Sunday, October 9, 2011

गुरूत्वाकर्षण नव्हे, कर्मविपाकातून अधःपतन

अलिकडेच वाचलेल्या एका संशोधनानुसार गुरूत्वाकर्षण हे खरे बल नसून ते सर्वव्यापी परमेश्वराने निर्माण केलेले कर्मविपाकामुळे होणारे अधःपतन असते. शाळांमधे भौतिकशास्त्र, उत्क्रांती, अणूरासायनिक प्रक्रिया इत्यादी पाश्चात्य विज्ञान शिकवावे का नाही यावरून चर्चा सुरू असताना, कांदा संस्थानाच्या माजी संस्थानिकांच्या देणगीतून सुरू असणार्‍या संशोधनसंस्थेतील पदार्थविज्ञानिक आचार्य दीपांकर भिर्टाचारजी यांनी त्यांच्या या नव्या 'कर्मविपाकामुळे अधःपतन' या संशोधनाची माहिती दिली. संस्थानातील विद्यापीठातच प्रौद्योगिकी भौतिकशास्त्र आणि शिक्षण या विषयांतून विद्यावाचस्पती या पदवीसाठी संशोधन करून आता तिथेच प्राध्यापक पदाचा भार सांभाळत तीन विद्यार्थ्यांना संशोधनात मार्गदर्शन करणार्‍या आचार्यांना या विषयावर अधिक बोलण्याचा वेळ देण्यात आला. आचार्यांच्या मते, "पतन होणे हे नैसर्गिकच वाटते, यात गुरूत्वाकर्षणाचा हात असावा असे वरकरणी वाटते, पण ते तसे नसून कर्मविपाकाचा जो सुंदर डाव भगवंताने मांडला आहे त्यामुळे होते. भगवंताच्या इच्छेवरून आपापल्या कर्मानुसार वस्तूंचे अधःपतन होते. गुरूत्वाकर्षणाचा नियम आपण शिकतो, पण त्याचे आकलन साकल्याने झालेले नसून त्यात अनेक त्रुटी आहेत. दोन वस्तूंमधे आकर्षण असणारे बल किती असते याचे गणित गुरूत्वाकर्षणाने मांडले आहे, परंतू हे बल येते कुठून याचे उत्तर गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत देऊ शकत नाही. खुद्द गुरू न्यूटन यांच्या वदनाचा तरजुमा असा, "मला अशी शंका आहे की माझे सर्व सिद्धांत अशा बलावर अवलंबून आहे ज्याचा शोध तत्त्वज्ञ गेली कितीक वर्षे घेत आहेत, पण त्यात त्यांना यश आलेले नाही." अर्थातच गुरू न्यूटन एका वरच्या तत्त्वाकडे, शक्तीकडे निर्देश करत आहेत. आपण पाश्चात्यांचं सरसकट अंधानुकरण करतो आहोत पण आपल्या शास्त्रांमधे निसर्गाच्या गूढरम्य विस्ताराचे आकलन मांडून ठेवले आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. उद्या कोणी हेक्टर हिल्टन जर आपली शास्त्र कशी महान आहेत असं सांगायला लागला तरच आपण आपल्या शास्त्रांना मान देऊ अशी आपली आजची शिक्षक पिढी आहे. त्यांच्यामुळे तरूणांचाही बुद्धीनाश होत असल्यामुळे हे सर्व अधःपतन थांबवण्याची जबाबदारी आपलीच आहे."

या बातमीमुळे मी आचार्यांच्या संस्थेस भेट देण्याचे ठरवले. १८५७ च्या बंडानंतर ज्ञानेश्वरांनंतर भारतीय संस्कृतीचा र्‍हास का झाला याचे संशोधन करण्यासाठी त्याच वर्षी सुरू झालेल्या महाराजाधिराज सोमशेखरनाथ संस्था, मसोसं, इथे स्थापनेपासूनच कर्मविपाक सिद्धांताचा अभ्यास आणि त्यानुसार विज्ञानाची आपल्या जुन्या शास्त्रानुसार संगतवार पुनर्मांडणी हे दोन विषय महत्वाचे समजले जातात. त्याशिवाय मसोसंमधे इतरही काही महत्त्वपूर्ण विषयांवर संशोधन होते; तिथल्या ग्रंथालयात दिसणार्‍या काही प्रबंधांच्या शीर्षकांवरून तिथल्या संशोधनाचा आवाका लक्षात येईल. उदाहरणार्थ झेंड्याचा आकार त्रिकोणी असण्याचा पृथ्वीच्या आकाराशी असणारा संबंध, न्यूटनच्या तिसर्‍या नियमांचा पुनर्जन्म आणि कर्मफलाशी असणारा अन्योन्यान्वय, केप्लरच्या पहिल्या नियमाचे मूळ भारतीयांनी शोधलेल्या शून्यात, इ. ग्रंथालयात फिरताना तिथल्या एक विद्यार्थिनी श्रीमती रतीचंद्रिकादेवी म. बाणकोटे यांच्याकडून त्यांच्या कामाची माहिती मिळाली. श्रीमती रतीचंद्रिकादेवी या आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यावाचस्पतीपदाच्या प्रबंधासाठी संशोधन करत आहेत. त्यांचा विषय हा त्यांच्या पूर्वसूरींनी केलेल्या संशोधनावर आधारित आहे. त्यांच्या संशोधनाचा सारांश असा, "न्यूटनचा पहिला नियम म्हणजेच अनंत काळ आणि जन्मोजन्मीचे फेरा ही कल्पना आहे. आमच्या पूर्वजांनी अनेक सहस्रकांपूर्वीच हा शोध लावला होता, आणि आता कुठे या पाश्चात्यांना त्याची माहिती समजली. हळदीचं पेटंट या पाश्चात्य लोकांनी चोरण्याचा प्रयत्न केला, हा ही तसलाच प्रकार आहे." त्यांच्याकडूनच समजलेले न्यूटनच्या नियमांचे भारतीय मूळ हे असे,

"भगवंताचा पहिला नियम असा देवाच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट बदलत नाही. देवाच्या हस्तक्षेपाशिवाय आपण सर्वच जन्ममृत्युच्या फेर्‍यातून जात रहाणार. तुम्ही जड वस्तूंचे नियम तेवढे पहाता, त्यात खूप गूढ गहन अर्थ दडलेला आहे. दुसरा नियम असं म्हणतो, आपले वस्तूमान 'व' आणि देवाची भक्ती करण्याचे त्वरण 'त' असेल तर भल्याकडे जाण्याचे आपले बल असेल 'तव'. अर्थात हा नियम एवढा सोपा नाही, त्याचे संपूर्ण विवरण 'खासशोध' या आचार्यांच्या ग्रंथात दिलेले आहे. आणि तिसरा नियमतर न्यूटनने शब्दाचीही अदलाबदल न करता तसाच उचलला आहे. कर्मविपाकाची आणखी वेगळी सिद्धता काय द्यावी? ही एक बाजू झाली. न्यूटनचा पाश्चात्यांना प्रचंड अभिमान वाटतो. पण न्यूटनच्या आधी कितीक सहस्रके हिंदुस्थानात गुरूत्वीय स्थिरांकाचा शोध लागला होता. हा स्थिरांक, जी, ८४ लक्ष, जेवढ्या योनी आहेत असं समजलं जातं, गुणिले हिंदू वर्षातले दिवस गुणिले आर्यभटाने आखलेल्या त्रिकोणी पृथ्वीला मंडल असणार्‍या वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच आज आधुनिक लोक ज्याला पृथ्वीची त्रिज्या म्हणतात, त्याचा व्यस्त आहे." पाश्चात्यांच्या नावाला आज वलय आहे आणि आम्हाला नोकरी देताना मात्र कोणी विचारत नाही ही खंत त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

आचार्यांच्या निवेदनानुसार हे नवीनतम संशोधन 'डॉग्मॅटीक अ‍ॅनल्स ऑफ सोसायटी ऑफ इंडीया' (दासी) आणि तरूणाईचे आवडते नियतकालिक 'भगवंताचे सृष्टीनियमन' या दोन्ही ठिकाणी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. या संशोधनांनुसार, ज्या इतर अनेक घटना फक्त गुरूत्वाकर्षणातून समजावता येत नाहीत त्या समजून घेता येतात. या प्रश्नांपैकी काही म्हणजे मृत्युनंतर माणूस 'वर जातो' ते कसे, स्वर्गाची जागा वरच्या आणि नरकाची जागा खालच्या दिशेला का असते, अवकाशातून पुष्पवृष्टी होताना फुलांना हवेचा रोध का जाणवत नाही तसेच फुलांच्या उल्का का होत नाहीत.

मसोसं आणि आचार्य यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा संस्थानातील तरूण विद्यार्थी आणि खुद्द संस्थानिक, महाराज सोमशेखरनाथ यांचे वारस आणि मसोसंचे महागुरू महाचार्य महाराज नीलेंद्रप्रताप यादव हे लवकरच पंतप्रधानांकडे एक निवेदन देणार आहेत. या निवेदनात भारतातील सर्व शाळांमधे या कर्मविपाक पतनाचा सिद्धांत शिकवावा अशी विनंती असेल. विनंती अमान्य झाल्यास खुद्द महाराजांचे दिवाण हरदासशास्त्री हे "मी दिवाण" असे लिहीलेले सोवळे नेसून उपोषणास बसणार आहेत, असेही आचार्यांनी जाहीर केले. "आम्हाला मुलांच्या हितामधेच रस आहे" असे आचार्यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

प्रेरणा
सदर संशोधनपर लेख वाचून, त्याचे आकलन करून तो इथे लिहीण्यात मला सर्वश्री राजेश घासकडवी, नंदन, Nile आणि सर्वसाध्वी प्रियाली आणि ढब्बू पैसा यांची मदत झाली त्यांचे आभार.

