Sunday, October 9, 2011

गुरूत्वाकर्षण नव्हे, कर्मविपाकातून अधःपतन

अलिकडेच वाचलेल्या एका संशोधनानुसार गुरूत्वाकर्षण हे खरे बल नसून ते सर्वव्यापी परमेश्वराने निर्माण केलेले कर्मविपाकामुळे होणारे अधःपतन असते. शाळांमधे भौतिकशास्त्र, उत्क्रांती, अणूरासायनिक प्रक्रिया इत्यादी पाश्चात्य विज्ञान शिकवावे का नाही यावरून चर्चा सुरू असताना, कांदा संस्थानाच्या माजी संस्थानिकांच्या देणगीतून सुरू असणार्‍या संशोधनसंस्थेतील पदार्थविज्ञानिक आचार्य दीपांकर भिर्टाचारजी यांनी त्यांच्या या नव्या 'कर्मविपाकामुळे अधःपतन' या संशोधनाची माहिती दिली. संस्थानातील विद्यापीठातच प्रौद्योगिकी भौतिकशास्त्र आणि शिक्षण या विषयांतून विद्यावाचस्पती या पदवीसाठी संशोधन करून आता तिथेच प्राध्यापक पदाचा भार सांभाळत तीन विद्यार्थ्यांना संशोधनात मार्गदर्शन करणार्‍या आचार्यांना या विषयावर अधिक बोलण्याचा वेळ देण्यात आला. आचार्यांच्या मते, "पतन होणे हे नैसर्गिकच वाटते, यात गुरूत्वाकर्षणाचा हात असावा असे वरकरणी वाटते, पण ते तसे नसून कर्मविपाकाचा जो सुंदर डाव भगवंताने मांडला आहे त्यामुळे होते. भगवंताच्या इच्छेवरून आपापल्या कर्मानुसार वस्तूंचे अधःपतन होते. गुरूत्वाकर्षणाचा नियम आपण शिकतो, पण त्याचे आकलन साकल्याने झालेले नसून त्यात अनेक त्रुटी आहेत. दोन वस्तूंमधे आकर्षण असणारे बल किती असते याचे गणित गुरूत्वाकर्षणाने मांडले आहे, परंतू हे बल येते कुठून याचे उत्तर गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत देऊ शकत नाही. खुद्द गुरू न्यूटन यांच्या वदनाचा तरजुमा असा, "मला अशी शंका आहे की माझे सर्व सिद्धांत अशा बलावर अवलंबून आहे ज्याचा शोध तत्त्वज्ञ गेली कितीक वर्षे घेत आहेत, पण त्यात त्यांना यश आलेले नाही." अर्थातच गुरू न्यूटन एका वरच्या तत्त्वाकडे, शक्तीकडे निर्देश करत आहेत. आपण पाश्चात्यांचं सरसकट अंधानुकरण करतो आहोत पण आपल्या शास्त्रांमधे निसर्गाच्या गूढरम्य विस्ताराचे आकलन मांडून ठेवले आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. उद्या कोणी हेक्टर हिल्टन जर आपली शास्त्र कशी महान आहेत असं सांगायला लागला तरच आपण आपल्या शास्त्रांना मान देऊ अशी आपली आजची शिक्षक पिढी आहे. त्यांच्यामुळे तरूणांचाही बुद्धीनाश होत असल्यामुळे हे सर्व अधःपतन थांबवण्याची जबाबदारी आपलीच आहे."

