Friday, August 14, 2009

आणि कॉमन मॅन बोलला!

हं, कॉमन मॅन हे नाव थोडंसं आठवतंय ना (हल्ली कॉमनमॅनच्या जागी 'कॉनमेन' हाच शब्द एवढ्या वेळा आपण वाचतो की विचारावंसं वाटलं!) काल पद्मविभूषण आर. के. लक्ष्मण यांचा मानसपुत्र, 'कॉमन मॅन'वर आधारित एकपात्री कार्यक्रम पाहिला. लेखक: अनिल जोगळेकर, भाषांतरकारः गौतम जोगळेकर, संगीत: बंकिम आणि बाकी सर्व श्रेय प्रा. अजित केळकर यांचं; पण केळकर म्हणतात सर्व श्रेय आपल्या सगळ्यांमधे असणार्‍या असामान्य सामान्यांचं आणि हे असामान्यत्व चितारणार्‍या कार्टूनीस्ट आर. के. लक्ष्मण यांचं! एकविनोदाच्या अंगाने जाणारा तरीही अंतर्मुख करणारा कार्यक्रम असं याचं वर्णन एका वाक्यात करता येईल. आत्मनिवेदनाच्या रूपात समोर येणारा हा 'कॉमन मॅन' तंत्रज्ञानाची यथायोग्य मदत घेऊन एक तास आपल्याला हसवतो आणि शेवटी जबाबदारीची जाणीवही करून देतो.







अजूनही अनेकांना 'टाईम्स' उघडल्यावर 'यू सेड इट' किंवा 'कसं बोललात' नाही याची जाणीव होत असेल. माझ्यासाठी लहानपणी 'काही विनोदी दिसणारी, म्हणून व्यंगचित्रं' एवढंच त्याचं महत्त्व होतं. राजकारण, समाजकारण वगैरे शब्दांचा अर्थ समजेपर्यंत लक्ष्मण यांनी सदर बंद केलं होतं. आणि त्यानंतरच पंडीत नेहरू, कृष्ण मेनन, इंदीरा गांधी, आणिबाणी, बोफोर्स तोफांचा, चारा, युरीया, घोटाळा वगैरे गोष्टी कळत गेल्या. माझ्या पिढीने खुला बाजार, मुक्त अर्थव्यवस्था वगैरे गोष्टी आधी अनुभवल्या आणि नंतर समजल्या. पण 'कसं बोललात?' पाहून 'कॉमन मॅन'चा चेहरा नक्कीच माहित होता. पुण्यातल्या लोकांना सिंबायसिस महाविद्यालयातला या 'कॉमन मॅन'चा पुतळाही माहित असेल आणि काही मोजक्या लोकांना 'प्राण जाये पर शान न जाये' या चित्रपटातला शेवटी अवतरणारा 'कॉमन मॅन'ही माहित असेल. पण तरीही माझ्या आणि पुढच्या पिढीला या महान व्यंगचित्रकाराची महती कळणं, उमगणं कठीण होतं.

हा कॉमन मॅन बोलत नाही, तो नुसतीच नजर टाकतो, रस्त्यातून चालताना कानावर पडणारे संवाद ऐकतो, गृहिणींनी केलेलं गॉसिपही ऐकतो, भाषणांना गर्दी करतो आणि मुख्य म्हणजे राजकारण्यांच्या दलदलीमधे फसतो. पण तरीही त्याच्या चेहेर्‍यावरचे भाव काहीसांगून जातात आणि त्यामुळे अनेकदा राजकारणी हादरले. पंडीत नेहरुंच्या काळातले 'अनिवासी भारतीय' कृष्ण मेनन, महाराष्ट्रात दारूबंदी करणारे मुंबई इलाक्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई, आणिबाणी लादणार्‍या इंदीरा गांधी, त्यांच्या प्रशंसेत खळ न पडू देणारे तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष देवकांत बारूआ, जनता पक्षातले अनेक स्वयंभू नेते आणि मुख्य विदूषक राजनारायण, बोफोर्स तोफांच्या व्यवहारात हात शेकलेले राजीव गांधी, युरिया घोटाळ्यात अडकलेले तत्कालिन पंतप्रधान नरसिंहराव, असे अनेक चेहेरे काही रेघोट्यांनी आर. के. लक्ष्मण यांनी दाखवले; पण टिकून राहिला तो हा सामान्य माणूस! व्यंगचित्रकाराचं काम असतं कोणा एका माणसाची बाजू न घेता सत्य सांगणं आणि ते ही कोपरखळ्या मारत! आणिबाणीच्या काळात जेव्हा अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घातला जात होता, तेव्हा तुरुंगात टाकण्याच्या धमक्या मिळत असतानाही लक्ष्मण यांनी खुद्द इंदिरा गांधींकडून शाबासकी मिळवली होती. कॉमन मॅनच्या समस्या त्याही काळात रोज 'टाईम्स'मधे येतच होत्या. चंद्रावर खड्डे आहेत म्हणजे तिथे रस्ते आहेत, याचाच अर्थ तिथे माणसंही आहेत हा विनोद आज आपण (आणि आम्ही खगोलाभ्यासकही) सहजच सांगतो, पण त्यातून व्यंग दाखवणारे लक्ष्मण कधीच सामान्यांचा आवाज बनले होते.

