करून दिली. फक्त पाण्याच्या फुगवट्यामुळेच लोकं विस्थापित झालेले असं नाहीत तर १९६२ साली नेहेरूंचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी ज्या शेतकर्‍याची जागा 'तात्पुरती' घेतली ते कुटुंबही आज अनअफिशियली विस्थापितच आहे. (अशा छोट्या छोट्या गोष्टी मला माहित नव्हत्या.) ती जमिन परत मिळेल असं सांगून घेतली, पण ती तर जमीन गेलीच शिवाय कॉलनी उभी करण्यासाठी इतर सहा कुटुंब विस्थापित झाली. ही सुरूवात होती. पुढे काय काय घडत गेलं याचा घटनाक्रम त्यांनी सांगितला. फार तपशीलात आत्ताच शिरत नाही. आंदोलन सुरू झालं तेव्हा मी अक्षरओळख शिकत होते, त्यामुळे तुमच्यापैकी अनेक लोकांनाच माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. त्यामुळे त्यातले काही मुद्दे जे मला ठळकपणे आठवतात ते लिहीते.

१. आंदोलनाचा मुख्य हेतू - हा प्रकल्प देशाच्या भल्यासाठी आहे हे सिद्ध करा. सरकारची भूमिका - तुम्ही कोण हे विचारणारे?
२. आंदोलनाचा 'दुसरा' हेतू - प्रकल्पग्रस्तांना योग्य भरपाई, आणि प्रकल्पग्रस्त म्हणजे फक्त पाण्याच्या फुगवट्यात ज्यांची घरं, शेती जाणारे तेच नाहीत, तर ज्यांच्या उत्पन्नाचा स्रोत जाणार आहे ते सगळे. उदा: सरदार सरोवर ते अरबी समुद्र या भागातले, नर्मदेत मासेमारी करणारे.

काही प्रश्नोत्तरं:
१. आंदोलनाची सुरूवात १९८५ साली झाली तर न्यायालयात जायला नव्वडीचं दशक का उजाडलं?
आधी सरकारचा पाठपुरावा केला. पत्रं लिहीणं, मागण्या करणं या सगळ्यानंतरही जेव्हा धरणासाठी काम सुरू झालं तेव्हा प्रकरण न्यायालयात नेलं. बोलताना केलेली कमेंट, "न्यायालयात न्याय मिळण्याची शक्यता आत्तापेक्षा ८० च्या दशकात जास्त होती."
२. माहितीचा अधिकार ही अलिकडच्या काळातली गोष्ट आहे, तेव्हा धरणासंदर्भात माहिती कशी मिळवली?
With difficulty (माझे शब्द). काही सहानुभूती असणारे सरकारी कर्मचारी
३. रस्ते, रेल्वे बांधतात तेव्हा विस्थापित होतात, ते आंदोलन करताना दिसत नाहीत काय?
गावातल्या एका, काही शेताचा भाग जाणं वेगळं, त्याची भरपाई गावातूनच करता येते. धरण बांधतात तेव्हा संपूर्ण गावच पाण्याखाली जातं.
४. सरदार सरोवर तयार झालं आहे, धरण नकोच अशी भूमिका आधी आंदोलनाची होती. आंदोलन हरलं नाही का?
मूळ भूमिकाच पकडून ठेवायची तर हो. पण सामान्य खेडूतांना जिथे सरकारी कर्मचारी एका डेस्कावरून दुसर्‍या डेस्कावर नाचवत होते तिथे तेच सरकारी बाबू त्यांच्या पाठी पाठी यायला लागले. आंदोलनात स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. स्त्रियांचं सबलीकरण हे आंदोलनाचं आणखी एक यश.
५. श्रीमंत शेतकर्‍यांचा सहभाग
आर्थिक सहभाग होता, फार वेळ दिला नाही तरी!
६. धरण बांधता आलं नाही तर प्लॅन बी होता काय?
नाही. कधीच नव्हता. धरण बांधायची घोषणा १९६२ साली करून प्रत्यक्षात काम ८० च्या दशकात सुरू झाल्यामुळे स्वयंसेयी संस्थांच्या मदतीने अनेक खेड्यापाड्यांमधे छोटे बंधारे, रेन वॉटर हार्वेस्टींग सुरू झालं. गुजराथचं शेतकी उत्पादन २००९ साली ९.५% ने वाढलं आणि ती वाढ सौराष्ट्र आणि कच्छ या सेमी-आरीड भागांमधून झाली आहे. भूजल पातळीत २.५ पट वाढ झाली.
७. देशाच्या इतर भागांमधून आंदोलनात सहभाग कितपत होता?
बर्‍याच मोठ्या शहरांमधे आंदोलनाला पाठिंबा मिळाला. सौराष्ट आणि कच्छला पाणी मिळणार असा प्रचार गुजराथमधल्या पाठ्यपुस्तकांमधून होतो. त्यामुळे आंदोलनाला त्यांचा विरोध होता. पण साधारण १/४ सौराष्ट्र आणि कच्छचा १०% भाग यांनाच पाणी मिळणार होतं. त्यामुळे "आमच्या नावावर प्रचार करू नका" अशी मागणी त्या भागांमधूनही झाली.
८. आत्तापर्यंत हे आंदोलन अहिंसक पद्धतीने सुरू होतं, पुढे?
माहित नाही.
९. अलिकडे बातम्यांमधे नर्मदा आंदोलनाबद्दल ऐकायला येत नाही. अपडेट्स?
विस्थापितांचे प्रश्न सोडवणे, आणखी विस्थापन होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेतच.
आंदोलन २५ वर्ष सुरू आहे. न्यूज व्हॅल्यू फारशी नाही. एखादं आंदोलन किती वर्ष पहिली बातमी बनणार? (विनीलच्या अपहरणामुळे आत्ता फेसबुक वापरणारे आणि आदिवासी एकाच बाजूने बोलत आहेत. अजून काही महिन्यांनी?)

Wednesday, February 23, 2011

प्रिय विनील

ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र. त्यांच्या परवानगीनेच येथे प्रसिद्ध करते आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रिय विनील,

परवा मध्यरात्री एका जिल्हाधिकारी मित्राचा फोन आल्यापासून झोप उडालीय. म्हणाले, ‘माओवाद्यांनी विनीलला डिटेन केलंय’. फोन कलेक्टरांचाच असल्यामुळे बातमीची खातरजमा करण्याचा प्रश्नच नव्हता. मग निष्फळ फोनाफोनी सुरु झाली. काय झालंय हे समजून घेण्यासाठी फक्त. तपशील समजले. डिटेन नव्हे तर अपहरणच. पण उपयोग काय?

रात्री दोन वाजता एका मित्र एसपींचा (पोलीस अधीक्षक) फोन आला. माझ्याकडून त्यांना तपशील पाहिजे होते. मी काय कप्पाळ तपशील देणार? ते पूर्वी मलकनगिरीत एसपी होते. “कशाला असं सिक्युरिटी न घेता नक्षल भागात फिरता रे?” कळवळ्याने ते म्हणाले. त्यांची अस्वस्थता माझ्या लक्षात आली. तुझ्यावर सगळेच पोलीस वैतागले असले तर आश्चर्य नाही रे. तुझ्यावर आख्खी एस्टॅब्लिशमेंटच वैतागली असणार. अस्वस्थ करण्याची शक्ती घेऊनच जन्माला आलायस.