या बातमीमुळे मी आचार्यांच्या संस्थेस भेट देण्याचे ठरवले. १८५७ च्या बंडानंतर ज्ञानेश्वरांनंतर भारतीय संस्कृतीचा र्‍हास का झाला याचे संशोधन करण्यासाठी त्याच वर्षी सुरू झालेल्या महाराजाधिराज सोमशेखरनाथ संस्था, मसोसं, इथे स्थापनेपासूनच कर्मविपाक सिद्धांताचा अभ्यास आणि त्यानुसार विज्ञानाची आपल्या जुन्या शास्त्रानुसार संगतवार पुनर्मांडणी हे दोन विषय महत्वाचे समजले जातात. त्याशिवाय मसोसंमधे इतरही काही महत्त्वपूर्ण विषयांवर संशोधन होते; तिथल्या ग्रंथालयात दिसणार्‍या काही प्रबंधांच्या शीर्षकांवरून तिथल्या संशोधनाचा आवाका लक्षात येईल. उदाहरणार्थ झेंड्याचा आकार त्रिकोणी असण्याचा पृथ्वीच्या आकाराशी असणारा संबंध, न्यूटनच्या तिसर्‍या नियमांचा पुनर्जन्म आणि कर्मफलाशी असणारा अन्योन्यान्वय, केप्लरच्या पहिल्या नियमाचे मूळ भारतीयांनी शोधलेल्या शून्यात, इ. ग्रंथालयात फिरताना तिथल्या एक विद्यार्थिनी श्रीमती रतीचंद्रिकादेवी म. बाणकोटे यांच्याकडून त्यांच्या कामाची माहिती मिळाली. श्रीमती रतीचंद्रिकादेवी या आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यावाचस्पतीपदाच्या प्रबंधासाठी संशोधन करत आहेत. त्यांचा विषय हा त्यांच्या पूर्वसूरींनी केलेल्या संशोधनावर आधारित आहे. त्यांच्या संशोधनाचा सारांश असा, "न्यूटनचा पहिला नियम म्हणजेच अनंत काळ आणि जन्मोजन्मीचे फेरा ही कल्पना आहे. आमच्या पूर्वजांनी अनेक सहस्रकांपूर्वीच हा शोध लावला होता, आणि आता कुठे या पाश्चात्यांना त्याची माहिती समजली. हळदीचं पेटंट या पाश्चात्य लोकांनी चोरण्याचा प्रयत्न केला, हा ही तसलाच प्रकार आहे." त्यांच्याकडूनच समजलेले न्यूटनच्या नियमांचे भारतीय मूळ हे असे,

"भगवंताचा पहिला नियम असा देवाच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट बदलत नाही. देवाच्या हस्तक्षेपाशिवाय आपण सर्वच जन्ममृत्युच्या फेर्‍यातून जात रहाणार. तुम्ही जड वस्तूंचे नियम तेवढे पहाता, त्यात खूप गूढ गहन अर्थ दडलेला आहे. दुसरा नियम असं म्हणतो, आपले वस्तूमान 'व' आणि देवाची भक्ती करण्याचे त्वरण 'त' असेल तर भल्याकडे जाण्याचे आपले बल असेल 'तव'. अर्थात हा नियम एवढा सोपा नाही, त्याचे संपूर्ण विवरण 'खासशोध' या आचार्यांच्या ग्रंथात दिलेले आहे. आणि तिसरा नियमतर न्यूटनने शब्दाचीही अदलाबदल न करता तसाच उचलला आहे. कर्मविपाकाची आणखी वेगळी सिद्धता काय द्यावी? ही एक बाजू झाली. न्यूटनचा पाश्चात्यांना प्रचंड अभिमान वाटतो. पण न्यूटनच्या आधी कितीक सहस्रके हिंदुस्थानात गुरूत्वीय स्थिरांकाचा शोध लागला होता. हा स्थिरांक, जी, ८४ लक्ष, जेवढ्या योनी आहेत असं समजलं जातं, गुणिले हिंदू वर्षातले दिवस गुणिले आर्यभटाने आखलेल्या त्रिकोणी पृथ्वीला मंडल असणार्‍या वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच आज आधुनिक लोक ज्याला पृथ्वीची त्रिज्या म्हणतात, त्याचा व्यस्त आहे." पाश्चात्यांच्या नावाला आज वलय आहे आणि आम्हाला नोकरी देताना मात्र कोणी विचारत नाही ही खंत त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