Saturday, October 8, 2011

स्त्रीवादाचा पुरस्कार आणि आजचे "आपण"

स्वतः कमावायला लागल्यापाहून काही दिवसांतच ज्या गोष्टीचं महत्त्व समजलं ती म्हणजे स्त्रीवाद. पुरूषी मानसिकतेतून कधी माझ्यावर अन्याय झाला तर कधी माझ्या आईवर तर कधी माझ्या मैत्रिणीवर. छोट्या मोठ्या कृतीमधूनही, अन्याय करणार्‍यालाही अन्याय करतो आहोत याची आणि जिच्यावर अन्याय होतो आहे तिलाही अन्यायाची जाणीव नसणं हे चांगलं का वाईट असाही प्रश्न अनेकदा पडतो. अशा अनेक घटना आसपास पहाताना स्त्रीवादी कार्यकर्ती, लायबेरीयाची राष्ट्राध्यक्षा एलन जॉनसन सरलीफ हिला शांतता-नोबेल पुरस्कार मिळाला ही माझ्यासारख्या सामान्य स्त्रीसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट. सरलीफ यांच्याजोडीला स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणार्‍या लायबेरीयाच्याच लेय्मा ग्बोवी आणि येमेनमधले लोकशाहीवादी कार्यकर्त्या तवक्कुल कारमन यांना पुरस्कार मिळाला. समानतेसाठी झगडा मांडणार्‍या तिघींचा नोबेल पारितोषिकाने सन्मान व्हावा या बातमीनेच समानतेच्या तत्त्वावर विश्वास ठेवणार्‍या सर्व स्त्री-पुरूषांना आनंद व्हावा. दिवसाची सुरूवात व्हावी तर अशी!

आजूबाजूला पहावं तर काय दिसतं? लग्न झाल्यानंतर अनेक स्त्रिया राजीखुशीने आपलं नाव बदलतात. नाव असो वा आडनाव, गेली अनेक वर्ष आपली जी ओळख आहे तीच बदलायची, एवढं की फेसबुकावर फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर फोटो पाहिल्याशिवाय आपली बालमैत्रीण ओळखता येऊ नये ही अतिशय दु:खद गोष्ट वाटते. "मुली, चालून दाखव" "गाणं म्हण" वगैरे गोष्टी थिल्लर वाटतातच पण आजही भारतात अनेक समाजांत ही पद्धत सुरू आहे. आपल्याच वयाच्या मुलींना अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं हे समजल्यावर त्यातलं क्रौर्य जास्तच चांगलं समजलं. स्त्रियांवर होणार्‍या अन्यायांची यादी बनवायची तर त्याला अंत नाही; पण मला हा मुद्दा आज फार महत्त्वाचा वाटत नाही.

स्वातंत्र्याबरोबरच येते ती जबाबदारी. आपण आपलं स्वतंत्र अस्तित्त्व मिळवायचं तर त्याबरोबर येणार्‍या जबाबदारीची जाणीव आजच्या स्त्रियांमधे कितपत आहे? पुरूषाच्या शरीरात स्त्रीच्या शरीरापेक्षा जास्त स्नायू असल्यामुळे शारीरिक क्षमतेमधे स्त्रियांपेक्षा पुरूष वरचढ ठरतो यात वाद नाही. भरलेला सिलेंडर सामान्य स्त्री आपल्या घरात ट्रॉली वापरून फिरवू शकते, पण कदाचित चार पायर्‍या चढून लिफ्टमधे ठेवणं तिला शक्य नाही. असे काही क्षुल्लक अपवाद वगळता आज वरपांगी मुक्त दिसणार्‍या स्त्रियाही आपली जबाबदारी ओळखून आहेत का? घरातली कामं करण्यात पुरूषाने हातभार लावावा हे जेवढं खरं आहे तेवढंच घरातल्या सुतारकाम, माळीकामात स्त्रीनेही मदत करावी ही जबाबदारीची जाणीव आहे. घर चालवण्याची जबाबदारी पूर्वीच्या परंपरेत पुरूषावर होती, पण जर पुरूषी मानसिकतेचा विरोध करायचा असेल तर घर चालवण्याची जबाबदारी स्त्री आणि पुरूष दोघांची आहे याचीही जाणीव स्त्रीला हवी. लग्नानंतर नाव बदलायचं नसेल तर आपण स्त्री असण्याचे फायदे मिळत असतानाही ठोकरण्याची कर्तबगारी स्त्रीमधे असावी. "माझ्यावर अन्याय झाला आहे" असा फक्त ओ-रडा करण्यापेक्षा तो अन्याय कमी, नष्ट कसा होईल याचा प्रयत्न करणं हे अतिशय सकारात्मक पाऊल उचलल्याशिवाय बदल होणे शक्य नाही. नावडती गोष्ट घडल्यास रडणं हा मानवी स्वभावच आहे, पण आपल्या रडण्यामुळे नको त्या ठिकाणी आपल्याला सहानुभूती मिळते ती गमावण्याची स्त्रीची तयारी असावी.

पारंपारिक मनस्थितीच्या सर्व स्त्री-पुरूषांना स्वतंत्र अस्तित्त्व असणारी स्त्री अनेक पैलूंमुळे स्त्री वाटतच नाही. १९४० च्या दशकात सिमोन दी बोव्वार हिने Le deuxième sexe (द सेकंड सेक्स) लिहीताना जी तक्रार केली ती आज आपल्या समाजातही दिसतेच; स्वतंत्र विचारांची, बुद्धीची व्यक्ती स्त्री असूच शकत नाही इथपर्यंत आरोप होतात. नवीन विचारांचा, मूल्यांचा अभ्यास करून, तर्काच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पहाणार्‍या पुरूषाला समाजात जेवढा त्रास होतो त्यापेक्षा किंचित जास्त त्रास स्त्रियांना होतो. एक स्त्री शिकली की सर्व कुटुंब शिकतं असं म्हणतात; या जबाबदारीतून आजही स्त्रीची मुक्तता नाहीच. पण 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' आणि या यातना सहन करूनही आपल्या समानतेच्या मूल्यांवर विश्वास ठेवण्याची शक्ती प्रत्येक स्त्री-पुरूषांत असावी.

Friday, September 16, 2011

डॉ. स्ट्रेंजलव्ह ... आणि माझं स्फोटांवर प्रेम जडलं

"डॉ. स्ट्रेंजलव्ह" हा चित्रपट आपण पाहू या असं माईकने घरात जाहीर केलं तेव्हा सर्व ब्रिटीश घरमित्रांनी जोरात "हेऽऽऽ" करत गलका केला. त्यांच्या लेखी आम्ही काही "फकिन' फॉरीनर्स" मात्र एकमेकांकडे "हे काय नाव झालं का?" अशा चेहेर्‍यांनी पहात होतो. अर्थात असलं काहीतरी नाव बनवून आम्हाला बनवण्याचा म्याडपणा माईक करू शकतो अशीच खात्री त्यात जास्त होतो. तो दाणदाण पावलं वाजवत डीव्हीडी घेऊन टीव्हीरूममधे आलाही.

"Dr Strangelove: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb" असं नाव असणार्‍या चित्रपटाबद्दल प्रचंड कुतूहल पोस्टर बघूनच निर्माण झालं. सबटायटल्सशिवाय समजणारा हा चित्रपट अशी एक टुकार ओळख मी करून देऊ शकते. चित्रपटाची गोष्ट विकिपीडीयावर, आयएम्डीबीवर आहे तर मी ती ही सांगत नाही. या चित्रपटाची गोष्ट सांगण्यापेक्षा त्यातल्या छोट्याश्याच विनोदी गोष्टी सांगून चित्रपट बघण्यासाठी वाचकांना उद्युक्त करावं असा माझा विचार आहे. फक्त त्यासाठी चार ओळींची पार्श्वभूमी: शीतयुद्धाच्या काळात हा चित्रपट घडतो. रश्या आणि अमेरिकेची शस्त्रास्त्र स्पर्धा, अंतराळ स्पर्धा आणि शांतीस्पर्धाही जोरदार सुरू आहे. एक म्याड अमेरिकन ब्रिगेडीयर जनरल रिपर, रश्याच्या आण्विक भट्ट्यांवर हल्ला करण्याचा फतवा काढतो. बराचसा चित्रपट अमेरिकेत घडलेला दाखवला आहे.

