Tuesday, December 14, 2010

AIPS

Here are some tips while installing AIPS on Ubuntu and Kubuntu systems. I got stuck with AIPS for quite some time. These are there mainly for myself but anybody is free to use these. Also if there is anymore to add to these, please comment here itself.

1. Create directory /home/aips

2. Give proper permissions to the user (in my case sanhita is the user):
a. chgrp -R sanhita /home/aips
b. chown -R sanhita /home/aips

3. Install 'cvs' on the machiene. I used 'apt-get install cvs' command for the same.
3a. Install gfortran, if you do not have it and if you are going to compile AIPS.

4. Download install.pl which is the install wizard, from the AIPS (CLASSIC) website. Keep it at /home/aips/install.pl
a. Change the permissions of the file using
chmod u+x install.pl

5. Run install.pl using ./install(dot)pl. It will many questions during that. The main answers are:
a. The home area for aips is /home/aips
b. The data area is /home/aips/DATA/LEELA_1 (LEELA is my machiene name). More areas can be added to this after editing the file /home/aips/DA00/DADEVS.LIST
c. Which processor/system does one have, e.g. Linux or LNX64 (64-bit linux)

6. Keep hitting enter once the questionaire is complete. Do give the email address as courtesy when asked for cvs password.

7. If asked 'AMANAGER' is another password.

8. If you get the following error:
START_AIPS: AIPS_ROOT is not a directory; cannot start AIPS.
the solutions can be:
a. Check the file called /home/aips/LOGIN.SH or /home/aips/LOGIN.CSH
and/or
b. /home/aips/START_AIPS
and check what is the AIPS_ROOT area. It should be /home/aips.

In my installation the file START_AIPS had the AIPS_ROOT area defined as /home/AIPS. That was breaking it. Once that was fixed, it worked fine.

Have fun AIPSing! Let me get back to AIPS now to make a linear polarization map of NGC 253 at 610 MHz.

Tuesday, July 6, 2010

'बाईमाणूस' वाचताना

सध्या 'बाईमाणूस' नावाचं करूणा गोखले यांचं पुस्तक वाचते आहे. पहिला धडा वाचून फारसं आवडलं नव्हतं तरीही ते पुन्हा उघडलं. आणि पुढचे धडे/निबंध आवडले. (संपूर्ण वाचून, पचवून होईल तेव्हा पुस्तकावर सविस्तर लिहायला मला आवडेल.) त्यातले काही विचार अगदी फारच आवडले (माझ्या शब्दांत):

स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रियांनी पुरूषांची बरोबरी करणं नव्हे! पुरूषांनी सुरू केलेला / ठेवलेला भेदाभेद, भांडणं, हिंसा, युद्धं स्त्रियांनीही करणं स्त्रीमुक्तीला मान्य नाही.
राजसत्तेपेक्षा जास्त प्रभावी आणखी एक संस्था कार्यरत होती, पुरूषसंस्था; स्त्रियांचं शिक्षण सुरू झाल्यावरही फार पुढे गेलं नाही कारण ही दुसरी सत्ता!
खरे स्त्रीमुक्तीवाले स्त्रीच्या मातृत्त्व, वात्सल्य यांना स्त्रियांचे 'दुर्गुण' समजत नाहीत. इ.इ.

पुस्तक आता खूपच चांगलं वाटत आहे; 'बड्डे गिफ्ट्स' काय आणायची याची चिंता आणखी कमी झाली! ;-)

अवांतरः विषमता आपल्या सगळ्यांमधेच किती भिनली असावी?
मागच्या आठवड्यात लंचटेबलवर मी पोहोचले तर 'देव' या न संपणार्‍या विषयावर चर्चा सुरू होती. मी तिथे गेले आणि काय चर्चा सुरू आहे याचा कानोसा घेतला. सगळ्यांनी माझ्याकडे "माझं मत काय?" अशा चेहेर्‍याने बघायला सुरूवात केली.

Me: What are we talking about?
Reply: About existence of God.
Me: About what??
Reply: About God.
Me: About whom??
Reply: About God ...
Me: About whom??