आचार्यांच्या निवेदनानुसार हे नवीनतम संशोधन 'डॉग्मॅटीक अ‍ॅनल्स ऑफ सोसायटी ऑफ इंडीया' (दासी) आणि तरूणाईचे आवडते नियतकालिक 'भगवंताचे सृष्टीनियमन' या दोन्ही ठिकाणी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. या संशोधनांनुसार, ज्या इतर अनेक घटना फक्त गुरूत्वाकर्षणातून समजावता येत नाहीत त्या समजून घेता येतात. या प्रश्नांपैकी काही म्हणजे मृत्युनंतर माणूस 'वर जातो' ते कसे, स्वर्गाची जागा वरच्या आणि नरकाची जागा खालच्या दिशेला का असते, अवकाशातून पुष्पवृष्टी होताना फुलांना हवेचा रोध का जाणवत नाही तसेच फुलांच्या उल्का का होत नाहीत.

मसोसं आणि आचार्य यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा संस्थानातील तरूण विद्यार्थी आणि खुद्द संस्थानिक, महाराज सोमशेखरनाथ यांचे वारस आणि मसोसंचे महागुरू महाचार्य महाराज नीलेंद्रप्रताप यादव हे लवकरच पंतप्रधानांकडे एक निवेदन देणार आहेत. या निवेदनात भारतातील सर्व शाळांमधे या कर्मविपाक पतनाचा सिद्धांत शिकवावा अशी विनंती असेल. विनंती अमान्य झाल्यास खुद्द महाराजांचे दिवाण हरदासशास्त्री हे "मी दिवाण" असे लिहीलेले सोवळे नेसून उपोषणास बसणार आहेत, असेही आचार्यांनी जाहीर केले. "आम्हाला मुलांच्या हितामधेच रस आहे" असे आचार्यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

प्रेरणा
सदर संशोधनपर लेख वाचून, त्याचे आकलन करून तो इथे लिहीण्यात मला सर्वश्री राजेश घासकडवी, नंदन, Nile आणि सर्वसाध्वी प्रियाली आणि ढब्बू पैसा यांची मदत झाली त्यांचे आभार.

Saturday, October 8, 2011

स्त्रीवादाचा पुरस्कार आणि आजचे "आपण"

स्वतः कमावायला लागल्यापाहून काही दिवसांतच ज्या गोष्टीचं महत्त्व समजलं ती म्हणजे स्त्रीवाद. पुरूषी मानसिकतेतून कधी माझ्यावर अन्याय झाला तर कधी माझ्या आईवर तर कधी माझ्या मैत्रिणीवर. छोट्या मोठ्या कृतीमधूनही, अन्याय करणार्‍यालाही अन्याय करतो आहोत याची आणि जिच्यावर अन्याय होतो आहे तिलाही अन्यायाची जाणीव नसणं हे चांगलं का वाईट असाही प्रश्न अनेकदा पडतो. अशा अनेक घटना आसपास पहाताना स्त्रीवादी कार्यकर्ती, लायबेरीयाची राष्ट्राध्यक्षा एलन जॉनसन सरलीफ हिला शांतता-नोबेल पुरस्कार मिळाला ही माझ्यासारख्या सामान्य स्त्रीसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट. सरलीफ यांच्याजोडीला स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणार्‍या लायबेरीयाच्याच लेय्मा ग्बोवी आणि येमेनमधले लोकशाहीवादी कार्यकर्त्या तवक्कुल कारमन यांना पुरस्कार मिळाला. समानतेसाठी झगडा मांडणार्‍या तिघींचा नोबेल पारितोषिकाने सन्मान व्हावा या बातमीनेच समानतेच्या तत्त्वावर विश्वास ठेवणार्‍या सर्व स्त्री-पुरूषांना आनंद व्हावा. दिवसाची सुरूवात व्हावी तर अशी!