तू मयूरभंजमध्ये आयएएस प्रोबेशनर असतानाच एखाद्या कार्यकर्त्यासारखं स्वत:ला झोकून दिलं होतंस. मोटरसायकल घेऊन सिमलीपालच्या जंगलात वेळी-अवेळी एकटाच जायचास. आदिवासी पाड्यांवर फिरायचास. त्यांना जवळून बघायचास. त्यांच्यासाठी योजनांमध्ये, नियमांमध्ये अपवाद करण्यासाठी कलेक्टरांशी बोलायचास. आम्हाला सिमलीपाल दोनच गोष्टींसाठी माहीत होतं – पर्यटन स्थळ, आणि नंतर माओवाद्यांचा अड्डा. तू याच्या पलीकडे गेला होतास. वयाच्या पंचविशीतच. ही समज घेऊनच तू जन्माला आला होतास.

तुला एका ठिकाणी पोस्टिंग मिळालं, आणि त्याचवेळी कंधमाळमध्ये धार्मिक दंगली सुरु झाल्या. या दंगलींना आदिवासी विरुद्ध दलित असा कुठेही न सापडणारा रंग होता. सरकारला एक कलेक्टर, एक एस्पी आणि एक सबकलेक्टर हवा होता. टू फिक्स द थिंग. आणि चारच महिन्यांत तुला डिस्टर्ब करुन कंधमाळला पाठवला. तुम्ही तिघांनी तिथे अजोड कामगिरी केलीत. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा पूर्वग्रहही तुमचे काम झाकोळू शकला नाही.

मलकनगिरी जिल्हाधिकारी पदासाठी तुझी निवड झाली तेंव्हा बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले. एवढे चांगले काम करणाऱ्याला ही शिक्षा? हाच अनेकांचा प्रश्न होता. मलकनगिरीमध्ये कुणी पाय ठेऊ धजत नाही. नक्षलवाद्यांची अघोषित राजधानी. पण सुजाण मुख्यमंत्री इथे कर्तव्यकठोर अधिकारीच पाठवतात हे फार थोड्या जणांच्या लक्षात येते. तुझ्याअगोदर इथे नितीन जावळेंनी चांगल्या कामांचा पायंडा पाडून ठेवलेला होताच. तुझे ग्राऊंड बऱ्यापैकी तयार होते. तू त्यावर सुंदर बाग फुलवलीस. मलकनगिरीत आजमितीस तू जेमतेम एक वर्ष पूर्ण केलेस. लाल दिव्याच्या गाडीचे तुला कधीच आकर्षण नव्हते. मलकनगिरीत त्याची गरजही नव्हती तुला. नाडलेल्या आदिवासींना मदत करण्यासाठी तुला कशाचीच गरज नव्हती. मनासारखे काम करता येण्यासाठी तुला फक्त स्वातंत्र्य आणि एक यंत्रणा हवी होती. ती तुला मिळाली.

तुझ्या मनात या आदिवासींसाठी इतके प्रेम आहे की तुला भीती म्हणून काय ती नाहीच. या भागात दुसरा एखादा अधिकारी काय करेल? एकतर बाहेर पडायचे नाही. पडले तर हेवी सिक्युरिटी असल्याशिवाय नाही. आर ओ पी (रोड ओपनिंग पार्टी) आधी पुढे जाणार. लॅण्डमाइन्स तपासणार. साग्रसंगीत उपचार होणार. अर्धा दिवस त्यातच जाणार. मग आपलं भोज्जाला शिवून अधिकृत भेट उरकून अंधार पडायच्या आत आपल्या सुरक्षित ठिकाणी परत यायचं. पण तुझी रीतच न्यारी. तू आणि तुझा ड्रायव्हर. पीएसओ नाही, आरओपी नाही. हत्यार तर नाहीच नाही. जिथंपर्यंत गाडी जाईल तिथंपर्यंत जायचं. जिथं रस्ता संपेल तिथं तुला घ्यायला एखादा तहसीलदार, एखादा बीडीओ, एखादा इंजिनियर आलेला असायचा. मोटरसायकल घेऊन किंवा चालत. जेवण त्यांच्यासोबतच. सगळं एकदम शिवाजी महाराज स्टाइल. लोकांच्यात बसायचं. बोलायचं. आणि जे करता येण्यासारखं असेल ते लगेच करायचं. जे करता येण्यासारखं नाही, ते त्यांना समजावून सांगायचं.

हे एवढं आदिवासींसाठी खूप होतं. तू त्यांच्यासाठी वनवासात आलेला रामच जणू.

आदिवासी गांजलेले. एका बाजूने नक्षल. दुसऱ्या बाजूने पोलीस, सीआरपी. दोन्हीकडून मार. खायची मारामार. नक्षलवाद म्हणजे काय हे त्यांना कुठून समजणार? नक्षलींनी आदिवासींची पोथी बरोबर वाचलेली होती. त्यांची मनं जिंकायची त्यांना गरजच नव्हती. जे त्यांना जरा बरे वाटत, त्यांना ‘रिक्रुट’ करीत. बाकीच्यांचा काही फरक पडत नसे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी स्वत: त्यांच्या पाड्यावर येत असेल तर त्यांना तुझ्यात देव दिसल्यास नवल नाही.

हे आम्हाला आज समजलं. तुला नक्षलवाद्यांनी पकडून नेल्यावर ज्या गावातून तुला त्यांनी नेलं, त्याच गावातल्या आदिवासींनी उत्स्फूर्त मोर्चे काढले, तुला सोडावा म्हणून. सगळं मलकनगिरी बंद आहे आज. कुणीही न सांगता. तू याआधी काम केलेला कंधमाळ जिल्हाही बंद आहे. तोही तसाच. उत्स्फूर्तपणे. ज्या आदिवासींसाठी काम करत असल्याचा दावा नक्षल करतात, त्याच आदिवासींनी नक्षलांना ठणकावून सांगितले, आमच्या कल्याणाची काळजी असेल, तर अगोदर कलेक्टरांना सोडा. आम्हाला तेंव्हा कळलं, तू काय आणि कसं काम करतोयस ते. आज सगळ्या राज्यात निदर्शने चालू आहेत. कलेक्टरसाठी नाही, तर विनीलसाठी.

एक फार मोठा विरोधाभास आज लोकांना पहायला मिळाला.

कुडमुल्गुमा नावाच्या दुर्गम ब्लॉकमध्ये तू गेला होतास. जनसंपर्क मेळाव्यासाठी. तिथं जाणं सोपंही नाही, आणि शहाणपणाचंही नाही. रस्त्या-रस्त्यावर सुरुंग लागलेले असतात. तू गेलास ते गाव तर भलतंच कुप्रसिद्ध. हे कुडमुल्गुमा त्याच भयावह बालिमेडा जलाशयाच्या जवळ, जिथे दोन वर्षांपूर्वी जवानांनी भरलेली आख्खी बोट नक्षल्यांनी बॉंबहल्ल्याने बुडवली होती. हा ‘त्यांचा’ इलाका. पंधरा ग्रामपंचायती त्यांच्या. या भागात सरकारी माणसानं यायचं नाही. पोलीस, सीआरपी तर लांब.