  • दोघांचं भांडण सोडवण्यासाठी तिसरा त्यांना ओरडतो, "Gentlemen, you can't fight in here! This is the War Room!"
  • डॉ. स्ट्रेंजलव्ह अमेरिकन राष्ट्राध्यक्षाही संबोधताना दोनदा 'माय फ्यूरर' असं म्हणतो आणि स्वतःची चूक सुधारत 'द प्रेसिडंट' म्हणतो. त्याचा एक हात नाझी झालेला असतो. दुसर्‍या हाताने तो हा नाझी हात सतत दाबायचा प्रयत्न करत असतो. पीटर सेलर्सचा डॉ. स्ट्रेंजलव्ह झबरदस्तच आहे.
  • पीटर सेलर्सच्या एकूण तीन भूमिका या चित्रपटात आहेत. त्याने रंगवलेला ब्रिटीश आर्मीतला 'एक्सचेंज ऑफिसर' मँड्रेकही तेवढाच मजेशीर आहे. आपला बॉस रिपर याने विमानं मागे बोलवावीत यासाठी सदैव त्याचे क्षीण प्रयत्न सुरू असतात
  • मँड्रेकला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला लवकरात लवकर फोन करून कोड सांगायचा असतो. इतर सर्व फोन लाईन तुटल्यावर तो पे-फोनचा वापर करतो. खिशातली नाणी संपत आली म्हणून तो अमेरिकन ऑफिसरला कोकाकोलाच्या मशीनवर गोळी घालून नाणी काढायला सांगतो. त्या ऑफिसरने मँड्रेकला "राष्ट्राध्यक्षाला तुझ्याशी बोलायचं नसेल तर कोका कोला कंपनी तुझ्यावर नुकसानीचा दावा गुदरेल" अशी धमकी देणं 'प्रसंगानुरूप'च म्हणायचं.
  • टर्जीड्सन हा कडवा राष्ट्रवादी जनरल शांतताप्रेमी राष्ट्राध्यक्षाला सतत उचकवण्याचा प्रयत्न करत असतो. जेणेकरून रश्यावर आता एवीतेवी हल्लाबोल केलेला आहे तर मग आणखी बॉम्ज टाकू या. त्याचे संवाद इथे देण्यात अर्थ नाही आणि जॉर्ज स्कॉटच्या हावभाव, देहबोली, अभिनयाबद्दल लिहीणं अशक्य आहे.
  • अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि (ऐकू न येणारा) रशियन प्रीमीयर यांच्यातले सगळेच फोन-संवाद (का मोनोलॉग्ज?) हहपुवा आहेत. अमेरिका आणि रश्याने एकत्र येऊन अमेरिकन विमानांनी रश्यावर हल्ला करू नये याची उपाययोजना करताना अमेरिकेने आपल्या विमानांचं गंतव्य स्थान रश्याला सांगणं हा त्यातलाच एक महान प्रकार.
  • एअरफोर्स पायलट्सना 'इमर्जन्सी'साठी जो किट दिलेला असतो त्याची यादी वाचली जाते. प्रत्यक्षात काय दिलं जातं याची मला कल्पना नाही. तो भयंकर मोठा विनोद आहे; त्यावर तो वाचणाराच म्हणतो, "एवढ्या सामुग्रीवर व्हेगासमधे चिक्कार मजा करता येईल."
  • शेवटी काही ठराविक लोकांनी खोल खाणीत जाऊन लपावं असं डॉ. स्ट्रेंजलव्हच्या सूचनेवरून ठरतं. मानवजात वाचवण्यासाठी खाणीत रहाणार्‍या पुरूषांना एक-स्त्री-व्रत तोडावं लागेल काय असा प्रश्न अमेरिकन टर्जीड्सनला पडतो. मूळचा जर्मन, नाझी डॉ. स्ट्रेंजलव्ह त्याला 'खेदाने' होकार देतो. आणि या सर्व कल्पनेला उचलून धरतो तो रश्यन राजदूत, " I must confess, you have an astonishingly good idea there, Doctor."
तुम्हीच तो चित्रपट पहा, पोटभर हसा.

१९६४ साली "डॉ. स्ट्रेंजलव्ह" आला. चित्रपट संपूर्णतः कृष्ण-धवल आहे. दृष्टीसुख म्हणावं तर फारसं काही नाही; विमानांचे शॉट्सही अगदी साधे आहेत. पण हा चित्रपट त्याहीपेक्षा वरच्या स्तराचा आहे, ज्याचं वर्णन इंग्लिशमधे सेरेब्रल मूव्ही असं करतात. आर्मी शिस्तबद्ध ऑफिसर्स असले तरीही ती माणसंच असतत, आपले हेवेदावे, आपले विचार, आपलं युद्धखोर तत्त्वज्ञान तत्वज्ञान इतरांवर लादून ते सर्वनाशही घडवून आणू शकतात. शांतताप्रेमी युद्धविरोधक अशा माणसांच्या हाताखाली असूदेत वा देशाचा सर्वेसर्वा युद्धखोरांमुळे होणारं नुकसान टाळता येत नाही. आपला अजेंडा पुढे रेमटवण्यासाठी पोकळ तत्वज्ञानाच्या बढाया मारणारा रिपर आणि विरोधकांना नेस्तनाबूत करण्याच्या गफ्फा हाणताना विरोधकांच्या बुद्धी-शक्तीला कमी लेखून सर्वच जगावर संकट आणणारा टर्जीड्सन या वृत्ती प्रत्यक्ष आणि आभासी जगातही दिसून येतात. त्यांचा तोंडावर विरोधक दिसणारा रश्यन राजदूतही त्यांच्याच कंपूत सामील होणारा निघतो आणि "कोणत्याही प्रकारे आपण आधी विध्वंस करायचा नाही" असं म्हणणारा राष्ट्रध्यक्ष असूनही हतबल होतो.

स्वतःवरच हसणार्‍या, विनोद करणार्‍या, भडक उजव्या विचारसरणीच्या रिपर आणि टर्जीड्सनला बराचसा हास्यास्पद आणि थोडासा खुनशी दाखवणारा, आपल्या देशाच्या न पटणार्‍या पॉलिश्यांवर विनोदी, विसंवादी पद्धतीने टीका करणारा स्टानली कुब्रिक आणि त्याचा "डॉ. स्ट्रेंजलव्ह" आवडला नाही तरच नवल.

Thursday, April 7, 2011

अगोरा

अनेक 'यशस्वी' चित्रपट पाहिल्यानंतर काय सापडतं? विशेषतः तो चित्रपट ऐतिहासिक काळातल्या घटनांवर बेतलेला असेल तर? आजही फार काही वेगळं दिसत नाही आणि मुळात मानवी स्वभाव बदलत नाही. भाषा, वेशभूषा, तंत्रज्ञान बदलतं पण स्वभावाला औषध नाही. जमावाला तुच्छतावाद शिकवला की सत्ता हस्तगत करता येते, असलेली सत्ता अबाधित राखता येते. दुसर्‍या जमावाला तुच्छ लेखण्यासाठी भाषा, धर्म, जात, प्रांतिक ओळख किंवा इतर काही मानवनिर्मित ओळख असेल किंवा वंश, लिंग अशी निसर्गनिर्मित असेल. 'अगोरा' हा अलेहांड्रो अमेनाबार या दिग्दर्शकाचा चित्रपट पाहून सर्वप्रथम आठवला तो वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळ्या जमावाप्रती दाखवलेला तुच्छतावाद.

चित्रपट घडतो साधारण इ.स. चौथ्या शतकात इजिप्तमधल्या, अलेक्झांड्रीया शहरात. रोमन साम्राज्याचा अस्त होण्याचा, पेगन पद्धती मागे पडून ख्रिश्चॅनिटीची भरभराट होण्याचा हा काळ! हायपेशिया ही तत्त्ववेत्ती चित्रपटातली प्रमुख व्यक्तीरेखा आहे. पेगन हायपेशिया खगोलशास्त्राची शिक्षिका आहे, तिचे वडील थिऑन हे अलेक्झांड्रीयाच्या पेगन ग्रंथालयाचे प्रमुख आहेत. पेगन आणि ख्रिश्चन समाजातही बुद्धीवादी थिऑन आणि हायपेशिया यांना मान आहे. सुंदर आणि तरूण हायपेशियाला लग्न करण्यात, व्यक्तीगत आयुष्यात फारसा रस नाही. सामाजिक आणि धार्मिक बदल घडत असताना एकीकडे आकाशातल्या ज्योतींबद्दलचे पारंपारिक विचार हायपेशिया तिचे तरूण, उच्चवर्गातील विद्यार्थी, ओरेस्टेस, सायनेसियस आणि तसेच गुलाम दावूस, इत्यादींना शिकवत असते. ओरेस्टेस आणि दावूस या दोघांचंही हायपेशियावर प्रेम असतं. ती, जशी आहे तशी, स्वीकारण्याची ओरेस्टसची तयारी नसते आणि दावूस जसा आहे तसा, स्वीकारण्याची तिची तयारी नसते म्हणून ती तत्त्वज्ञान आणि खगोलशास्त्र यांच्या अभ्यासालाच सर्वस्व समजते. टॉलेमीच्या विचारधारेवर विश्वास ठेवणार्‍या हायपेशियाच्या हार्मनीबद्दल वेगळ्या कल्पना नाहीत, प्राचीन ग्रीकांप्रमाणेच वर्तुळ हाच अचूक आकार आहे, यावर तिचाही विश्वास आहे. पण त्याही बरोबरच नवीन पद्धतीचा विचार विद्यार्थ्यांनी मांडल्यास, त्याचं स्वागत करण्यात तिला कमीपणाही वाटत नाही. आपल्या कामात गर्क असणार्‍या हायपेशिया आणि इतर बुद्धीवादी पेगन लोकांचा सामान्य जनतेशी फारसा संपर्क राहिलेला नाही.

एकीकडे ख्रिश्चन समाजाची वाढत्या ताकदीला सीरिल नामक धर्मगुरू उन्मादाचं रूप देण्यास सुरूवात करतो. त्याच्या नेतृत्त्वाखाली अनेक ठिकाणी ख्रिश्चन समाज पेगन देवतांची विटंबना करण्यात मग्न असतो. दुसर्‍या बाजूने अधिकाधिक लोकांना ख्रिस्ताचा करूणा, प्रेम, दया हा संदेश सांगूनही ख्रिश्चॅनिटीकडे ओढण्याचं कामही सिरील करत असतो. एका बेसावध क्षणी, पेगन धर्मगुरू आणि त्याच्या जोडीला ग्रंथालय प्रमुख, थिऑन, पेगन समाजाला देवतांच्या विटंबनाचा बदला घेण्यासाठी, पेगन समाजाला ख्रिश्चन समाजाविरूद्ध हत्यार उचलण्याची अनुज्ञा देतात. हायपेशियाचा हिंसेला विरोध मान्य करून तिचे अनेक विद्यार्थी या संघर्षापासून लांब रहातात तरीही ओरेस्टस पेगनांच्या बाजूने हत्यार उचलतो. ख्रिश्चनांची वाढती संख्या पाहून पेगन, सेरापियम या त्यांच्या ग्रंथालयाचा आश्रय घेतात. काही दिवसांनी रोमन साम्राज्याकडून पेगन लोकांना माफ केल्याचा हुकूमनामा येतो पण त्यांना त्यांचं ग्रंथालय, ग्रंथांसकट ख्रिश्चनांच्या हवाली करावं लागतं. ग्रंथालय सोडून पळून जाताना, हायपेशिया, थिऑन, ओरेस्टस आणि पेगन विद्यार्थी, जमतील तेवढे ग्रंथ आणि चीजवस्तू वाचवण्याचा प्रयत्न करतात. या गदारोळात हायपेशियाकडून दावूसचा अपमान होतो आणि ती ओरेस्टसच्या मदतीने महत्त्वाचे ग्रंथ घेऊन तिथून निसटते. पेगन विद्यार्थ्यांच्या हिंसेचा बदला सेरापियम नष्ट करून ख्रिश्चन लोक घेतात.