आजूबाजूला पहावं तर काय दिसतं? लग्न झाल्यानंतर अनेक स्त्रिया राजीखुशीने आपलं नाव बदलतात. नाव असो वा आडनाव, गेली अनेक वर्ष आपली जी ओळख आहे तीच बदलायची, एवढं की फेसबुकावर फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर फोटो पाहिल्याशिवाय आपली बालमैत्रीण ओळखता येऊ नये ही अतिशय दु:खद गोष्ट वाटते. "मुली, चालून दाखव" "गाणं म्हण" वगैरे गोष्टी थिल्लर वाटतातच पण आजही भारतात अनेक समाजांत ही पद्धत सुरू आहे. आपल्याच वयाच्या मुलींना अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं हे समजल्यावर त्यातलं क्रौर्य जास्तच चांगलं समजलं. स्त्रियांवर होणार्‍या अन्यायांची यादी बनवायची तर त्याला अंत नाही; पण मला हा मुद्दा आज फार महत्त्वाचा वाटत नाही.

स्वातंत्र्याबरोबरच येते ती जबाबदारी. आपण आपलं स्वतंत्र अस्तित्त्व मिळवायचं तर त्याबरोबर येणार्‍या जबाबदारीची जाणीव आजच्या स्त्रियांमधे कितपत आहे? पुरूषाच्या शरीरात स्त्रीच्या शरीरापेक्षा जास्त स्नायू असल्यामुळे शारीरिक क्षमतेमधे स्त्रियांपेक्षा पुरूष वरचढ ठरतो यात वाद नाही. भरलेला सिलेंडर सामान्य स्त्री आपल्या घरात ट्रॉली वापरून फिरवू शकते, पण कदाचित चार पायर्‍या चढून लिफ्टमधे ठेवणं तिला शक्य नाही. असे काही क्षुल्लक अपवाद वगळता आज वरपांगी मुक्त दिसणार्‍या स्त्रियाही आपली जबाबदारी ओळखून आहेत का? घरातली कामं करण्यात पुरूषाने हातभार लावावा हे जेवढं खरं आहे तेवढंच घरातल्या सुतारकाम, माळीकामात स्त्रीनेही मदत करावी ही जबाबदारीची जाणीव आहे. घर चालवण्याची जबाबदारी पूर्वीच्या परंपरेत पुरूषावर होती, पण जर पुरूषी मानसिकतेचा विरोध करायचा असेल तर घर चालवण्याची जबाबदारी स्त्री आणि पुरूष दोघांची आहे याचीही जाणीव स्त्रीला हवी. लग्नानंतर नाव बदलायचं नसेल तर आपण स्त्री असण्याचे फायदे मिळत असतानाही ठोकरण्याची कर्तबगारी स्त्रीमधे असावी. "माझ्यावर अन्याय झाला आहे" असा फक्त ओ-रडा करण्यापेक्षा तो अन्याय कमी, नष्ट कसा होईल याचा प्रयत्न करणं हे अतिशय सकारात्मक पाऊल उचलल्याशिवाय बदल होणे शक्य नाही. नावडती गोष्ट घडल्यास रडणं हा मानवी स्वभावच आहे, पण आपल्या रडण्यामुळे नको त्या ठिकाणी आपल्याला सहानुभूती मिळते ती गमावण्याची स्त्रीची तयारी असावी.

पारंपारिक मनस्थितीच्या सर्व स्त्री-पुरूषांना स्वतंत्र अस्तित्त्व असणारी स्त्री अनेक पैलूंमुळे स्त्री वाटतच नाही. १९४० च्या दशकात सिमोन दी बोव्वार हिने Le deuxième sexe (द सेकंड सेक्स) लिहीताना जी तक्रार केली ती आज आपल्या समाजातही दिसतेच; स्वतंत्र विचारांची, बुद्धीची व्यक्ती स्त्री असूच शकत नाही इथपर्यंत आरोप होतात. नवीन विचारांचा, मूल्यांचा अभ्यास करून, तर्काच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पहाणार्‍या पुरूषाला समाजात जेवढा त्रास होतो त्यापेक्षा किंचित जास्त त्रास स्त्रियांना होतो. एक स्त्री शिकली की सर्व कुटुंब शिकतं असं म्हणतात; या जबाबदारीतून आजही स्त्रीची मुक्तता नाहीच. पण 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' आणि या यातना सहन करूनही आपल्या समानतेच्या मूल्यांवर विश्वास ठेवण्याची शक्ती प्रत्येक स्त्री-पुरूषांत असावी.

Followers