तू इथे जायचास. एकदा नाही, दोनदा नाही, नेहेमी. खरं तर तू इथेच, १५१ गावांवर, कट ऑफ गावांवर, तुझं लक्ष केन्द्रित केलंस. तू जाऊ लागलास, आणि लोकांनाही वाटलं इथं काम होतंय. इथल्या लोकांनी एकदा मागणी केली, आम्हाला ब्लॉक ऑफिस लांब होतंय, तर तू थेट त्या गावांमध्ये गेलास, आणि ब्लॉक ऑफिस आठवड्यातून एक दिवस तिथे, असं खरंच चालू केलंस देखील. लोकांमध्ये जसजसा प्रिय होत गेलास, नक्षली वेट अॅण्ड वॉच करत राहिले असावेत बहुदा, तुझा आत्मविश्वास वाढत गेला. तुला सिन्सिअरली वाटत होतं, इथं सरकार पोचलं नाही म्हणून नक्षलवाद आला. आता तो घालवायचा असेल, तर सरकार तिथं गेलं पाहिजे.

विनील, ज्या दिवशी तू गेलास तो दिवस इदचा होता. सरकारी सुट्टीचा. तू सुट्टी न घेता काम करत होतास. भीतीने सुनसान ओस पडलेले रस्ते पार करून तू सिलेरू नदीच्या काठी गेलास. तिथून बोटीने नदी ओलांडून त्या गावी पोहोचलास. का, तर सरकार गावांत पोचलं पाहिजे यासाठी. शिबिर झालं. लोकांचे समाधान केलंस. वनाधिकाराचे दाखले वाटलेस. पेन्शन दिलीस. आवास योजनेचे लाभ दिलेस. मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला, “सर, इथे जनतापै गावात विद्युतीकरणाचं काम बघायला चला.” आणि तू विनाविलंब गेलासही. मोटरसायकलवर. सोबत फक्त दोन ज्युनिअर इंजिनियर घेऊन. जंगलात. खोल गुहेत जणू. जिथून परत आलेली पावलं दिसत नाहीत. तुझे एकूणच स्वयंसेवी संघटनांवर भाबडे प्रेम आहे. त्या लोकांनी तुला परत पाठवलेच नाही. एका इंजिनियरला परत पाठवले – असं सांगून की, ‘आम्ही सरांची काळजी घेतो, तू जाऊन सरकारला ही चिठ्ठी दे, सांग अठ्ठेचाळीस तास, आमच्या मागण्या आणि कलेक्टरचे प्राण.’ तुझे डोळे बांधून तुला चालवत सहा जण जंगलात घेऊन गेले.

आजही तुला चालवलंच जातंय. रोज वेगळ्या ठिकाणी. जागा बदलत. का, तर तुझ्या सुटकेसाठी सारं काही पणाला लावू पाहणाऱ्या आदिवासींनाही ते शक्य होऊ नये. असं म्हणतात की, त्यांनी आता मोर्चेबांधणीही केली आहे.

विनील, तू म्हणायचास, या लोकांसाठी काम करायला मला पाठवलंय, मी ते करतोय, हे लोक मला कसा काय अपाय करतील? तुझा विश्वासघात झाला दोस्ता.

आता आज बऱ्याच जणांच्या मनात काय विचार सुरू असतील ठाऊक आहे? ऐक.

विनिल, वेड्या, तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची? आम्हाला एकाच वेळी तू उत्तम अधिकारी, प्रशासक वाटतोस, आणि त्याच वेळी अविचारी साहसी आदर्शवादी तरुणही वाटतोस. तुला काय गरज होती तिथं जायची? पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला? एकतर तिथं जायचंच नव्हतंस. किंवा गेलास तर सुरक्षेचा जामानिमा घेऊनच जायचंस. वेडा. बेजबाबदार. अदूरदर्शी. असा कसा रे कलेक्टर तू?

हे आणि असंच बऱ्याच जणांच्या मनात येत असणार याची मला कल्पना आहे. हे असले प्रसंग तर होतच असतात असंही म्हणणारे महाभाग मला भेटले आहेत. विनायक सेनांच्या मानवी अधिकारांची चिंता वाहणाऱ्यांना तुझ्या मानवी हक्कांचा विचार करावासा वाटणारच नाही, कारण तू तर जालीम सरकारी व्यवस्थेतला बाबू! सरकारचा जावई! चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला वगैरे वगैरे. तुझ्यासाठी सरकार आकाशपाताळ एक करणार याची या विचारवंतांना पक्की खात्रीच. त्यामुळे ते आपली वाफ कशाला दवडतील?

पण मला काय वाटतं सांगू? तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस.

विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी.

तू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला.

तुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात.

आय सॅल्यूट यू, सर!

सचिन जाधव, आयएएस, ओरिसा.

सौजन्य - श्रावण मोडक.

Wednesday, January 26, 2011

असेही काही प्रवास.

"सह्ही, विमानाने जायचं तिकडे" इथपासून माझी उत्क्रांती "त्या अ‍ॅल्युमिनीयमच्या नळकांड्यात बसायचा मला भयंकर कंटाळा येतो" इथवर झाली. एकटीने विमान प्रवास करून झाला, सोबतीला पुस्तकं, विमानातली करमणूकीची साधनं, कधी सहप्रवाश्यांशी गप्पा असं करून फारतर अर्धा दिवस प्रवास करून इकडून तिकडे लवकरात लवकर पोहोचणे हे साध्य अनेकदा मिळवून झालं. भारतातून युरोपातला प्रवास फार्फार कंटाळवाणाच असायचा असं नाही, पण भारतातून निघताना बॉयफ्रेंडला सोडून जायचं म्हणून दु:ख असायचं आणि भारतात परत येताना एका घरातून दुसर्‍या घरात जाताना मधली गैरसोय नको असायची. शिवाय विमानात काही महान कॅरॅक्टर्स भेटायची, पण असे प्राणी समोर असताना कधीच विनोदी वाटले नाहीत. घरी पोहोचल्यावर गप्पा मारताना या प्राण्यांचे किस्से सांगताना मज्जा यायची हा भाग निराळा.

असंच एकदा ख्रिसमसच्या सुट्टीत मँचेस्टरहून मुंबैला निघाले होते. ऑमश्टरडॉमला (हा माझा डच उच्चार अ‍ॅमस्टरडॅमचा!) विमान बदललं. भारतीय लोकांची भरभरून सामानं नेण्याची सवय, त्यामुळे आपला लॅपटॉप आपल्या पायासमोर ठेवून झोपेचं खोबरं होईल याची भीती अशा सगळ्यामुळे मी नेहेमीप्रमाणे घाई करून लवकरच विमानात चढले. माझ्या थोड्या मागूनच एक साडी, कुंकू शेजारी येऊन बसलं. मला रेल्वेने जाताना रस्ता दिसला, विमानातून जाताना ट्रेन किंवा ट्रॅफिक जॅम दिसलं, बसमधून विमान दिसलं की भयंकर आनंद होतो. पण एकूण साडी-कुंकवाचे भाव पाहून समस्त गोर्‍या गर्दीत साडी-कुंकवाचा आनंद झाला नाही. नेमकं कुंकू अगदी जवळ उभं राहिलं तेव्हा मी हात सैलावून आळस देत "आई गं" म्हटलं आणि साडी-कुंकू एकदम मराठीतच गप्पा मारायला लागलं. दोनच मिनीटांत काकू नाशिकच्या आहेत, (अमेरिकेत हो!) मेंफिसला एक मुलगी 'दिलेली' आहे, ही माहिती मिळाली; 'हिरवा माज' जी संज्ञा तेव्हा माहित नव्हती तरी आपली मुलगी अमेरिकेत असल्याचा रंगांधळा माज दिसलाच. काकूंनी लगेच माझीही माहिती काढून घेतली. मी पीएच्.डी. करते आहे हे ऐकल्यावरतर आपली मुलगीही कशी पीएच्.डी. करणार होती, पण चांगलं स्थळ आलं म्हणून तो विचार सोडून दिला, असं सांगून "हं, तुमच्यासारख्या पीएच्ड्या कोपर्‍याकोपर्‍या मिळतात" असं दाखवत, मी मनातल्या मनात त्यांचा उल्लेख साडी-कुंकू केल्याचा बदला घेतला. पण थोड्याच वेळात हा माजुरडा 'हरी' अडल्यामुळे म्या गाढवाचे पाय धरणार होता हे दोघींनाही माहित नव्हतं.