द्रष्ट्या नेतृत्वाच्या अभावामुळे सीरिलला पुढे महत्त्व मिळतं. त्याची भडकाऊ भाषणं आणि वागण्यामुळे बराचसा पेगन समाज ख्रिश्चन होतो आणि ज्यू समाज अलेक्झांड्रीयामधून हद्दपार होतो. सीरिलचा लोकसंग्रह आणि पाठींबा वाढतच जातो. तेवढ्यावरच सीरिल समाधानी नसतो. त्याला अलेक्झांड्रीयाचा सर्वेसर्वा होण्यात, स्वत:चं संपूर्णपणे निरंकुश साम्राज्य निर्माण करण्यातच रस असतो. दावूसबद्दल आपलेपणा वाटणारी हायपेशिया, ग्रंथालयातून निघून जाताना, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करते; ग्रंथ वाचवण्यासाठी, तिचा ओरेस्टसबरोबर जाण्याचा निर्णय संपूर्ण अलेक्झांड्रीयाचं, तिथल्या समाजाचं, कदाचित खगोलविज्ञानाच्या प्रगतीचं आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अस्तित्त्वाचंही भवितव्य ठरवतो का?

हायपेशियाचा रस फक्त खगोलविज्ञान आणि तत्त्वज्ञानात असतो. प्रयोगांची निरीक्षणं आणि त्यातून निघणारी अनुमानं जर टॉलेमी किंवा इतर कोणा ज्ञानी पूर्वसूरींच्या निष्कर्षांच्या विपरीत असतील तरीही त्या अनुमानांवर विश्वास ठेवणार्‍या हायपेशियाबद्दल आदर वाटतो. पण सामाजिक, राजकीय परिस्थितीचा अंदाज नसणारी हायपेशिया व्यक्तिगत निर्णय घेताना, गडबडीच्या क्षणी गुलामाला त्याच्या गुलाम असण्याची जाणीव करून देताना सामान्य वाटते; कदाचित आपल्या एका निर्णयामुळे सीरिलसारखा हिंसक, अविचारी धर्मगुरू जिंकला ही पराभवाची जाणीव तिला बरीच उशीरा होते.

असामान्य बुद्धीमत्तेचा लोकसंग्रहाशिवाय उपयोग होत नाही; समाजापासून बुद्धीवादी फटकून वागले, आपल्याच हस्तिदंती मनोर्‍यात ग्रह-तार्‍यांमधेच रममाण राहिले म्हणून सीरिलसारखा, लोकांना अज्ञानात ठेवणारा लोकसंग्रह करू शकला आणि त्या जोरावर ठोकशाही मार्गाने सत्ता हस्तगत करू शकला. चौथ्या शतकात (म्हणे) हायपेशियाला ग्रहांच्या दीर्घवर्तुळाकार कक्षांचा शोध लागला. दीर्घवर्तुळातली हार्मनीही* तिने शोधून काढली. पण गॅलिलेओपर्यंत भूकेंद्री विश्वाची संकल्पना सर्वत्र मान्य होती. १७ व्या शतकातल्या योहान्नेस केप्लरपर्यंत ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार असल्याचा समज होता. एक हजार वर्षांच्या अंधारयुगात वैज्ञानिक विचार आणि दृष्टीकोन मागे पडला, धर्मसत्तेचं समाजावर प्राबल्य राहिलं आणि उरला तो वेगवेगळ्या प्रकारचा तुच्छतावाद. आजही एकविसाव्या शतकात धर्म, भाषा, जातींच्या आधारावर हिंसा होते आणि त्याला समाजाच्या काही गटांमधून का होईना, पाठिंबा मिळतोच.

*दीर्घवर्तुळाच्या (ellipse) परीघावरील कोणत्याही बिंदूच्या दोन्ही नाभींपासूनच्या (foci) अंतराची बेरीज समान असते.

हा लेख इथेही प्रसिद्ध केला आहे, त्यावरचा हा प्रतिसाद वाचनीय आहे.

Thursday, February 24, 2011

नर्मदा बचाव आंदोलन: एक संवाद

१६ फेब्रुवारीला IISER (Indian Institute for Science Education and Research) पुणे इथे श्रीपाद धर्माधिकारी यांचं On Narmada Struggle and Beyond या विषयावर व्याख्यान होतं. श्रावण आणि मी तिथे गेलो होतो.

'नर्मदा बचाव आंदोलना'ची त्यांनी ओळख करून दिली. फक्त पाण्याच्या फुगवट्यामुळेच लोकं विस्थापित झालेले असं नाहीत तर १९६२ साली नेहेरूंचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी ज्या शेतकर्‍याची जागा 'तात्पुरती' घेतली ते कुटुंबही आज अनअफिशियली विस्थापितच आहे. (अशा छोट्या छोट्या गोष्टी मला माहित नव्हत्या.) ती जमिन परत मिळेल असं सांगून घेतली, पण ती तर जमीन गेलीच शिवाय कॉलनी उभी करण्यासाठी इतर सहा कुटुंब विस्थापित झाली. ही सुरूवात होती. पुढे काय काय घडत गेलं याचा घटनाक्रम त्यांनी सांगितला. फार तपशीलात आत्ताच शिरत नाही. आंदोलन सुरू झालं तेव्हा मी अक्षरओळख शिकत होते, त्यामुळे तुमच्यापैकी अनेक लोकांनाच माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. त्यामुळे त्यातले काही मुद्दे जे मला ठळकपणे आठवतात ते लिहीते.

१. आंदोलनाचा मुख्य हेतू - हा प्रकल्प देशाच्या भल्यासाठी आहे हे सिद्ध करा. सरकारची भूमिका - तुम्ही कोण हे विचारणारे?
२. आंदोलनाचा 'दुसरा' हेतू - प्रकल्पग्रस्तांना योग्य भरपाई, आणि प्रकल्पग्रस्त म्हणजे फक्त पाण्याच्या फुगवट्यात ज्यांची घरं, शेती जाणारे तेच नाहीत, तर ज्यांच्या उत्पन्नाचा स्रोत जाणार आहे ते सगळे. उदा: सरदार सरोवर ते अरबी समुद्र या भागातले, नर्मदेत मासेमारी करणारे.

काही प्रश्नोत्तरं:
१. आंदोलनाची सुरूवात १९८५ साली झाली तर न्यायालयात जायला नव्वडीचं दशक का उजाडलं?
आधी सरकारचा पाठपुरावा केला. पत्रं लिहीणं, मागण्या करणं या सगळ्यानंतरही जेव्हा धरणासाठी काम सुरू झालं तेव्हा प्रकरण न्यायालयात नेलं. बोलताना केलेली कमेंट, "न्यायालयात न्याय मिळण्याची शक्यता आत्तापेक्षा ८० च्या दशकात जास्त होती."
२. माहितीचा अधिकार ही अलिकडच्या काळातली गोष्ट आहे, तेव्हा धरणासंदर्भात माहिती कशी मिळवली?
With difficulty (माझे शब्द). काही सहानुभूती असणारे सरकारी कर्मचारी
३. रस्ते, रेल्वे बांधतात तेव्हा विस्थापित होतात, ते आंदोलन करताना दिसत नाहीत काय?
गावातल्या एका, काही शेताचा भाग जाणं वेगळं, त्याची भरपाई गावातूनच करता येते. धरण बांधतात तेव्हा संपूर्ण गावच पाण्याखाली जातं.
४. सरदार सरोवर तयार झालं आहे, धरण नकोच अशी भूमिका आधी आंदोलनाची होती. आंदोलन हरलं नाही का?
मूळ भूमिकाच पकडून ठेवायची तर हो. पण सामान्य खेडूतांना जिथे सरकारी कर्मचारी एका डेस्कावरून दुसर्‍या डेस्कावर नाचवत होते तिथे तेच सरकारी बाबू त्यांच्या पाठी पाठी यायला लागले. आंदोलनात स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. स्त्रियांचं सबलीकरण हे आंदोलनाचं आणखी एक यश.
५. श्रीमंत शेतकर्‍यांचा सहभाग
आर्थिक सहभाग होता, फार वेळ दिला नाही तरी!
६. धरण बांधता आलं नाही तर प्लॅन बी होता काय?
नाही. कधीच नव्हता. धरण बांधायची घोषणा १९६२ साली करून प्रत्यक्षात काम ८० च्या दशकात सुरू झाल्यामुळे स्वयंसेयी संस्थांच्या मदतीने अनेक खेड्यापाड्यांमधे छोटे बंधारे, रेन वॉटर हार्वेस्टींग सुरू झालं. गुजराथचं शेतकी उत्पादन २००९ साली ९.५% ने वाढलं आणि ती वाढ सौराष्ट्र आणि कच्छ या सेमी-आरीड भागांमधून झाली आहे. भूजल पातळीत २.५ पट वाढ झाली.
७. देशाच्या इतर भागांमधून आंदोलनात सहभाग कितपत होता?
बर्‍याच मोठ्या शहरांमधे आंदोलनाला पाठिंबा मिळाला. सौराष्ट आणि कच्छला पाणी मिळणार असा प्रचार गुजराथमधल्या पाठ्यपुस्तकांमधून होतो. त्यामुळे आंदोलनाला त्यांचा विरोध होता. पण साधारण १/४ सौराष्ट्र आणि कच्छचा १०% भाग यांनाच पाणी मिळणार होतं. त्यामुळे "आमच्या नावावर प्रचार करू नका" अशी मागणी त्या भागांमधूनही झाली.
८. आत्तापर्यंत हे आंदोलन अहिंसक पद्धतीने सुरू होतं, पुढे?
माहित नाही.
९. अलिकडे बातम्यांमधे नर्मदा आंदोलनाबद्दल ऐकायला येत नाही. अपडेट्स?
विस्थापितांचे प्रश्न सोडवणे, आणखी विस्थापन होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेतच.
आंदोलन २५ वर्ष सुरू आहे. न्यूज व्हॅल्यू फारशी नाही. एखादं आंदोलन किती वर्ष पहिली बातमी बनणार? (विनीलच्या अपहरणामुळे आत्ता फेसबुक वापरणारे आणि आदिवासी एकाच बाजूने बोलत आहेत. अजून काही महिन्यांनी?)