आणि अजून दोन-चारदा मी तोच प्रश्न विचारल्यावर माझा प्रतिसाद 'पोहोचला'.
अर्चना, एक मल्लू मुलगी, सध्या इंजिनियरींगच्या तिसर्‍या/चौथ्या वर्षाला आहे, ती इथे ट्रेनी म्हणून आली आहे. घरातून पहिल्यांदाच एकटी बाहेर पडली आणि आमच्या या अजब-प्राणी-संग्रहालयात येऊन पडली आहे. ती हिरीरीने मला समजवायचा प्रयत्न करत होती, देव आहे म्हणून! माझा तोच प्रश्न, "नक्की कोण आहे?"
शेवटी ती लेक्चर्सची वेळ झाल्यावर गेली. आणि नंतर माझी चौकशी माझी मैत्रिण आहे, आरती, तिच्याकडे केली. आरतीकडून कळलेले अर्चनाचे उद्गार, "म्हणजे, तिचं लग्नं झालंय? एक लग्नं झालेली मुलगी असून तिचा देवावर विश्वास नाही!?!"

अजूनही यावर हसावं का रडावं मला समजलेलं नाही.

Tuesday, February 9, 2010

प्रवास

दर वेळी असंच होतं, जी.एम.आर.टी.ला जायचं असलं की मी कुरकूर करायला सुरूवात करते. "कशाला जायचं तिथे?", "त्रास आहे रे, उद्या ग्मर्टला जायचं आहे. सक्काळी सक्काळी उठून तिकडे जायचं, तिकडचं जेवणही मला आवडत नाही." असं काही नेहेमीच होतं. पण आलिया भोगासी म्हणून सकाळी सहाचा गजर लावून सव्वासहापर्यंत मी उठते. अर्धवट झोपेत, आवश्यक अशा अर्ध्या महत्त्वाच्या गोष्टी घरात किंवा ऑफिसातच विसरून मी बसमधे बसते आणि बस सुटायच्या आधीच माझा डोळा लागतो.

जाग येते तर बस बहुदा ऑफिसाच्या गेटपाशी असते आणि पुन्हा डोळा उघडतो तर इंद्रायणी जवळ आलेली दिसते. श्वासात बराच जास्त ऑक्सिजन आहे हे जाणवतं आणि खूप छान वाटतं. चाकण आल्याची चाहूल लागते आणि मला सगळ्यात पहिले आठवतात ते चाकणचा भुईकोट किल्ला आणि फिरंगोजी नरसाळा. हा किल्ला बघण्याचा प्रयत्न मी अजूनही केला नाही आहे, पण तरीही ठाण्याचा किल्ला(/तुरूंग) बाहेरून पाहिलेला आहे त्याची आठवण होते. पण त्याहीपेक्षा जास्त आठवतो तो फिरंगोजी नरसाळाच; तो कसा दिसत असेल कोण जाणे, पण त्याच्यासारख्या वीरांमुळे आज माझं आयुष्य चांगलं झालं आहे याची जाणीव होते, मी दगड नाही, मलाही भावना आहेत याची किंचित कल्पना येते. बस तशीच पुढे जात असतेच आणि विचारांमधून बाहेर येईपर्यंत भामा येते. या भामेच्या तीरावरच्या भाममधे मी एकदा मिसळ खाल्ली होती. जी.एम.आर.टी.च्या स्टाफमधल्या एक इंजिनीयर आहेत, त्यांनी आपुलकीने मला मिसळ खायला लावली होती, तेव्हापासून आमची मैत्री झाली ती झाली. भामा ओलांडली की लगेच एक सुंदर, सुशोभित कँपस दिसतो, ही आहे कांदा-लसणीवर संशोधन करणारी संस्था! लगेचच भीमेवरचा पूल दिसतो आणि येतं राजगुरूनगर ... खेड! कोवळ्या वयात देशासाठी जीवाची आहुती देणार्‍या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरुंपैकी, राजगुरूंचं गाव! त्यांच्या नावाचं कॉलेज दिसतं, एस.टी. स्टँडबाहेरचा त्यांचा पुतळा दिसतो आणि वाटतं, किती फालतू गोष्टींचा आपण मोठा इश्यू बनवतो. कोवळ्या वयात फाशी गेलेल्या राजगुरूंबद्दलचा आदर दरवेळी वाढतच जातो. आणि समोर दिसतो एक बकाल नाला आणि एक देशी दारूचा गुत्ता ... संताप होतो, पण आपण काही करू शकत नाही याची जाणीव जास्त टोचते.