विमान सुटायच्या आधीच काकूंनी आपला रिलायन्सचा मोबाईल मला दाखवून पुन्हा एकदा शाईन मारली. रेडीओ अ‍ॅस्ट्रॉनॉमर मालकिणीच्या भीतीमुळे माझा फोन पाच तास आधीच गजर म्हणून आपली ड्यूटी करून झोपला होता. पण हाय रे कर्मा, काकूंना टावर नव्हता. मी (उगाच) औदार्य दाखवून, माझा फोन सुरू केला आणि काकूंच्या नाशकातल्या मुलांना एसेमेस केला आणि फोनला पुन्हा झोपवला. थोड्याच वेळात आमचं विमान शब्दार्थाने हवेत गेलं आणि मग ट्रॉल्या विमानात खडखडायला लागल्या. आमच्या दोनच ओळी पुढून पेयपान द्यायला सुरूवात झाली. बालपण आणि म्हातारपण एकसारखंच, याचा एक अनुभव लगेच मला आला. काकूंनी पाच मिनीटांचीही प्रतिक्षा न करता आधीच केबिन-क्रूला हाक मारून ऑरेंज ज्यूस मागवायचं ठरवलं. आलेली बाई अमेरिकन होती, तिने तिला झेपेल तेवढ्याच नम्रपणे काकूंना काय हवंय ते विचारलं. काकूंनी लगेच त्यांच्या फर्ड्या तर्खडकरी (!) इंग्रजीत आपल्याला ऑरेंज ज्यूस हवं आहे असं फर्मान सोडलं. अमेरिकन बाई आणि नाशिकची काकू यांच्यात बराच वेळ चर्चा झाली, जी मला थोड्या वेळाने असह्य झाली. मी आपलं जमेल तशा इंग्लिशमधे अमेरिकन मडमेला काकूंची विनंती कळवली आणि तिनेही अमेरिकनमधे 'अच्छा असं आहे होय' म्हणत 'हां, आम्ही येतोच आहोत सगळ्यांना पेय्यपान देत' असं म्हणत पतली गली पकडली. "असा मी असामी"मधला शंकर्‍या परवडला पण काकू नको अशी अवस्था व्हायला ही तर फक्त सुरूवातच झाली होती.

पेय्यपान झालं, खानपान झालं आणि पुन्हा चहा-कॉफी फिरायला लागली. काकूंनी पुन्हा एक ऑरेंज घेतलं. मी तोपर्यंत थोडीबहुत युरोपाळलेली असल्यामुळे कॉफी घेतली. इंग्रज लोकांना कॉफी बिल्कुल बनवता येत नाही याचा पुरावा मिळाला, पण चांगल्या अर्थी. अमेरिकन विमानात कॉफीमात्र लै भारी होती. अगदी पहिला घोट तोंडात गेल्यागेल्याच मी "वाह, काय कॉफी आहे" असं अगदी अभावितपणे म्हटलं. ही पुढल्या "संकटाची" नांदी होती. "हो का? कॉफी खूप चांगली आहे का?", हातातला ऑरेंज ज्यूसचा ग्लास रिकामा करत काकू किणकिणल्या. लगेचच हातातलं केक्रूला बोलावण्याचं बटण दाबून काकू मोकळ्या. पुन्हा तीच अमेरिकन आजी आली. पुन्हा तेच इंडियन आणि अमेरिकन इंग्रजी भिडलं आणि मला असह्य झाल्यानंतर पुन्हा एक इंग्लिश-टू-इंग्लिश भाषांतराचा क्षीण प्रयत्न मी केला. थोडक्यात काकूंना कॉफी हवी होती आणि माझी कॉफी संपायच्या आत ती आलीही. पहिलाच घोट काकूंनी घेतला, "शी! ही काय कॉफी आहे काय? कॉफी कशी, एकदम लाईट, गोड आणि छान जायफळ आणि दूध घालून केलेली असली पाहिजे." बेशुद्ध पडल्यामुळे मीच माझी चप्पल तोंडात मारून घेतली. पण थोड्याच वेळात ती कॉफी बेकार असल्याचा अनुभव आला, काकू झोपल्या आणि अघोर सप्तकात त्यांनी घोरायला सुरूवात केली. मी अधूनमधून पुस्तक, डुलक्या आणि 'नमस्ते लंडन' का कायसासा पिक्चर पहात वेळ काढला. काकूंना जाग आली तेव्हा आमचं विमान साधारण तेहेरानच्या वरून उडत होतं. "मुलाकडून त्या एसेमेसचं उत्तर आलंय का पहा बघू?" काकू विमान मुंबईला पोहोचल्याच्या आनंदात का होत्या मला कळलं नाही. पण मला पडलेला हा प्रश्नच चुकीचा होता. "काकू, आत्ता कसं पहाणार? मुंबैला पोहोचायला खूप वेळ आहे अजून." कम्युनिकेशन ब्रेकडाऊनचा पुरेपूर अनुभव मी घेत होते. "अगं पण त्याचा एसेमेस आला नसेल तर त्याला पुन्हा फोन करता येईल ना, मुलगा आत्ताच निघाला तर वेळेत पोहोचेल ना मुंबईला." काकूंचं विमान हवेत होतं का विमान हवेत गेल्यानंतर काय शिस्त असते हे काकूंना माहित नव्हतं हे मला अजूनपर्यंत समजलेलं नाही. खुद के साथ बातां: थेरडे, तू मरायला तयार झाली असलीस तरी मी अजून गोवर्‍या नाही मोजायला घेतलेल्या! पण हे मनातच ठेवून, शक्य तेवढं हसू तोंडावर आणत "काकू, विमानात नाही हो फोन लावता येत." काकूंना माझी कांकू का सुरू आहे हे समजत नव्हतं. "पण मी उठते की, मग तुला उठून लावता येईल फोन." माझा फोन वरच्या हेडलॉकरमधे आहे म्हणून मी नाही म्हणते आहे या समजूतीत काकू होत्या, हे मला तेव्हा कळलं. "नाही हो, तसं नाही. विमानात मोबाईल वापरायला बंदी असते.", आता मात्र मी त्यांच्या अज्ञानाचा पुरेपूर फायदा उठवायचं ठरवलं. "मी इथे फोन सुरू केला आणि त्यामुळे विमान बदकन खाली पडलं तर?" मग हा आग्रह झाला नाही.