Wednesday, February 23, 2011

प्रिय विनील

ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र. त्यांच्या परवानगीनेच येथे प्रसिद्ध करते आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रिय विनील,

परवा मध्यरात्री एका जिल्हाधिकारी मित्राचा फोन आल्यापासून झोप उडालीय. म्हणाले, ‘माओवाद्यांनी विनीलला डिटेन केलंय’. फोन कलेक्टरांचाच असल्यामुळे बातमीची खातरजमा करण्याचा प्रश्नच नव्हता. मग निष्फळ फोनाफोनी सुरु झाली. काय झालंय हे समजून घेण्यासाठी फक्त. तपशील समजले. डिटेन नव्हे तर अपहरणच. पण उपयोग काय?

रात्री दोन वाजता एका मित्र एसपींचा (पोलीस अधीक्षक) फोन आला. माझ्याकडून त्यांना तपशील पाहिजे होते. मी काय कप्पाळ तपशील देणार? ते पूर्वी मलकनगिरीत एसपी होते. “कशाला असं सिक्युरिटी न घेता नक्षल भागात फिरता रे?” कळवळ्याने ते म्हणाले. त्यांची अस्वस्थता माझ्या लक्षात आली. तुझ्यावर सगळेच पोलीस वैतागले असले तर आश्चर्य नाही रे. तुझ्यावर आख्खी एस्टॅब्लिशमेंटच वैतागली असणार. अस्वस्थ करण्याची शक्ती घेऊनच जन्माला आलायस.

तू मयूरभंजमध्ये आयएएस प्रोबेशनर असतानाच एखाद्या कार्यकर्त्यासारखं स्वत:ला झोकून दिलं होतंस. मोटरसायकल घेऊन सिमलीपालच्या जंगलात वेळी-अवेळी एकटाच जायचास. आदिवासी पाड्यांवर फिरायचास. त्यांना जवळून बघायचास. त्यांच्यासाठी योजनांमध्ये, नियमांमध्ये अपवाद करण्यासाठी कलेक्टरांशी बोलायचास. आम्हाला सिमलीपाल दोनच गोष्टींसाठी माहीत होतं – पर्यटन स्थळ, आणि नंतर माओवाद्यांचा अड्डा. तू याच्या पलीकडे गेला होतास. वयाच्या पंचविशीतच. ही समज घेऊनच तू जन्माला आला होतास.

तुला एका ठिकाणी पोस्टिंग मिळालं, आणि त्याचवेळी कंधमाळमध्ये धार्मिक दंगली सुरु झाल्या. या दंगलींना आदिवासी विरुद्ध दलित असा कुठेही न सापडणारा रंग होता. सरकारला एक कलेक्टर, एक एस्पी आणि एक सबकलेक्टर हवा होता. टू फिक्स द थिंग. आणि चारच महिन्यांत तुला डिस्टर्ब करुन कंधमाळला पाठवला. तुम्ही तिघांनी तिथे अजोड कामगिरी केलीत. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा पूर्वग्रहही तुमचे काम झाकोळू शकला नाही.

मलकनगिरी जिल्हाधिकारी पदासाठी तुझी निवड झाली तेंव्हा बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले. एवढे चांगले काम करणाऱ्याला ही शिक्षा? हाच अनेकांचा प्रश्न होता. मलकनगिरीमध्ये कुणी पाय ठेऊ धजत नाही. नक्षलवाद्यांची अघोषित राजधानी. पण सुजाण मुख्यमंत्री इथे कर्तव्यकठोर अधिकारीच पाठवतात हे फार थोड्या जणांच्या लक्षात येते. तुझ्याअगोदर इथे नितीन जावळेंनी चांगल्या कामांचा पायंडा पाडून ठेवलेला होताच. तुझे ग्राऊंड बऱ्यापैकी तयार होते. तू त्यावर सुंदर बाग फुलवलीस. मलकनगिरीत आजमितीस तू जेमतेम एक वर्ष पूर्ण केलेस. लाल दिव्याच्या गाडीचे तुला कधीच आकर्षण नव्हते. मलकनगिरीत त्याची गरजही नव्हती तुला. नाडलेल्या आदिवासींना मदत करण्यासाठी तुला कशाचीच गरज नव्हती. मनासारखे काम करता येण्यासाठी तुला फक्त स्वातंत्र्य आणि एक यंत्रणा हवी होती. ती तुला मिळाली.

तुझ्या मनात या आदिवासींसाठी इतके प्रेम आहे की तुला भीती म्हणून काय ती नाहीच. या भागात दुसरा एखादा अधिकारी काय करेल? एकतर बाहेर पडायचे नाही. पडले तर हेवी सिक्युरिटी असल्याशिवाय नाही. आर ओ पी (रोड ओपनिंग पार्टी) आधी पुढे जाणार. लॅण्डमाइन्स तपासणार. साग्रसंगीत उपचार होणार. अर्धा दिवस त्यातच जाणार. मग आपलं भोज्जाला शिवून अधिकृत भेट उरकून अंधार पडायच्या आत आपल्या सुरक्षित ठिकाणी परत यायचं. पण तुझी रीतच न्यारी. तू आणि तुझा ड्रायव्हर. पीएसओ नाही, आरओपी नाही. हत्यार तर नाहीच नाही. जिथंपर्यंत गाडी जाईल तिथंपर्यंत जायचं. जिथं रस्ता संपेल तिथं तुला घ्यायला एखादा तहसीलदार, एखादा बीडीओ, एखादा इंजिनियर आलेला असायचा. मोटरसायकल घेऊन किंवा चालत. जेवण त्यांच्यासोबतच. सगळं एकदम शिवाजी महाराज स्टाइल. लोकांच्यात बसायचं. बोलायचं. आणि जे करता येण्यासारखं असेल ते लगेच करायचं. जे करता येण्यासारखं नाही, ते त्यांना समजावून सांगायचं.

हे एवढं आदिवासींसाठी खूप होतं. तू त्यांच्यासाठी वनवासात आलेला रामच जणू.

आदिवासी गांजलेले. एका बाजूने नक्षल. दुसऱ्या बाजूने पोलीस, सीआरपी. दोन्हीकडून मार. खायची मारामार. नक्षलवाद म्हणजे काय हे त्यांना कुठून समजणार? नक्षलींनी आदिवासींची पोथी बरोबर वाचलेली होती. त्यांची मनं जिंकायची त्यांना गरजच नव्हती. जे त्यांना जरा बरे वाटत, त्यांना ‘रिक्रुट’ करीत. बाकीच्यांचा काही फरक पडत नसे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी स्वत: त्यांच्या पाड्यावर येत असेल तर त्यांना तुझ्यात देव दिसल्यास नवल नाही.

हे आम्हाला आज समजलं. तुला नक्षलवाद्यांनी पकडून नेल्यावर ज्या गावातून तुला त्यांनी नेलं, त्याच गावातल्या आदिवासींनी उत्स्फूर्त मोर्चे काढले, तुला सोडावा म्हणून. सगळं मलकनगिरी बंद आहे आज. कुणीही न सांगता. तू याआधी काम केलेला कंधमाळ जिल्हाही बंद आहे. तोही तसाच. उत्स्फूर्तपणे. ज्या आदिवासींसाठी काम करत असल्याचा दावा नक्षल करतात, त्याच आदिवासींनी नक्षलांना ठणकावून सांगितले, आमच्या कल्याणाची काळजी असेल, तर अगोदर कलेक्टरांना सोडा. आम्हाला तेंव्हा कळलं, तू काय आणि कसं काम करतोयस ते. आज सगळ्या राज्यात निदर्शने चालू आहेत. कलेक्टरसाठी नाही, तर विनीलसाठी.

एक फार मोठा विरोधाभास आज लोकांना पहायला मिळाला.