पण हे सह्याद्रीचं सौंदर्य असं आहे की सगळं विसरायला होतं. पुणे-नाशिक रस्त्यावर आधी खेडची घाटी लागते. रस्त्यावरची वळणं, आडदांड सह्याद्री आणि त्याच्या कुशीतला पाझर तलाव कितीही वेळा पाहिला तरी समाधान होतंच नाही. पुढे एक अवसरीची घाटीही येते, आणि तिथली झाडं पाहून सरळ बसमधून उडी मारावी आणि झाडाखाली शांत बसावं, थोडा विचार करावा, थोडं काम करावं, थोडं भटकावं आणि दमून एखाद्या झाडाखालीच पसरावं अशी इच्छा वारंवार होते. मग मात्र मी घाबरून गाणं कोणतं सुरू आहे वगैरे विचार करते. उगाच उडी-बिडी मारली तर, अशा वेळी माझा स्वतःवरच विश्वास नसतो. या सगळ्या घाट्यांमधे मला आवडतो तो चंदनापुरीचा घाट! अरेरे, जी.एम.आर.टी.साठी त्याच्या आधीच वळतो. एकदाच हा घाट पाहिला, पण राकट सौंदर्य म्हणजे काय तर आता मला चंदनापुरीचा घाटच आठवतो. नाशिक रस्त्याला आळेफाटा मागे टाकून संगमनेरकडे गेलं की हा घाट मधे येतो. एखादा नाकी-डोळी नीटस, सावळासा तरूण, जो शारिरीक श्रमाच्या कामांमुळे आखीव-रेखीव आहे, आणि मुळचा गव्हाळ वर्ण आता उन्हामुळे रापून तांबूस-सावळा झाला आहे, असं काहीसं या घाटाकडे पाहून मला वाटलं. हा घाट 'आवडला'... अगदी तस्सा आवडला. आधी खेड घाट मला आवडायचा, पण चंदनापुरीचा घाट पाहून ते आवडणं वेगळं आणि हे वेगळं असं काहीसं वाटतं. खेड घाटातलं सौंदर्य वेगळं आणि चंदनापुरीचं वेगळं. आणि हे चंदनापुरी नावसुद्धा मला एवढं आवडतं की हा आखीव-रेखीव तरूण अचानक बसून गणित, भौतिकशास्त्र किंवा अर्थशास्त्रावर गप्पा मारतोय असं वाटतं. एखादं ठिकाण नुस्तंच आवडतं असं नाही तर त्याची मोहिनी पडते तसं माझ्या बाबतीत चंदनापुरीचं झालं असावं ... नुस्तंच डोक्यात शब्द घुमत रहातो चंदनापुरी, चंदनापुरी, चंदनापुरी ....

पण पुन्हा पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसतं, घोड नदी आलेली असते. रस्त्यात 'खवय्येगिरी', वगैरे एकदम पॉश रेस्तराँ दिसतात. मला 'खवय्येगिरी'मधले स्नॅक्स आवडलेही, पण ते थोडे विजोड वाटतात. मंचर सोडलं की एकलहर्‍याच्या दिशेला ही खादाडी-गृह आहेत. मंचर बर्‍यापैकी आधुनिक गाव वाटतंही, पण मला मात्र एकलहरे आणि कळंबमधली छोटेखानी पण सात्विक अशी कौलारू घरं जास्त आवडतात. सारवलेलं खळं, समोर एकमजली घर, एका बाजूला गायी-गुरं बांधलेली ... मी क्षणभर आजोळी जाऊन येते. पण बहुदा मला पाण्याची ओढ असावी, कारण घोड नदीचं पात्रं मला जास्त आवडतं. शांत पाण्याशी एखादं जनावर पाणी पित असतं, आणि माझी पुन्हा तंद्री लागलेली असते. मधेच डाव्या बाजूला एक एकटाच डोंगर येतो. त्याच्यावरचा कातळ पाण्यामुळे अगदी घासून-पुसून स्वच्छ आहे. एकांडा शिलेदार आजूबाजूला पहारा देतो आहे, असं त्या डोंगराकडे बघून मला नेहेमी वाटतं. समोर दिसते एक पाटी 'महाळुंगे पडवळ <-- ६ किमी'. खरंतर या पाटीकडे लक्ष जाण्याचं काही कारण नाही, पण खाली आणखी एक ओळ आहे, 'हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मस्थान'. पुन्हा एकदा डोक्यात फिरंगोजी नरसाळा, राजगुरू, बाबू गेनू सगळा इतिहास आठवतो. या सगळ्या लोकांचे आपल्यावर किती उपकार आहेत आणि आपण मात्र देशासाठी काहीही करत नाही असा काहीसा त्रासदायक विचार डोकं पोखरायला लागतो.