अजून थोडा वेळ थोडा शांत गेला आणि मला खिडकीतून बाहेर भास होताहेत असं वाटलं. आधी वाटलं पंखावरच्या दिव्याचा प्रकाश ढगांवरून (उनिकोदात केल्यासारखा) परावर्तित होतो आहे. पण नंतरमात्र फार वेळ न घेता ट्यूब पेटली, बाहेर वीजा चमकत होत्या. विमानाच्या प्रवासमार्गाकडे नजर टाकली तर वैमानिकाने थोडा लांबचा रस्ता घेतला आहे आणि पोहोचायला थोडा उशीर होईल हे पण कळलं. हातात कॅमेरा होता, पण फार चांगले फोटो आले नाहीत. पण वीजांच्या उंचीवरूनच त्यांच्याकडे पहाण्यात फार जास्त गंमत नाही आली, एक वेगळा अनुभव एवढंच. विजा थोड्या मागे पडल्यावर वैमानिकाने मार्ग थोडा बदलायला लागला आणि अर्धा तास उशीर होईल असं जाहिर केलं. काकूंना अर्थातच इंग्लिश समजत नसल्यामुळे "अर्थातच" भाषांतराची जबाबदारी माझ्यावर पडली. सांगितल्यावर "का? जायचं ना विजांमधून? आपलं विमानतर एवढं मोठं आहे की!" हे ऐकल्यानंतर काय झालं हे मला नीटसं आठवत नाही. एकतर मी बेशुद्ध पडले असणार किंवा मी सरळ दुर्लक्ष केलं असणार, पण त्यानंतरमात्र मी विमानातून उतरेपर्यंत मुकीबहिरी असण्याची भूमिका वठवत होते; कोण या वठल्या खोडाशी पंगा घेणार?

हा सगळा अनुभव काही वर्षांपूर्वीचा. आता मी थोडी मोठी झाले आहे (असं आपलं म्हणायचं म्हणून म्हणायचं)! काहीही का असेना, अशी विसंवादी पात्र दिसली की फारवेळ राग रहात नाही, मला या सगळ्याची गंमत वाटायला लागते. "येवढा लांब प्रवास, नको, कंटाळा आला" इथपासून "ठीक आहे, चोवीसच तास लागतात अमेरिकेतून भारतात पोहोचायला!" इथवर आता उत्क्रांती झाली आहे. आजूबाजूच्या अनेक गोष्टींची मौज वाटण्यामुळेही हे शक्य असेल. अलिकडेच ऑस्टीनहून मुंबईला आले तेव्हा या सगळ्याची हद्दच झाली. दोन ठिकाणी विमानं बदलून यायला लागलं आणि तिन्ही विमानं अगदी स्पेश्शल होती. पहिलं होतं ऑस्टीन ते ह्यूस्टन, अगदीच छोटा प्रवास आणि विमानही तसंच लहान! अगदी माझी वामनमूर्ती प्रवासाच्या शेवटी उठून उभी राहिल्यावर डोकं आपटावं एवढं छोटं विमान होतं. ओघळलेल्या, कुरूप जाड्या लोकांच्या अमेरिकेत असलं विमान बनवलं, चालतं याची मला मजा वाटली. गरीबांचं दुकान म्हणून प्रसिद्ध असणार्‍या वॉलमार्टात दिसणारी ओथंबलेली जाडी माणसं या विमानातून जायला लागली तर काय दंगा होईल ना असा "दुष्ट" विचार माझ्या डोक्यात डोकावून गेलाच. ह्यूस्टन विमानतळावर उतरायच्या अगदी थोडं आधी मला दुसरं एक विमान धावपट्टीवर उतरताना दिसलं हा अनुभवही मस्तच होता. पुढचा टप्पा होता पॅरीसपर्यंत. जानेवारीचा मध्य उलटून गेलेला, बुधवार, अशा दिवशी विमानात किती कमी गर्दी असू शकते याची कल्पना मला आधी आलीच नाही. वेळेच्या बरीच आधी मी गेटवर जाऊन बसले होते. आता गर्दी वाढेल, नंतर वाढेल असा विचार करेपर्यंत विमानात चढायची वेळही झाली. लहान मुलं बरोबर असणारी कुटुंब, व्हीलचेअरची गरज असणारे लोकं विमानात गेलेही. आणि सूचना झाली, आता इतर सगळ्यांनी विमानात चढा. माझ्यासकट अनेकांना कळलंच नाही, "म्हणजे एवढे सगळे एकत्र गेले तर गर्दी नाही का होणार?" अजिबात गर्दी झाली नाही, विमान पंचवीस टक्केच भरलं असेल जेमतेम, कुठून होणार गर्दी? माझी जागा खिडकीत होती, आणि शेजारी कोणीच नाही. तंगड्या पसरून विमानात बसायला मिळण्यात किती सुख असतं हे काय सांगणार? पण सुख टोचतं म्हणतात, एवढी जागा असून मी आख्खा प्रवासभर जागीच होते. हरकत नाही, पॅरीस-मुंबै असा आठ तासांचा प्रवास बाकी होता आणि त्यासाठी फार वेळ विमानतळावर थांबायला लागणार नव्हतं.

पुन्हा एकदा सगळे सोपस्कार करून मुंबैला जाणार्‍या विमानाच्या रांगेत मी उभी राहिले. लॅपटॉप ठेवायला वरच्या लॉकरमधेच जागा मिळाली, माझी खिडकीची सिट मिळाली, आता मस्त ताणून देऊ या म्हणून विमानाचे दरवाजे बंद करायच्या आधीच मी थोडी सैलावले तर कोणीतरी जोरजोरात बोलत आहे, हसत आहे असं ऐकायला आलं. मला आधी वाटलं की इथे आख्खा ग्रूप आलाय का काय तामिळ लोकांचा, म्हणून पाहिलं तर एक पोट्या, मध्यमवयीन, मुछ्छड आपल्याकडे मोबाईल असल्याची क्षीण, छे छे, साऊथ इंडीयन पिक्चर्सप्रमाणे लाऊड जाहिरात करत होता. त्याला त्याचं भलंथोरलं सामान वर ठेवायला जागा नव्हती म्हणून का काय आख्ख्या विमानभर फिरून त्याने सगळ्यांना तामिळमधून गडगडाटी हसूनही दाखवलं. इंग्लिशमधे obnoxious कशाला म्हणतात असं विचारलं तर मी नक्कीच त्याच्याकडे बोट दाखवलं असतं. आता हे कमी होतं का काय, हा mustachio माझ्याच शेजारी, एक सीट सोडून बसला. बाप रे, आता हा लाऊड माणूस सहन करायचा? झोपमोडतर झालीच होती. मी आधी नक्कीच वैतागले होते. विमान हवेत गेलं, समोरच्या टीव्हीवरचे कार्यक्रम सुरू झाले आणि हे भाई एकदम टाळ्या-बिळ्या वाजवायला लागले. एकदा झालं, दोनदा झालं आणि माझा राग थोडाही निवळला होता. मला भयंकर उत्सुकता होती, हा माणूस काय पहातोय काय? मला पण पहायचा आहे तोच कार्यक्रम! 'दबंग' एकदा पाहून झाला होताच. म्हणून डोकावून पाहिलं तर कळलं पर्‍याची आणि याची आवड एकच होती. ट्वायलाईट-एक्लिप्स पहात हा भाई हिरविणीचा क्लोजअप आला की टाळ्या मारत होता. हा मात्र कहर होता (अशी माझी तेव्हा समजूत झाली). थोडा वेळ पाहू या आणि नाहीच बंद झालं तर सांगू या, असा विचार करून मी पुन्हा एकदा मुन्नीची बदनामी पहायला लागले. थोड्याच वेळात जेवण आलं, आणि शेजारच्या अण्णाने दोन बाटल्या वाईन मागून घेतली. आता मात्र माझा मांजर स्वभाव पुरता जागृत झाला. याने आपला ट्रे बाहेर काढला, एअर होस्टेसने आधी एक बाटली दिली, ती याचं जेवण ट्रेवर ठेवते तोपर्यंत बाटलीतले एक-दोन घोट कमी झाले होते. याने आणखी एक बाटली मागून घेतली आणि नंतर आठवण झाल्याप्रमाणे ग्लास मागितला. बाटलीच तोंडाला लावून वाईन पिण्याचा प्रकार पाहून माझ्या रक्तवारूणीप्रेमी मनाला मणमण यातना झाल्या. पण या यातना फार काळ टिकणार नव्हत्या. अण्णाने चटचट खाणं आणि पिणंही आटपलं आणि अगदी पापणी लवतेय असं वाटावं एवढ्या वेळात झोपला. नुस्ताच झोपला नाही तर अगदी, एकदम पक्का डावा होऊन झोपला. "छ्या, करमणूकीसाठी आता पुन्हा सलमान खानला पहावं लागणार" असा विचार करून मी पुन्हा 'दबंग' लावेपर्यंत खाण्याचे ट्रे गोळा करायला केक्रू आलाच. आता या अण्णाचं डावे 'आचार' विमानाच्या येण्याजाण्याच्या रस्त्यामधेच आल्यामुळे केक्रूने त्याला बाजूला होण्याची विनंती केली. हा झोपला आहे असा विचार करून त्या भल्या बाईने त्याला सरळ करायचा प्रयन्त केला तर डावेभाई एकदम उजवेच झाले. मध्यमवय असलं तरी मध्यममार्गाचं त्याला वावडं असावं. मला या सगळ्याच प्रकाराची गंमत वाटत होती. आतली प्रेरणा, हवेतला टर्ब्युलंस अशी बाहेरची संप्रेरकं, आणि लोकांचं जाणंयेणं यामुळे अण्णाला आपण डावे आहोत का उजवे हे धड समजत नसावं.