कुडमुल्गुमा नावाच्या दुर्गम ब्लॉकमध्ये तू गेला होतास. जनसंपर्क मेळाव्यासाठी. तिथं जाणं सोपंही नाही, आणि शहाणपणाचंही नाही. रस्त्या-रस्त्यावर सुरुंग लागलेले असतात. तू गेलास ते गाव तर भलतंच कुप्रसिद्ध. हे कुडमुल्गुमा त्याच भयावह बालिमेडा जलाशयाच्या जवळ, जिथे दोन वर्षांपूर्वी जवानांनी भरलेली आख्खी बोट नक्षल्यांनी बॉंबहल्ल्याने बुडवली होती. हा ‘त्यांचा’ इलाका. पंधरा ग्रामपंचायती त्यांच्या. या भागात सरकारी माणसानं यायचं नाही. पोलीस, सीआरपी तर लांब.

तू इथे जायचास. एकदा नाही, दोनदा नाही, नेहेमी. खरं तर तू इथेच, १५१ गावांवर, कट ऑफ गावांवर, तुझं लक्ष केन्द्रित केलंस. तू जाऊ लागलास, आणि लोकांनाही वाटलं इथं काम होतंय. इथल्या लोकांनी एकदा मागणी केली, आम्हाला ब्लॉक ऑफिस लांब होतंय, तर तू थेट त्या गावांमध्ये गेलास, आणि ब्लॉक ऑफिस आठवड्यातून एक दिवस तिथे, असं खरंच चालू केलंस देखील. लोकांमध्ये जसजसा प्रिय होत गेलास, नक्षली वेट अॅण्ड वॉच करत राहिले असावेत बहुदा, तुझा आत्मविश्वास वाढत गेला. तुला सिन्सिअरली वाटत होतं, इथं सरकार पोचलं नाही म्हणून नक्षलवाद आला. आता तो घालवायचा असेल, तर सरकार तिथं गेलं पाहिजे.

विनील, ज्या दिवशी तू गेलास तो दिवस इदचा होता. सरकारी सुट्टीचा. तू सुट्टी न घेता काम करत होतास. भीतीने सुनसान ओस पडलेले रस्ते पार करून तू सिलेरू नदीच्या काठी गेलास. तिथून बोटीने नदी ओलांडून त्या गावी पोहोचलास. का, तर सरकार गावांत पोचलं पाहिजे यासाठी. शिबिर झालं. लोकांचे समाधान केलंस. वनाधिकाराचे दाखले वाटलेस. पेन्शन दिलीस. आवास योजनेचे लाभ दिलेस. मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला, “सर, इथे जनतापै गावात विद्युतीकरणाचं काम बघायला चला.” आणि तू विनाविलंब गेलासही. मोटरसायकलवर. सोबत फक्त दोन ज्युनिअर इंजिनियर घेऊन. जंगलात. खोल गुहेत जणू. जिथून परत आलेली पावलं दिसत नाहीत. तुझे एकूणच स्वयंसेवी संघटनांवर भाबडे प्रेम आहे. त्या लोकांनी तुला परत पाठवलेच नाही. एका इंजिनियरला परत पाठवले – असं सांगून की, ‘आम्ही सरांची काळजी घेतो, तू जाऊन सरकारला ही चिठ्ठी दे, सांग अठ्ठेचाळीस तास, आमच्या मागण्या आणि कलेक्टरचे प्राण.’ तुझे डोळे बांधून तुला चालवत सहा जण जंगलात घेऊन गेले.

आजही तुला चालवलंच जातंय. रोज वेगळ्या ठिकाणी. जागा बदलत. का, तर तुझ्या सुटकेसाठी सारं काही पणाला लावू पाहणाऱ्या आदिवासींनाही ते शक्य होऊ नये. असं म्हणतात की, त्यांनी आता मोर्चेबांधणीही केली आहे.

विनील, तू म्हणायचास, या लोकांसाठी काम करायला मला पाठवलंय, मी ते करतोय, हे लोक मला कसा काय अपाय करतील? तुझा विश्वासघात झाला दोस्ता.

आता आज बऱ्याच जणांच्या मनात काय विचार सुरू असतील ठाऊक आहे? ऐक.

विनिल, वेड्या, तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची? आम्हाला एकाच वेळी तू उत्तम अधिकारी, प्रशासक वाटतोस, आणि त्याच वेळी अविचारी साहसी आदर्शवादी तरुणही वाटतोस. तुला काय गरज होती तिथं जायची? पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला? एकतर तिथं जायचंच नव्हतंस. किंवा गेलास तर सुरक्षेचा जामानिमा घेऊनच जायचंस. वेडा. बेजबाबदार. अदूरदर्शी. असा कसा रे कलेक्टर तू?

हे आणि असंच बऱ्याच जणांच्या मनात येत असणार याची मला कल्पना आहे. हे असले प्रसंग तर होतच असतात असंही म्हणणारे महाभाग मला भेटले आहेत. विनायक सेनांच्या मानवी अधिकारांची चिंता वाहणाऱ्यांना तुझ्या मानवी हक्कांचा विचार करावासा वाटणारच नाही, कारण तू तर जालीम सरकारी व्यवस्थेतला बाबू! सरकारचा जावई! चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला वगैरे वगैरे. तुझ्यासाठी सरकार आकाशपाताळ एक करणार याची या विचारवंतांना पक्की खात्रीच. त्यामुळे ते आपली वाफ कशाला दवडतील?

पण मला काय वाटतं सांगू? तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस.

विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी.

तू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला.

तुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात.

आय सॅल्यूट यू, सर!

सचिन जाधव, आयएएस, ओरिसा.

सौजन्य - श्रावण मोडक.

Wednesday, January 26, 2011

असेही काही प्रवास.

"सह्ही, विमानाने जायचं तिकडे" इथपासून माझी उत्क्रांती "त्या अ‍ॅल्युमिनीयमच्या नळकांड्यात बसायचा मला भयंकर कंटाळा येतो" इथवर झाली. एकटीने विमान प्रवास करून झाला, सोबतीला पुस्तकं, विमानातली करमणूकीची साधनं, कधी सहप्रवाश्यांशी गप्पा असं करून फारतर अर्धा दिवस प्रवास करून इकडून तिकडे लवकरात लवकर पोहोचणे हे साध्य अनेकदा मिळवून झालं. भारतातून युरोपातला प्रवास फार्फार कंटाळवाणाच असायचा असं नाही, पण भारतातून निघताना बॉयफ्रेंडला सोडून जायचं म्हणून दु:ख असायचं आणि भारतात परत येताना एका घरातून दुसर्‍या घरात जाताना मधली गैरसोय नको असायची. शिवाय विमानात काही महान कॅरॅक्टर्स भेटायची, पण असे प्राणी समोर असताना कधीच विनोदी वाटले नाहीत. घरी पोहोचल्यावर गप्पा मारताना या प्राण्यांचे किस्से सांगताना मज्जा यायची हा भाग निराळा.

असंच एकदा ख्रिसमसच्या सुट्टीत मँचेस्टरहून मुंबैला निघाले होते. ऑमश्टरडॉमला (हा माझा डच उच्चार अ‍ॅमस्टरडॅमचा!) विमान बदललं. भारतीय लोकांची भरभरून सामानं नेण्याची सवय, त्यामुळे आपला लॅपटॉप आपल्या पायासमोर ठेवून झोपेचं खोबरं होईल याची भीती अशा सगळ्यामुळे मी नेहेमीप्रमाणे घाई करून लवकरच विमानात चढले. माझ्या थोड्या मागूनच एक साडी, कुंकू शेजारी येऊन बसलं. मला रेल्वेने जाताना रस्ता दिसला, विमानातून जाताना ट्रेन किंवा ट्रॅफिक जॅम दिसलं, बसमधून विमान दिसलं की भयंकर आनंद होतो. पण एकूण साडी-कुंकवाचे भाव पाहून समस्त गोर्‍या गर्दीत साडी-कुंकवाचा आनंद झाला नाही. नेमकं कुंकू अगदी जवळ उभं राहिलं तेव्हा मी हात सैलावून आळस देत "आई गं" म्हटलं आणि साडी-कुंकू एकदम मराठीतच गप्पा मारायला लागलं. दोनच मिनीटांत काकू नाशिकच्या आहेत, (अमेरिकेत हो!) मेंफिसला एक मुलगी 'दिलेली' आहे, ही माहिती मिळाली; 'हिरवा माज' जी संज्ञा तेव्हा माहित नव्हती तरी आपली मुलगी अमेरिकेत असल्याचा रंगांधळा माज दिसलाच. काकूंनी लगेच माझीही माहिती काढून घेतली. मी पीएच्.डी. करते आहे हे ऐकल्यावरतर आपली मुलगीही कशी पीएच्.डी. करणार होती, पण चांगलं स्थळ आलं म्हणून तो विचार सोडून दिला, असं सांगून "हं, तुमच्यासारख्या पीएच्ड्या कोपर्‍याकोपर्‍या मिळतात" असं दाखवत, मी मनातल्या मनात त्यांचा उल्लेख साडी-कुंकू केल्याचा बदला घेतला. पण थोड्याच वेळात हा माजुरडा 'हरी' अडल्यामुळे म्या गाढवाचे पाय धरणार होता हे दोघींनाही माहित नव्हतं.