आणि मग येते इवलीशी मिना नदी! खरंतर या नदीत आवडण्यासारखं काही नाही, पण नदीच्या जवळूनच जी.एम.आर.टी.चा सेंट्रल-स्क्वेअर दिसतो, आता जी.एम.आर.टी. आली याची कल्पना येते म्हणूनही असेल, मला मिना नदी आली की एकदम "हं आता जवळजवळ पोहोचलोच" हा सुखावह विचार येतो. कितीही जवळून ते अँटेनाज पहाता येत असले तरीही नारायणगावातून जे लँडस्केप दिसतं ते निराळंच. नारायणगडावरूनतर आणखी सुंदर देखावा दिसतो. हा सगळा विचार डोक्यात शिरून बाहेर पडेपर्यंत हाडं बाहेर येणार का काय असं वाटायला लागतं. पुणे-नाशिक रस्ता सोडून बस आता छोट्याशा खोडदच्या दिशेला लागली असते. मधेच एक गाव येतं भोरवाडी. खरं सांगायचं तर या गावात काही निराळं नाही, पण तिथलं एका कोपर्‍यावरचं देऊळ मला बाहेरुनच पाहिलेलं असलं तरी आवडतं. आधुनिक विटा-सिमेंट वापरून चिर्‍यांच्या बांधणीसारखं हे बांधलं, रंगवलं आहे. किती वेळा पाहिलं तरी पुढच्या वेळी मी पुन्हा डोकावून हे देऊळ पहातेच. एकदा तिथे सामुदायिक विवाह सोहळा रंगला होता, त्यामुळे बस ट्रॅफिकमधे अडकली. खरंतर ते गाव एवढंसं टिचभर, पण तिथेही गर्दी होती. एरवी ट्रॅफिक आणि गर्दीला वैतागणारी मी, त्या देवळाशेजारीच बस थांबली म्हणून जाम खूष झाले.

अचानक बसचा आवाज कमी होतो, बस थांबतेच आणि जी.एम.आर.टी.च्या प्रांगणात शिरते. मी एकदम लहान मुलीसारखी हरखून जाते, "आता ऑब्झर्व्हेशन्स! हुर्रे ... आणखी डेटा, आणखी काहीतरी इंटरेस्टींग काम .... "

मला जी.एम.आर.टी.त जायचा खरंच कंटाळा येतो. आत्ता तिथे बसले आहे, पण पुन्हा पुढच्या वेळेस इथे यायला लागेल याचा विचार करून आत्ताच कंटाळा आला. पण एकदा इथे आले की काहीतरी वेगळंच होतं. एक दिवस काम होत नाही, रुटीन बिघडतं म्हणून रुटीनप्रिय मी करवादते, पण इथल्या लोकांना भेटलं की वेगळंच काही वाटतं. जाऊन अगदी कॅंटीनमधले आचारी, वाढपी ते अगदी अ‍ॅडमिनीस्ट्रेशन-प्रमुखांशी गप्पा मारते. नुस्तं "काय, कसे आहात? मजेत ना??" एवढं विचारलं तरी हे सगळे चेहेरे किती सुंदर दिसतात. संध्याकाळी साडेपाचला परत यायला निघताना मी अगदी सहजच म्हणते, "मजा आली आज ... पुन्हा भेटू या. माझी ऑब्झर्व्हेशन्स कधीच संपणार नाहीत... तेव्हा सी यू लेटर!"

Saturday, January 23, 2010

दहा वर्ष

दार उघडून शरयू आत शिरली. आज तिलाच दार बंद करायचं होतं. समोरच्या घरातल्या काकूंची चाहूल लागली तसे तिने डोळे कोरडे केले, पण घाईघाईत दार लावून घेतलं. आत्तातरी कोणाशीही बोलावं असं तिला वाटत नव्हतं. पहिल्यांदा ती जेव्हा एकटीच घरी आली होती ...