विमानात मला खूप तहान लागते. म्हणून विमानात चढायच्या आधी, जेवताना असं मिळून मी लिटरभर पाणी रिचवलं होतं, ते थोड्या वेळाने आतून हाका मारायला लागलं. आता आली ना पंचाईत! सेतू बांधून रामाने म्हणे पाल्कची सामुद्रधुनी ओलांडली पण कलियुगातल्या या विमानात मी चढलेल्या माणसाला कुठे चढून ओलांडायचं हे मला समजेना. केक्रूला बोलावून माझी अडचण सांगितल्यावर त्यांच्याकडे उत्तर तयारच असावं. तिने जाऊन दुसरीलाही बोलावलं. मला सीटवर उभं करून या दोघींनी माझे हात पकडले. दोन्ही हात पसरून दोघींनी पकडलेले आणि मी सीटवर उभी यामुळे मी एकदम येशुख्रिस्त दिसत असणार या विचाराने मला हसूच आलं, पण पोटातलं पाणी फारच हाका मारत होतं. मग क्षणार्धात येशूची सुपरमॅन होऊन मी चालत्या विमानात सूर मारून अण्णाची लक्ष्मणरेषा ओलांडली. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे काय असतं याची मला तेव्हा चांगलीच कल्पना आली. म्हणजे बोलायला ठीक आहे हो, मी मुक्त स्त्री आहे वगैरे! पण प्रत्यक्षात मुक्तीची वेळ आली तेव्हा या दोन इतर मुक्त स्त्रियांचं सहकार्य मागावं लागलंच की! थोडा वेळ बाहेरच उभी राहिल्यावर पुन्हा जागेवर जाऊन बसावं असा विचार केला आणि आता मात्र माझ्या अंगात स्पायडरमन संचारल्याच्या थाटात मी एकटीच दोन शिटांच्या हँडरेस्टचा वापर करून जागेवर आले. या सगळ्या 'क्लायमिंग'च्या प्रकारात अण्णाची थोडी उतरली असावी असं मला वाटलं. कारण आता त्याने पवित्रा बदलला, पसरलेले पाय आवरले आणि समोरच्या सीटपॉकेटमधे खुपसले. माझ्याकडे खिशात ठेवण्याएवढा छोटा कॅमेरा नाही याचं दु:ख मला अनेकदा होतं, त्यातलाच हा एक प्रसंग! 'टॉम अँड जेरी'ची डायहार्ड फॅन असल्यामुळे मी लगेच ते सीट पॉकेट फाटायला लागलं तर काय होईल, किंवा समोरची सीटच खाली यायला लागली तर काय होईल असे सगळे विचार मनातल्या मनात करून झाले. आतापर्यंत विमान भारताच्या हद्दीत आलेलं होतं. लँडींगच्या सूचना होत होत्या. केक्रू प्रत्येकाचे सीट बेल्ट्स पहात होते. अण्णाला इतर काही शुद्ध नव्हतीच तर सीटबेल्टची पर्वातरी त्याने का करावी? त्या भल्या बाईने याचा सीट बेल्ट लावेपर्यंत अण्णा बराच जमिनीवर आला होता. विमान जमिनीवर आल्यानंतर काही मला उड्या माराव्या लागल्या नाहीत. मुंबई विमानतळावर सामानाची वाट पहात असतानाच एकाने जवळ येऊन "तुला सीटवरून उडी मारताना भीती वाटली नाही का" असं विचारलंच. मुक्ती आणि स्वातंत्र्यासमोर या असल्या गोष्टींची भीती वाटत नाही असा ड्वायलाक डोळा मारतच मी मारल्यावर माफक हशा पिकला.

"चला पोहोचले एकदाची" असा विचार येतोच आहे तेवढ्यात आठवलं, फेब्रुवारी आणि मार्चमधे एकेक कॉन्फरन्सेस आहेत आणि ट्रेनने पुण्याहून तिथे पोहोचायला आख्खा एक दिवस लागेल. त्यामुळे बहुदा पुन्हा वाढलेल्या पगाराचा माज विमानप्रवासातून दाखवून होईलच. नाही, आणखी एक लंबंचवडं ब्लॉगपोस्ट टाकण्याची ही धमकी नाही.

Tuesday, December 14, 2010

AIPS

Here are some tips while installing AIPS on Ubuntu and Kubuntu systems. I got stuck with AIPS for quite some time. These are there mainly for myself but anybody is free to use these. Also if there is anymore to add to these, please comment here itself.

1. Create directory /home/aips

2. Give proper permissions to the user (in my case sanhita is the user):
a. chgrp -R sanhita /home/aips
b. chown -R sanhita /home/aips

3. Install 'cvs' on the machiene. I used 'apt-get install cvs' command for the same.
3a. Install gfortran, if you do not have it and if you are going to compile AIPS.

4. Download install.pl which is the install wizard, from the AIPS (CLASSIC) website. Keep it at /home/aips/install.pl
a. Change the permissions of the file using
chmod u+x install.pl

5. Run install.pl using ./install(dot)pl. It will many questions during that. The main answers are:
a. The home area for aips is /home/aips
b. The data area is /home/aips/DATA/LEELA_1 (LEELA is my machiene name). More areas can be added to this after editing the file /home/aips/DA00/DADEVS.LIST
c. Which processor/system does one have, e.g. Linux or LNX64 (64-bit linux)

6. Keep hitting enter once the questionaire is complete. Do give the email address as courtesy when asked for cvs password.

7. If asked 'AMANAGER' is another password.

8. If you get the following error:
START_AIPS: AIPS_ROOT is not a directory; cannot start AIPS.
the solutions can be:
a. Check the file called /home/aips/LOGIN.SH or /home/aips/LOGIN.CSH
and/or
b. /home/aips/START_AIPS
and check what is the AIPS_ROOT area. It should be /home/aips.