विमान सुटायच्या आधीच काकूंनी आपला रिलायन्सचा मोबाईल मला दाखवून पुन्हा एकदा शाईन मारली. रेडीओ अ‍ॅस्ट्रॉनॉमर मालकिणीच्या भीतीमुळे माझा फोन पाच तास आधीच गजर म्हणून आपली ड्यूटी करून झोपला होता. पण हाय रे कर्मा, काकूंना टावर नव्हता. मी (उगाच) औदार्य दाखवून, माझा फोन सुरू केला आणि काकूंच्या नाशकातल्या मुलांना एसेमेस केला आणि फोनला पुन्हा झोपवला. थोड्याच वेळात आमचं विमान शब्दार्थाने हवेत गेलं आणि मग ट्रॉल्या विमानात खडखडायला लागल्या. आमच्या दोनच ओळी पुढून पेयपान द्यायला सुरूवात झाली. बालपण आणि म्हातारपण एकसारखंच, याचा एक अनुभव लगेच मला आला. काकूंनी पाच मिनीटांचीही प्रतिक्षा न करता आधीच केबिन-क्रूला हाक मारून ऑरेंज ज्यूस मागवायचं ठरवलं. आलेली बाई अमेरिकन होती, तिने तिला झेपेल तेवढ्याच नम्रपणे काकूंना काय हवंय ते विचारलं. काकूंनी लगेच त्यांच्या फर्ड्या तर्खडकरी (!) इंग्रजीत आपल्याला ऑरेंज ज्यूस हवं आहे असं फर्मान सोडलं. अमेरिकन बाई आणि नाशिकची काकू यांच्यात बराच वेळ चर्चा झाली, जी मला थोड्या वेळाने असह्य झाली. मी आपलं जमेल तशा इंग्लिशमधे अमेरिकन मडमेला काकूंची विनंती कळवली आणि तिनेही अमेरिकनमधे 'अच्छा असं आहे होय' म्हणत 'हां, आम्ही येतोच आहोत सगळ्यांना पेय्यपान देत' असं म्हणत पतली गली पकडली. "असा मी असामी"मधला शंकर्‍या परवडला पण काकू नको अशी अवस्था व्हायला ही तर फक्त सुरूवातच झाली होती.

पेय्यपान झालं, खानपान झालं आणि पुन्हा चहा-कॉफी फिरायला लागली. काकूंनी पुन्हा एक ऑरेंज घेतलं. मी तोपर्यंत थोडीबहुत युरोपाळलेली असल्यामुळे कॉफी घेतली. इंग्रज लोकांना कॉफी बिल्कुल बनवता येत नाही याचा पुरावा मिळाला, पण चांगल्या अर्थी. अमेरिकन विमानात कॉफीमात्र लै भारी होती. अगदी पहिला घोट तोंडात गेल्यागेल्याच मी "वाह, काय कॉफी आहे" असं अगदी अभावितपणे म्हटलं. ही पुढल्या "संकटाची" नांदी होती. "हो का? कॉफी खूप चांगली आहे का?", हातातला ऑरेंज ज्यूसचा ग्लास रिकामा करत काकू किणकिणल्या. लगेचच हातातलं केक्रूला बोलावण्याचं बटण दाबून काकू मोकळ्या. पुन्हा तीच अमेरिकन आजी आली. पुन्हा तेच इंडियन आणि अमेरिकन इंग्रजी भिडलं आणि मला असह्य झाल्यानंतर पुन्हा एक इंग्लिश-टू-इंग्लिश भाषांतराचा क्षीण प्रयत्न मी केला. थोडक्यात काकूंना कॉफी हवी होती आणि माझी कॉफी संपायच्या आत ती आलीही. पहिलाच घोट काकूंनी घेतला, "शी! ही काय कॉफी आहे काय? कॉफी कशी, एकदम लाईट, गोड आणि छान जायफळ आणि दूध घालून केलेली असली पाहिजे." बेशुद्ध पडल्यामुळे मीच माझी चप्पल तोंडात मारून घेतली. पण थोड्याच वेळात ती कॉफी बेकार असल्याचा अनुभव आला, काकू झोपल्या आणि अघोर सप्तकात त्यांनी घोरायला सुरूवात केली. मी अधूनमधून पुस्तक, डुलक्या आणि 'नमस्ते लंडन' का कायसासा पिक्चर पहात वेळ काढला. काकूंना जाग आली तेव्हा आमचं विमान साधारण तेहेरानच्या वरून उडत होतं. "मुलाकडून त्या एसेमेसचं उत्तर आलंय का पहा बघू?" काकू विमान मुंबईला पोहोचल्याच्या आनंदात का होत्या मला कळलं नाही. पण मला पडलेला हा प्रश्नच चुकीचा होता. "काकू, आत्ता कसं पहाणार? मुंबैला पोहोचायला खूप वेळ आहे अजून." कम्युनिकेशन ब्रेकडाऊनचा पुरेपूर अनुभव मी घेत होते. "अगं पण त्याचा एसेमेस आला नसेल तर त्याला पुन्हा फोन करता येईल ना, मुलगा आत्ताच निघाला तर वेळेत पोहोचेल ना मुंबईला." काकूंचं विमान हवेत होतं का विमान हवेत गेल्यानंतर काय शिस्त असते हे काकूंना माहित नव्हतं हे मला अजूनपर्यंत समजलेलं नाही. खुद के साथ बातां: थेरडे, तू मरायला तयार झाली असलीस तरी मी अजून गोवर्‍या नाही मोजायला घेतलेल्या! पण हे मनातच ठेवून, शक्य तेवढं हसू तोंडावर आणत "काकू, विमानात नाही हो फोन लावता येत." काकूंना माझी कांकू का सुरू आहे हे समजत नव्हतं. "पण मी उठते की, मग तुला उठून लावता येईल फोन." माझा फोन वरच्या हेडलॉकरमधे आहे म्हणून मी नाही म्हणते आहे या समजूतीत काकू होत्या, हे मला तेव्हा कळलं. "नाही हो, तसं नाही. विमानात मोबाईल वापरायला बंदी असते.", आता मात्र मी त्यांच्या अज्ञानाचा पुरेपूर फायदा उठवायचं ठरवलं. "मी इथे फोन सुरू केला आणि त्यामुळे विमान बदकन खाली पडलं तर?" मग हा आग्रह झाला नाही.

अजून थोडा वेळ थोडा शांत गेला आणि मला खिडकीतून बाहेर भास होताहेत असं वाटलं. आधी वाटलं पंखावरच्या दिव्याचा प्रकाश ढगांवरून (उनिकोदात केल्यासारखा) परावर्तित होतो आहे. पण नंतरमात्र फार वेळ न घेता ट्यूब पेटली, बाहेर वीजा चमकत होत्या. विमानाच्या प्रवासमार्गाकडे नजर टाकली तर वैमानिकाने थोडा लांबचा रस्ता घेतला आहे आणि पोहोचायला थोडा उशीर होईल हे पण कळलं. हातात कॅमेरा होता, पण फार चांगले फोटो आले नाहीत. पण वीजांच्या उंचीवरूनच त्यांच्याकडे पहाण्यात फार जास्त गंमत नाही आली, एक वेगळा अनुभव एवढंच. विजा थोड्या मागे पडल्यावर वैमानिकाने मार्ग थोडा बदलायला लागला आणि अर्धा तास उशीर होईल असं जाहिर केलं. काकूंना अर्थातच इंग्लिश समजत नसल्यामुळे "अर्थातच" भाषांतराची जबाबदारी माझ्यावर पडली. सांगितल्यावर "का? जायचं ना विजांमधून? आपलं विमानतर एवढं मोठं आहे की!" हे ऐकल्यानंतर काय झालं हे मला नीटसं आठवत नाही. एकतर मी बेशुद्ध पडले असणार किंवा मी सरळ दुर्लक्ष केलं असणार, पण त्यानंतरमात्र मी विमानातून उतरेपर्यंत मुकीबहिरी असण्याची भूमिका वठवत होते; कोण या वठल्या खोडाशी पंगा घेणार?

हा सगळा अनुभव काही वर्षांपूर्वीचा. आता मी थोडी मोठी झाले आहे (असं आपलं म्हणायचं म्हणून म्हणायचं)! काहीही का असेना, अशी विसंवादी पात्र दिसली की फारवेळ राग रहात नाही, मला या सगळ्याची गंमत वाटायला लागते. "येवढा लांब प्रवास, नको, कंटाळा आला" इथपासून "ठीक आहे, चोवीसच तास लागतात अमेरिकेतून भारतात पोहोचायला!" इथवर आता उत्क्रांती झाली आहे. आजूबाजूच्या अनेक गोष्टींची मौज वाटण्यामुळेही हे शक्य असेल. अलिकडेच ऑस्टीनहून मुंबईला आले तेव्हा या सगळ्याची हद्दच झाली. दोन ठिकाणी विमानं बदलून यायला लागलं आणि तिन्ही विमानं अगदी स्पेश्शल होती. पहिलं होतं ऑस्टीन ते ह्यूस्टन, अगदीच छोटा प्रवास आणि विमानही तसंच लहान! अगदी माझी वामनमूर्ती प्रवासाच्या शेवटी उठून उभी राहिल्यावर डोकं आपटावं एवढं छोटं विमान होतं. ओघळलेल्या, कुरूप जाड्या लोकांच्या अमेरिकेत असलं विमान बनवलं, चालतं याची मला मजा वाटली. गरीबांचं दुकान म्हणून प्रसिद्ध असणार्‍या वॉलमार्टात दिसणारी ओथंबलेली जाडी माणसं या विमानातून जायला लागली तर काय दंगा होईल ना असा "दुष्ट" विचार माझ्या डोक्यात डोकावून गेलाच. ह्यूस्टन विमानतळावर उतरायच्या अगदी थोडं आधी मला दुसरं एक विमान धावपट्टीवर उतरताना दिसलं हा अनुभवही मस्तच होता. पुढचा टप्पा होता पॅरीसपर्यंत. जानेवारीचा मध्य उलटून गेलेला, बुधवार, अशा दिवशी विमानात किती कमी गर्दी असू शकते याची कल्पना मला आधी आलीच नाही. वेळेच्या बरीच आधी मी गेटवर जाऊन बसले होते. आता गर्दी वाढेल, नंतर वाढेल असा विचार करेपर्यंत विमानात चढायची वेळही झाली. लहान मुलं बरोबर असणारी कुटुंब, व्हीलचेअरची गरज असणारे लोकं विमानात गेलेही. आणि सूचना झाली, आता इतर सगळ्यांनी विमानात चढा. माझ्यासकट अनेकांना कळलंच नाही, "म्हणजे एवढे सगळे एकत्र गेले तर गर्दी नाही का होणार?" अजिबात गर्दी झाली नाही, विमान पंचवीस टक्केच भरलं असेल जेमतेम, कुठून होणार गर्दी? माझी जागा खिडकीत होती, आणि शेजारी कोणीच नाही. तंगड्या पसरून विमानात बसायला मिळण्यात किती सुख असतं हे काय सांगणार? पण सुख टोचतं म्हणतात, एवढी जागा असून मी आख्खा प्रवासभर जागीच होते. हरकत नाही, पॅरीस-मुंबै असा आठ तासांचा प्रवास बाकी होता आणि त्यासाठी फार वेळ विमानतळावर थांबायला लागणार नव्हतं.