आज पहिल्यांदाच ती या घरात एकटी शिरत होती. लग्नाआधी किती दिवस, आठवडे, महिने ती घरी एकटी रहायची पण कधीच त्याचं काही वाटलं नव्हतं. पण लग्नानंतर या घरात आली आणि निस्सीमशिवाय घरात कधी शिरली असं झालंच नाही. लिफ्टमधे असतानाच किल्ल्या काढून ठेवायची तिची सवय, त्यामुळे दार तिने उघडायचं आणि त्याने मागून आत शिरून दार लावायचं. तिने एक क्षण थांबून विचार केला, तिला आठवलंच नाही तिने कधी आतून दार लावून घेतलं नव्हतंच.

संध्याकाळी साडेचारला ऑफिसच्या मित्र-मैत्रीणींबरोबर ती चहा प्यायला जायची, तेव्हाच निस्सीमचा फोन आला. "शरू, मिलींदचा शेवटचा आठवडा आहे इथला. आज संध्याकाळी सगळे मित्र/कलीग्ज बाहेर जाणार आहेत जेवायला..." पुढचं काहीही न ऐकता ती म्हणाली, "मग तू पण जा. आणि एक काम कर, ऑफिसच्या शेजारी केकचं दुकान आहे, तिथून त्याच्यासाठी काहीतरी घेऊन या. नाहीतर तुम्ही पोरं असं काही करणार नाही." "तुला कसं कळतं गं मला काय म्हणायचं आहे ते?" "..... कळतं. माझ्या जेवणाची काळजी नको करूस."

घरी एकटीच स्कूटरवरून जाताना तिला काहीतरी विचित्रच वाटलं. दार स्वतःच बंद केलं तेव्हा डोळ्यांत पाणी आलं होतंच, पण ती स्वतःच हसली. "दोन-चार तासातच येईल तो परत! एवढं काय त्याचं?" आणि तसंच झालं, तिचं जेवण होतंय ना होतंय तोच फोन वाजला. "आत्ताच मिलिंदनी मला गेटपर्यंत सोडलं, आता दोन मिनीटात पोहोचतोच आहे मी घरात!" निस्सीमला बेल वाजवायची गरज पडलीच नाही. "मिलींद म्हणत होता, "आत्ताच तर तुमचं लग्नं होतंय, वर्ष पूर्ण होऊ देत मग काय ती तुझ्या फोनची वाट पहात बसणार नाही.", निस्सीम न विचारताच सांगत होता. ""आमचं लग्नं होऊन दीड वर्ष उलटून गेलंय .... " मग काही बोलला नाही तो." दोघंही हसले आणि शरयूने त्याला संध्याकाळी डोळ्यात पाणी येण्याबद्दल सांगितलं. निस्सीम तिच्याकडे पाहून फक्त हसला आणि तिला जवळ घेतलं.

शरयू पुन्हा वर्तमानात आली, पुन्हा डोळ्यांचा कडा ओल्या झाल्या. आत्ताच ती विमानतळावरून परत येत होती. आता पंधरा दिवस एकटीनेच रहायचं ... आणि तिला अचानक काही आठवलं. आई गेली तेव्हा ती स्वतःशीच विचार करत होती, "मलाच का हे सगळं सहन करावं लागतं?" रात्री सामसूम झाल्यावर हा विचार करताना ती कित्येकदा ओल्या उशीवरच झोपली होती. आता मात्र तिला आईबद्दल खूप वाईट वाटलं "... ती तर दहा वर्ष राहिली, फक्त माझ्यासाठी .... "

आठवणी

आंतरजालावर आणि लेखी साहित्यातही अनेक लोकं आपल्या बालपणात रमलेले दिसले. ते वाचलं आणि वाटलं "मला लहानपणाची आठवण अशा पद्धतीने होत नाही." ... मला आठवते एक शेंबडी, रडूबाई, जिला सगळे काकू म्हणायचे आणि ती त्यावर चिडायची. आजची मी आणि तेव्हाची मी ... वेगळीच माणसं आहेत का काय एवढा संशय येण्याएवढी मी बदलले.