In my installation the file START_AIPS had the AIPS_ROOT area defined as /home/AIPS. That was breaking it. Once that was fixed, it worked fine.

Have fun AIPSing! Let me get back to AIPS now to make a linear polarization map of NGC 253 at 610 MHz.

Tuesday, July 6, 2010

'बाईमाणूस' वाचताना

सध्या 'बाईमाणूस' नावाचं करूणा गोखले यांचं पुस्तक वाचते आहे. पहिला धडा वाचून फारसं आवडलं नव्हतं तरीही ते पुन्हा उघडलं. आणि पुढचे धडे/निबंध आवडले. (संपूर्ण वाचून, पचवून होईल तेव्हा पुस्तकावर सविस्तर लिहायला मला आवडेल.) त्यातले काही विचार अगदी फारच आवडले (माझ्या शब्दांत):

स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रियांनी पुरूषांची बरोबरी करणं नव्हे! पुरूषांनी सुरू केलेला / ठेवलेला भेदाभेद, भांडणं, हिंसा, युद्धं स्त्रियांनीही करणं स्त्रीमुक्तीला मान्य नाही.
राजसत्तेपेक्षा जास्त प्रभावी आणखी एक संस्था कार्यरत होती, पुरूषसंस्था; स्त्रियांचं शिक्षण सुरू झाल्यावरही फार पुढे गेलं नाही कारण ही दुसरी सत्ता!
खरे स्त्रीमुक्तीवाले स्त्रीच्या मातृत्त्व, वात्सल्य यांना स्त्रियांचे 'दुर्गुण' समजत नाहीत. इ.इ.

पुस्तक आता खूपच चांगलं वाटत आहे; 'बड्डे गिफ्ट्स' काय आणायची याची चिंता आणखी कमी झाली! ;-)

अवांतरः विषमता आपल्या सगळ्यांमधेच किती भिनली असावी?
मागच्या आठवड्यात लंचटेबलवर मी पोहोचले तर 'देव' या न संपणार्‍या विषयावर चर्चा सुरू होती. मी तिथे गेले आणि काय चर्चा सुरू आहे याचा कानोसा घेतला. सगळ्यांनी माझ्याकडे "माझं मत काय?" अशा चेहेर्‍याने बघायला सुरूवात केली.

Me: What are we talking about?
Reply: About existence of God.
Me: About what??
Reply: About God.
Me: About whom??
Reply: About God ...
Me: About whom??

आणि अजून दोन-चारदा मी तोच प्रश्न विचारल्यावर माझा प्रतिसाद 'पोहोचला'.
अर्चना, एक मल्लू मुलगी, सध्या इंजिनियरींगच्या तिसर्‍या/चौथ्या वर्षाला आहे, ती इथे ट्रेनी म्हणून आली आहे. घरातून पहिल्यांदाच एकटी बाहेर पडली आणि आमच्या या अजब-प्राणी-संग्रहालयात येऊन पडली आहे. ती हिरीरीने मला समजवायचा प्रयत्न करत होती, देव आहे म्हणून! माझा तोच प्रश्न, "नक्की कोण आहे?"
शेवटी ती लेक्चर्सची वेळ झाल्यावर गेली. आणि नंतर माझी चौकशी माझी मैत्रिण आहे, आरती, तिच्याकडे केली. आरतीकडून कळलेले अर्चनाचे उद्गार, "म्हणजे, तिचं लग्नं झालंय? एक लग्नं झालेली मुलगी असून तिचा देवावर विश्वास नाही!?!"

अजूनही यावर हसावं का रडावं मला समजलेलं नाही.

Tuesday, February 9, 2010

प्रवास

दर वेळी असंच होतं, जी.एम.आर.टी.ला जायचं असलं की मी कुरकूर करायला सुरूवात करते. "कशाला जायचं तिथे?", "त्रास आहे रे, उद्या ग्मर्टला जायचं आहे. सक्काळी सक्काळी उठून तिकडे जायचं, तिकडचं जेवणही मला आवडत नाही." असं काही नेहेमीच होतं. पण आलिया भोगासी म्हणून सकाळी सहाचा गजर लावून सव्वासहापर्यंत मी उठते. अर्धवट झोपेत, आवश्यक अशा अर्ध्या महत्त्वाच्या गोष्टी घरात किंवा ऑफिसातच विसरून मी बसमधे बसते आणि बस सुटायच्या आधीच माझा डोळा लागतो.

जाग येते तर बस बहुदा ऑफिसाच्या गेटपाशी असते आणि पुन्हा डोळा उघडतो तर इंद्रायणी जवळ आलेली दिसते. श्वासात बराच जास्त ऑक्सिजन आहे हे जाणवतं आणि खूप छान वाटतं. चाकण आल्याची चाहूल लागते आणि मला सगळ्यात पहिले आठवतात ते चाकणचा भुईकोट किल्ला आणि फिरंगोजी नरसाळा. हा किल्ला बघण्याचा प्रयत्न मी अजूनही केला नाही आहे, पण तरीही ठाण्याचा किल्ला(/तुरूंग) बाहेरून पाहिलेला आहे त्याची आठवण होते. पण त्याहीपेक्षा जास्त आठवतो तो फिरंगोजी नरसाळाच; तो कसा दिसत असेल कोण जाणे, पण त्याच्यासारख्या वीरांमुळे आज माझं आयुष्य चांगलं झालं आहे याची जाणीव होते, मी दगड नाही, मलाही भावना आहेत याची किंचित कल्पना येते. बस तशीच पुढे जात असतेच आणि विचारांमधून बाहेर येईपर्यंत भामा येते. या भामेच्या तीरावरच्या भाममधे मी एकदा मिसळ खाल्ली होती. जी.एम.आर.टी.च्या स्टाफमधल्या एक इंजिनीयर आहेत, त्यांनी आपुलकीने मला मिसळ खायला लावली होती, तेव्हापासून आमची मैत्री झाली ती झाली. भामा ओलांडली की लगेच एक सुंदर, सुशोभित कँपस दिसतो, ही आहे कांदा-लसणीवर संशोधन करणारी संस्था! लगेचच भीमेवरचा पूल दिसतो आणि येतं राजगुरूनगर ... खेड! कोवळ्या वयात देशासाठी जीवाची आहुती देणार्‍या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरुंपैकी, राजगुरूंचं गाव! त्यांच्या नावाचं कॉलेज दिसतं, एस.टी. स्टँडबाहेरचा त्यांचा पुतळा दिसतो आणि वाटतं, किती फालतू गोष्टींचा आपण मोठा इश्यू बनवतो. कोवळ्या वयात फाशी गेलेल्या राजगुरूंबद्दलचा आदर दरवेळी वाढतच जातो. आणि समोर दिसतो एक बकाल नाला आणि एक देशी दारूचा गुत्ता ... संताप होतो, पण आपण काही करू शकत नाही याची जाणीव जास्त टोचते.