पुन्हा एकदा सगळे सोपस्कार करून मुंबैला जाणार्‍या विमानाच्या रांगेत मी उभी राहिले. लॅपटॉप ठेवायला वरच्या लॉकरमधेच जागा मिळाली, माझी खिडकीची सिट मिळाली, आता मस्त ताणून देऊ या म्हणून विमानाचे दरवाजे बंद करायच्या आधीच मी थोडी सैलावले तर कोणीतरी जोरजोरात बोलत आहे, हसत आहे असं ऐकायला आलं. मला आधी वाटलं की इथे आख्खा ग्रूप आलाय का काय तामिळ लोकांचा, म्हणून पाहिलं तर एक पोट्या, मध्यमवयीन, मुछ्छड आपल्याकडे मोबाईल असल्याची क्षीण, छे छे, साऊथ इंडीयन पिक्चर्सप्रमाणे लाऊड जाहिरात करत होता. त्याला त्याचं भलंथोरलं सामान वर ठेवायला जागा नव्हती म्हणून का काय आख्ख्या विमानभर फिरून त्याने सगळ्यांना तामिळमधून गडगडाटी हसूनही दाखवलं. इंग्लिशमधे obnoxious कशाला म्हणतात असं विचारलं तर मी नक्कीच त्याच्याकडे बोट दाखवलं असतं. आता हे कमी होतं का काय, हा mustachio माझ्याच शेजारी, एक सीट सोडून बसला. बाप रे, आता हा लाऊड माणूस सहन करायचा? झोपमोडतर झालीच होती. मी आधी नक्कीच वैतागले होते. विमान हवेत गेलं, समोरच्या टीव्हीवरचे कार्यक्रम सुरू झाले आणि हे भाई एकदम टाळ्या-बिळ्या वाजवायला लागले. एकदा झालं, दोनदा झालं आणि माझा राग थोडाही निवळला होता. मला भयंकर उत्सुकता होती, हा माणूस काय पहातोय काय? मला पण पहायचा आहे तोच कार्यक्रम! 'दबंग' एकदा पाहून झाला होताच. म्हणून डोकावून पाहिलं तर कळलं पर्‍याची आणि याची आवड एकच होती. ट्वायलाईट-एक्लिप्स पहात हा भाई हिरविणीचा क्लोजअप आला की टाळ्या मारत होता. हा मात्र कहर होता (अशी माझी तेव्हा समजूत झाली). थोडा वेळ पाहू या आणि नाहीच बंद झालं तर सांगू या, असा विचार करून मी पुन्हा एकदा मुन्नीची बदनामी पहायला लागले. थोड्याच वेळात जेवण आलं, आणि शेजारच्या अण्णाने दोन बाटल्या वाईन मागून घेतली. आता मात्र माझा मांजर स्वभाव पुरता जागृत झाला. याने आपला ट्रे बाहेर काढला, एअर होस्टेसने आधी एक बाटली दिली, ती याचं जेवण ट्रेवर ठेवते तोपर्यंत बाटलीतले एक-दोन घोट कमी झाले होते. याने आणखी एक बाटली मागून घेतली आणि नंतर आठवण झाल्याप्रमाणे ग्लास मागितला. बाटलीच तोंडाला लावून वाईन पिण्याचा प्रकार पाहून माझ्या रक्तवारूणीप्रेमी मनाला मणमण यातना झाल्या. पण या यातना फार काळ टिकणार नव्हत्या. अण्णाने चटचट खाणं आणि पिणंही आटपलं आणि अगदी पापणी लवतेय असं वाटावं एवढ्या वेळात झोपला. नुस्ताच झोपला नाही तर अगदी, एकदम पक्का डावा होऊन झोपला. "छ्या, करमणूकीसाठी आता पुन्हा सलमान खानला पहावं लागणार" असा विचार करून मी पुन्हा 'दबंग' लावेपर्यंत खाण्याचे ट्रे गोळा करायला केक्रू आलाच. आता या अण्णाचं डावे 'आचार' विमानाच्या येण्याजाण्याच्या रस्त्यामधेच आल्यामुळे केक्रूने त्याला बाजूला होण्याची विनंती केली. हा झोपला आहे असा विचार करून त्या भल्या बाईने त्याला सरळ करायचा प्रयन्त केला तर डावेभाई एकदम उजवेच झाले. मध्यमवय असलं तरी मध्यममार्गाचं त्याला वावडं असावं. मला या सगळ्याच प्रकाराची गंमत वाटत होती. आतली प्रेरणा, हवेतला टर्ब्युलंस अशी बाहेरची संप्रेरकं, आणि लोकांचं जाणंयेणं यामुळे अण्णाला आपण डावे आहोत का उजवे हे धड समजत नसावं.

विमानात मला खूप तहान लागते. म्हणून विमानात चढायच्या आधी, जेवताना असं मिळून मी लिटरभर पाणी रिचवलं होतं, ते थोड्या वेळाने आतून हाका मारायला लागलं. आता आली ना पंचाईत! सेतू बांधून रामाने म्हणे पाल्कची सामुद्रधुनी ओलांडली पण कलियुगातल्या या विमानात मी चढलेल्या माणसाला कुठे चढून ओलांडायचं हे मला समजेना. केक्रूला बोलावून माझी अडचण सांगितल्यावर त्यांच्याकडे उत्तर तयारच असावं. तिने जाऊन दुसरीलाही बोलावलं. मला सीटवर उभं करून या दोघींनी माझे हात पकडले. दोन्ही हात पसरून दोघींनी पकडलेले आणि मी सीटवर उभी यामुळे मी एकदम येशुख्रिस्त दिसत असणार या विचाराने मला हसूच आलं, पण पोटातलं पाणी फारच हाका मारत होतं. मग क्षणार्धात येशूची सुपरमॅन होऊन मी चालत्या विमानात सूर मारून अण्णाची लक्ष्मणरेषा ओलांडली. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे काय असतं याची मला तेव्हा चांगलीच कल्पना आली. म्हणजे बोलायला ठीक आहे हो, मी मुक्त स्त्री आहे वगैरे! पण प्रत्यक्षात मुक्तीची वेळ आली तेव्हा या दोन इतर मुक्त स्त्रियांचं सहकार्य मागावं लागलंच की! थोडा वेळ बाहेरच उभी राहिल्यावर पुन्हा जागेवर जाऊन बसावं असा विचार केला आणि आता मात्र माझ्या अंगात स्पायडरमन संचारल्याच्या थाटात मी एकटीच दोन शिटांच्या हँडरेस्टचा वापर करून जागेवर आले. या सगळ्या 'क्लायमिंग'च्या प्रकारात अण्णाची थोडी उतरली असावी असं मला वाटलं. कारण आता त्याने पवित्रा बदलला, पसरलेले पाय आवरले आणि समोरच्या सीटपॉकेटमधे खुपसले. माझ्याकडे खिशात ठेवण्याएवढा छोटा कॅमेरा नाही याचं दु:ख मला अनेकदा होतं, त्यातलाच हा एक प्रसंग! 'टॉम अँड जेरी'ची डायहार्ड फॅन असल्यामुळे मी लगेच ते सीट पॉकेट फाटायला लागलं तर काय होईल, किंवा समोरची सीटच खाली यायला लागली तर काय होईल असे सगळे विचार मनातल्या मनात करून झाले. आतापर्यंत विमान भारताच्या हद्दीत आलेलं होतं. लँडींगच्या सूचना होत होत्या. केक्रू प्रत्येकाचे सीट बेल्ट्स पहात होते. अण्णाला इतर काही शुद्ध नव्हतीच तर सीटबेल्टची पर्वातरी त्याने का करावी? त्या भल्या बाईने याचा सीट बेल्ट लावेपर्यंत अण्णा बराच जमिनीवर आला होता. विमान जमिनीवर आल्यानंतर काही मला उड्या माराव्या लागल्या नाहीत. मुंबई विमानतळावर सामानाची वाट पहात असतानाच एकाने जवळ येऊन "तुला सीटवरून उडी मारताना भीती वाटली नाही का" असं विचारलंच. मुक्ती आणि स्वातंत्र्यासमोर या असल्या गोष्टींची भीती वाटत नाही असा ड्वायलाक डोळा मारतच मी मारल्यावर माफक हशा पिकला.

"चला पोहोचले एकदाची" असा विचार येतोच आहे तेवढ्यात आठवलं, फेब्रुवारी आणि मार्चमधे एकेक कॉन्फरन्सेस आहेत आणि ट्रेनने पुण्याहून तिथे पोहोचायला आख्खा एक दिवस लागेल. त्यामुळे बहुदा पुन्हा वाढलेल्या पगाराचा माज विमानप्रवासातून दाखवून होईलच. नाही, आणखी एक लंबंचवडं ब्लॉगपोस्ट टाकण्याची ही धमकी नाही.

Followers