मला आठवतंय माझी पहिली ते चौथीतली मैत्रिण पुढे मला कधीच भेटणार नव्हती, म्हणून मी रडले होते. पण आता मला तिचा चेहेराही आठवत नाही. पाचवीत मी शाळा बदलली. तिथे मराठी शिकवणार्‍या एक बाई म्हणायच्या, "मला माझ्या आई-वडीलांची आठवण झाली की मी माझ्या शाळेत जाते. तिकडे गेलं की कोणी डोक्यावर हात ठेवणारं कोणी वडीलधारं असल्यासारखं वाटतं." शाळेत शिकत असताना मला ते कधी पटलं नाही, पण तेव्हा असं बोलता येतं हे माहितच नव्हतं. आणि आता मी "कुठे उगाच त्यांच्या या वयात त्यांच्या भावनांशी विरोध दर्शवून वाद उकरून घ्या" या विचाराने बोलत नाही. कृती तीच आहे पण तरीही ते करणारी मी फार बदलले आहे. आणि हा बदल झाला याचा मला आनंद आहे.

मला शाळेत जावं असं काही मनापासून वाटत नाही. कधीमधी ठाण्याला गेले, शाळेच्या वेळात त्या बाजूला गेले, घरी कोणी जेवणासाठी वाट पहात नसेल तरच मी शाळेत आत जाते. "ही माझी शाळा" असं काही उचंबळून वगैरे येत नाही. शिक्षकांच्या खोलीत खूपच कमी ओळखीचे चेहेरे असतात. त्यातल्या काही चेहेर्‍यांवर "अरेच्चा, ही एवढी कशी काय शिकली", हे अगदी व्यवस्थित दिसतं. उरलेले चेहेरे खूप सुरकुतलेले असतात, आणि त्या सुरकुत्यांमधून अभिमान आणि प्रेम दिसतं, तेवढंच घेऊन मी बाहेर पडते. पण तरीही ही शाळा 'आपली' वाटत नाही, कारण तहान लागलेली असली तर पाणेर्‍यावरची घाण पाहून तिकडे पाणी पिववत नाही. उगाच नाही आई रोज पाण्याची बाटली द्यायची असा विचार डोक्यात येतो. आणि शी! अजून हे संडास असेच घाणेरडे, इथे आपण कधी(तरीच) जायचो या विचाराने अजूनही किळस येते. या शाळेबद्दल मी अभिमान बाळगावा असं अनेकांना वाटतं, पण म्हणजे काय हे मला अजूनही समजत नाही. या शाळेत अनेक शिक्षक भेटले, ज्यांच्याकडे पाहून इतरांनी समजून घ्यावं, वाईट शिक्षक असेच असतात. पण एक खूप चांगली मैत्रिण मात्र याच शाळेत मिळाली. तिची अधूनमधून आठवण आली की तिला इमेल करायचं, तिचा प्रतिसाद येतो त्याच आठवड्यात, तो वाचून आताच्या मित्रांबरोबर चहाला जायचं.

लहानपणी मी बिल्डींगमधेही खूप दंगा केला, पण तेव्हाही मी रडूबाईच होते. तेव्हाचे बरेचसे मित्र माझ्याप्रमाणेच आधी शिक्षण आणि आता नोकरीच्या निमित्ताने तिथे नाहीत. मीही क्वचितच परत जाते, वर्षातून दोनदा भेटलो तरी खूप! भेटलो की गप्पा रंगतात, आवडीनिवडीप्रमाणे चहा, सरबत, भेळ, वडे हादडतो, पण कधीच (कोणालाही) ते दिवस गेल्याचं वाईट वाटलेलं दिसत नाही. थोडंफार दु:ख होतं ते एक नारळ, एक बकुळीचं झाड आणि इतर बरीच झुडपं बिल्डींग पुन्हा बांधली त्यात गेल्याचं!