पण हे सह्याद्रीचं सौंदर्य असं आहे की सगळं विसरायला होतं. पुणे-नाशिक रस्त्यावर आधी खेडची घाटी लागते. रस्त्यावरची वळणं, आडदांड सह्याद्री आणि त्याच्या कुशीतला पाझर तलाव कितीही वेळा पाहिला तरी समाधान होतंच नाही. पुढे एक अवसरीची घाटीही येते, आणि तिथली झाडं पाहून सरळ बसमधून उडी मारावी आणि झाडाखाली शांत बसावं, थोडा विचार करावा, थोडं काम करावं, थोडं भटकावं आणि दमून एखाद्या झाडाखालीच पसरावं अशी इच्छा वारंवार होते. मग मात्र मी घाबरून गाणं कोणतं सुरू आहे वगैरे विचार करते. उगाच उडी-बिडी मारली तर, अशा वेळी माझा स्वतःवरच विश्वास नसतो. या सगळ्या घाट्यांमधे मला आवडतो तो चंदनापुरीचा घाट! अरेरे, जी.एम.आर.टी.साठी त्याच्या आधीच वळतो. एकदाच हा घाट पाहिला, पण राकट सौंदर्य म्हणजे काय तर आता मला चंदनापुरीचा घाटच आठवतो. नाशिक रस्त्याला आळेफाटा मागे टाकून संगमनेरकडे गेलं की हा घाट मधे येतो. एखादा नाकी-डोळी नीटस, सावळासा तरूण, जो शारिरीक श्रमाच्या कामांमुळे आखीव-रेखीव आहे, आणि मुळचा गव्हाळ वर्ण आता उन्हामुळे रापून तांबूस-सावळा झाला आहे, असं काहीसं या घाटाकडे पाहून मला वाटलं. हा घाट 'आवडला'... अगदी तस्सा आवडला. आधी खेड घाट मला आवडायचा, पण चंदनापुरीचा घाट पाहून ते आवडणं वेगळं आणि हे वेगळं असं काहीसं वाटतं. खेड घाटातलं सौंदर्य वेगळं आणि चंदनापुरीचं वेगळं. आणि हे चंदनापुरी नावसुद्धा मला एवढं आवडतं की हा आखीव-रेखीव तरूण अचानक बसून गणित, भौतिकशास्त्र किंवा अर्थशास्त्रावर गप्पा मारतोय असं वाटतं. एखादं ठिकाण नुस्तंच आवडतं असं नाही तर त्याची मोहिनी पडते तसं माझ्या बाबतीत चंदनापुरीचं झालं असावं ... नुस्तंच डोक्यात शब्द घुमत रहातो चंदनापुरी, चंदनापुरी, चंदनापुरी ....

पण पुन्हा पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसतं, घोड नदी आलेली असते. रस्त्यात 'खवय्येगिरी', वगैरे एकदम पॉश रेस्तराँ दिसतात. मला 'खवय्येगिरी'मधले स्नॅक्स आवडलेही, पण ते थोडे विजोड वाटतात. मंचर सोडलं की एकलहर्‍याच्या दिशेला ही खादाडी-गृह आहेत. मंचर बर्‍यापैकी आधुनिक गाव वाटतंही, पण मला मात्र एकलहरे आणि कळंबमधली छोटेखानी पण सात्विक अशी कौलारू घरं जास्त आवडतात. सारवलेलं खळं, समोर एकमजली घर, एका बाजूला गायी-गुरं बांधलेली ... मी क्षणभर आजोळी जाऊन येते. पण बहुदा मला पाण्याची ओढ असावी, कारण घोड नदीचं पात्रं मला जास्त आवडतं. शांत पाण्याशी एखादं जनावर पाणी पित असतं, आणि माझी पुन्हा तंद्री लागलेली असते. मधेच डाव्या बाजूला एक एकटाच डोंगर येतो. त्याच्यावरचा कातळ पाण्यामुळे अगदी घासून-पुसून स्वच्छ आहे. एकांडा शिलेदार आजूबाजूला पहारा देतो आहे, असं त्या डोंगराकडे बघून मला नेहेमी वाटतं. समोर दिसते एक पाटी 'महाळुंगे पडवळ <-- ६ किमी'. खरंतर या पाटीकडे लक्ष जाण्याचं काही कारण नाही, पण खाली आणखी एक ओळ आहे, 'हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मस्थान'. पुन्हा एकदा डोक्यात फिरंगोजी नरसाळा, राजगुरू, बाबू गेनू सगळा इतिहास आठवतो. या सगळ्या लोकांचे आपल्यावर किती उपकार आहेत आणि आपण मात्र देशासाठी काहीही करत नाही असा काहीसा त्रासदायक विचार डोकं पोखरायला लागतो.

आणि मग येते इवलीशी मिना नदी! खरंतर या नदीत आवडण्यासारखं काही नाही, पण नदीच्या जवळूनच जी.एम.आर.टी.चा सेंट्रल-स्क्वेअर दिसतो, आता जी.एम.आर.टी. आली याची कल्पना येते म्हणूनही असेल, मला मिना नदी आली की एकदम "हं आता जवळजवळ पोहोचलोच" हा सुखावह विचार येतो. कितीही जवळून ते अँटेनाज पहाता येत असले तरीही नारायणगावातून जे लँडस्केप दिसतं ते निराळंच. नारायणगडावरूनतर आणखी सुंदर देखावा दिसतो. हा सगळा विचार डोक्यात शिरून बाहेर पडेपर्यंत हाडं बाहेर येणार का काय असं वाटायला लागतं. पुणे-नाशिक रस्ता सोडून बस आता छोट्याशा खोडदच्या दिशेला लागली असते. मधेच एक गाव येतं भोरवाडी. खरं सांगायचं तर या गावात काही निराळं नाही, पण तिथलं एका कोपर्‍यावरचं देऊळ मला बाहेरुनच पाहिलेलं असलं तरी आवडतं. आधुनिक विटा-सिमेंट वापरून चिर्‍यांच्या बांधणीसारखं हे बांधलं, रंगवलं आहे. किती वेळा पाहिलं तरी पुढच्या वेळी मी पुन्हा डोकावून हे देऊळ पहातेच. एकदा तिथे सामुदायिक विवाह सोहळा रंगला होता, त्यामुळे बस ट्रॅफिकमधे अडकली. खरंतर ते गाव एवढंसं टिचभर, पण तिथेही गर्दी होती. एरवी ट्रॅफिक आणि गर्दीला वैतागणारी मी, त्या देवळाशेजारीच बस थांबली म्हणून जाम खूष झाले.

अचानक बसचा आवाज कमी होतो, बस थांबतेच आणि जी.एम.आर.टी.च्या प्रांगणात शिरते. मी एकदम लहान मुलीसारखी हरखून जाते, "आता ऑब्झर्व्हेशन्स! हुर्रे ... आणखी डेटा, आणखी काहीतरी इंटरेस्टींग काम .... "

मला जी.एम.आर.टी.त जायचा खरंच कंटाळा येतो. आत्ता तिथे बसले आहे, पण पुन्हा पुढच्या वेळेस इथे यायला लागेल याचा विचार करून आत्ताच कंटाळा आला. पण एकदा इथे आले की काहीतरी वेगळंच होतं. एक दिवस काम होत नाही, रुटीन बिघडतं म्हणून रुटीनप्रिय मी करवादते, पण इथल्या लोकांना भेटलं की वेगळंच काही वाटतं. जाऊन अगदी कॅंटीनमधले आचारी, वाढपी ते अगदी अ‍ॅडमिनीस्ट्रेशन-प्रमुखांशी गप्पा मारते. नुस्तं "काय, कसे आहात? मजेत ना??" एवढं विचारलं तरी हे सगळे चेहेरे किती सुंदर दिसतात. संध्याकाळी साडेपाचला परत यायला निघताना मी अगदी सहजच म्हणते, "मजा आली आज ... पुन्हा भेटू या. माझी ऑब्झर्व्हेशन्स कधीच संपणार नाहीत... तेव्हा सी यू लेटर!"

Followers