हो, ती बिल्डींगही पुन्हा बांधली गेली. आमच्या तळमजल्याच्या चार घरांमधे एवढ्या वेळा पावसाचं पाणी घुसायचं की आम्ही चार घरं तर अगदी आनंदात होतो, पण इतरही अनेकांना बिल्डींग पुन्हा बांधायला पाहिजे याची जाणीव होती. जुन्या घराचे असे दुर्दैवी दशावतार पाहून मला आणि भावाला दु:ख व्हायचंच, पण त्याही पेक्षा जास्त आनंद झाला आता कोरंकरकरीत घर मिळणार याचा! भाऊ आणि वहिनीने आत्ता घर जे काही मस्त रंगवलं आहे, नवीन फर्निचर केलं आहे ते पाहून तर मला आणखीनच जास्त आनंद होतो. पण शिक्षणाच्या निमित्ताने अनेक वर्षांपूर्वीच घर सोडलं, मधल्या काळात 'घर' नक्की कुठे आहे हाही प्रश्न पडला होता. पण आता मात्र कन्सेप्ट्स क्लियर आहेत. मी जिथे रहाते तेच माझं 'घर' आहे. सध्या नाईलाजास्तव माझी दोन घरं आहेत, पण ती माझी आहेत. नवीन बांधलेल्या इमारतीत माझा मालकी हक्क असला तरी ते घर माझं नाही, भाऊ-वहिनीचं आहे याची व्यवस्थित जाणीवही आहे. माझं लहानपण अजूनही मला आठवतं, अनेक सुखद आणि दु:खद गोष्टी अगदी अलिकडे घडल्या आहेत अशा लक्षात आहेत. पण ते लहानपण गेलं याचं दु:खही नाही आणि आनंदही नाही.

शिक्षणासाठी घराबाहेर पडले तेव्हा परदेशात दुसरं घर बनलं. तिथले मित्र सगेसोयरे बनले. त्यातल्या एकाचा, माईकचा, एक मित्र बर्‍याचदा या घरी शनिवार-रविवारी यायचा. पण हाच माईक अनेकदा असंही म्हणायचा, "पूर्वीच्या मित्रांशी माझा फारसा संबंध नाही, आणि इथून आपण बाहेर पडलो की तुमच्याशीही माझा फार संबंध राहिलंच असंही नाही". तेव्हा त्याचं बोलणं क्रूरपणाचं वाटायचं. पण अचानक एका मैत्रिणीचं इमेल आलं, तिने तिचा थिसीस सबमीट केल्याचं, आणि लक्षात आलं, गेल्या चार महिन्यात या कोणाशीही आपला काहीही संबंध नव्हता. संध्याकाळीच दोघांशी स्काईपवरून बोलले आणि छान वाटलं. पण मँचेस्टर विमानतळावर, आता माहेर संपलं, अशा आविर्भावात मी रडले होते त्याच्या एक टक्काही वाईट वाटलं नाही. दीडेक वर्षांनंतर माईकचं इमेल आलं, तो भारतात येणार होता तेव्हा मात्र खूपच आनंद झाला. कॉन्फरन्स संपल्यावर मुद्दाम पाच दिवस सुट्टी काढून तो राहिला होता, आग्रहाने मला पावभाजी बनवायला सांगितली आणि माईक तेव्हा वाटला होता तसा अजिबात क्रूर नाही याची जाणीव झाली.

गेल्या वर्षाच्या शेवटी एक मित्र, एक मैत्रीण ही संस्था सोडून पुढच्या प्रवासासाठी देशाबाहेर गेले. आठवडा-दहा दिवस त्यांची कमतरता भासली, पण आहे त्यात जुळवून घेतलं. अजूनही आठवण झाली की आम्ही स्काईपवर गप्पा मारतो, जसे काही पूर्वीसारख्याच माझ्या घरात बसून कॉफी पित टवाळक्या सुरू आहेत. छान वाटतं.

पण अजूनही जुने मित्रमैत्रिणी जवळ नाहीत याचं दु:ख असं होत नाही. कदाचित पृथ्वी गोल असल्याचं अनेकदा दिसलं आहे म्हणून असेल, कदाचित कुठेही गेले तरी भेटणार्‍या त्याच आणि तशाच प्रकारच्या माणसांमुळे असेल. ही नवीन माणसं भेटतात आणि संगत सुटते तेव्हा एक मैत्र जुळलेलं असतं. लिहायला सुरूवात केली तेव्हा वाटत होतं की मला बालपण संपल्याचं दु:ख होत नाही याबद्दल लिहेन. पण आता लिहीत गेल्यावर असं वाटतंय, मला नेहेमीच खूप चांगले मित्र-मैत्रिणी मिळाले याचं खूप समाधान वाटतंय. त्याच सगळ्या मित्र-मैत्रिणींना हा लेख अर्पण!

Followers