माझ्या आणि पुढच्याही पिढ्यांना या गोष्टी फक्त 'इतिहासा'च्या पुस्तकातूनच कळतील, पण अजित केळकरांच्या कॉमन मॅनने एका तासाच्या आत या गोष्टी दाखवल्या, सांगितल्या. अगदी १९६१ साली हे सदर सुरू झालं तेव्हापासून भारताचा राजकीय आणि काही सामाजिक इतिहास लक्ष्मण यांच्या कार्टून्सच्या आधाराने एका तासात जिवंत झाला. एक चित्र हजार शब्दांचं काम करतं असं म्हणतात, काही रेषांनी बनलेले चेहेरे आणि एखाददोन वाक्यांत टिप्पणी यांच्या सहाय्याने या असामान्य व्यंगचित्रकाराने गल्लीपासून दिल्ली हलवली. बॉम्बेचं मुंबई झालं म्हणून शहराची प्रगती झाली नाही, पण सामान्य मुंबईकराच्या वेदनामात्र टाईम्सच्या पहिल्या पानावर झळकल्या. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ प्रसिद्ध होणारं हे सदर, त्याची खासियत एका तासात संपूर्णपणे दाखवणं अशक्यकोटीतलं काम, पण जोगळेकर-केळकर यांनी निवडक घटनांवर आधारित व्यंगचित्रं निवडून हा संपूर्ण काळ जिवंत केला, आणि तोही एका कुणा पक्षाची, पंथाची, धर्माची बाजू न घेता, एका कॉमन मॅनच्या नजरेतून! भारताच्या राजकारणाबद्दल अगदी मोजकी माहीती असणार्‍या परदेशी लोकांनाही कॉमन मॅनने एक तास खिळवून ठेवलं.

यू ट्यूबवरची कार्यक्रमाची एक झलक.

नाव, गाव, धर्म, पंथ, जात नसलेला अतिसामान्य अवतारातला कॉमन मॅन आता बोलला. आणि बोलला ते आनंददायी नक्कीच नव्हतं. मोरारजी देसाईंना मुख्यमंत्रीपदी असतानाही या कॉमन मॅनचा आवाज बंद करता आला नव्हता, कारण घटनेनेचसर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. पण आज मात्र कॉमन मॅनला दु:ख आहे की विध्वंसक लोक, धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या नावाखाली आज अभिव्यक्ती चिरडून टाकण्याच्या गोष्टी करत आहेत, आणि दुर्दैवाने काही अंशी सफलही होत आहेत. सामान्य माणूस आज महागाई, दुष्काळ यांच्याबद्दल ऐकण्या-वाचण्याऐवजी आज देशात अंदाधुंदी माजवणार्‍या गोष्टी ऐकत आहे. चिमूटभर लोकं आपल्या सर्वांमधे असलेल्या या कॉमन मॅनला वेठीस धरून कॉमन मॅनच्या समस्या सोडवण्याऐवजी आपसांत झुंजवत आहेत. आता पुन्हा वेळ आहे सत्तांध लोकांना त्यांची जागा दाखवण्याची; पण कॉमन मॅनला भीती आहे ती पुन्हा एकदा भारतभूमीमधे हिंसाचार माजू नये. फ्रेंच आणि रश्यन लोकांनी आपापल्या देशांत सत्तांध लोकांविरुद्ध क्रांती केली होती आणि त्याची किंमत अशाच अनेक कॉमन मॅनच्या जीवनाने चुकवली होती. आपल्या भारतभूमीवर असा हिंसाचार माजू नये, असंख्य लोक त्यात बळी पडू नयेत अशीच या कलाकाराची इच्छा आहे. आणिबाणीनंतर इंदीरा गांधींना सत्तेवरून पायउतार करणार्‍या जनतेला पुन्हा एकदा आपल्या कर्तव्याची आठवण करून द्यायची आहे. आणि म्हणूनच कधीही न बोलणारा आर. के. लक्ष्मणांचा मानसपुत्र, जो आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून गेली अनेक वर्ष टाईम्सच्या पहिल्या पानावर आपल्या दिवसाची सुरूवात करून देत होता, तो 'कॉमन मॅन' बोलला.

अजित केळकर यांच्या वेबसाईटवर या एकपात्रीची कार्यक्रमाची माहिती आहे.

हेच पोस्ट मिसळपाववरही आहे.

Thursday, August 6, 2009

(थांब ना ...)

प्रेरणा: प्राजुची कविता थांब ना आणि सध्या झालेली सर्दी.

गळत आहे नाक माझे औषध झणी आण ना
भिजले सगळे रुमाल आता तरी थांब ना

जाहला डोक्यात कल्लोळ खालती मज पाहवे ना
सांग कसा प्रतिसाद देऊ थोडे तरी थांब ना

साचला आता प्रवाह प्रगती थोडी जाहली
श्वास घेता श्रम जाहले व्हिक्स कुठे मज सांग ना

उठता प्रभाती आवाज बंद वाकुल्या का काढीसी?
स्वाईन फ्लूचा अंदाज घेसी जिव्हेस तुज हाड ना

आवाज निघता मोद होई क्षणिक तोही मग ठरे
राणीची* याद देसी क्रूरवक्त्या थांब ना

संपल्या खाणाखुणा, या सर्दकालाच्या जरी
दर्दभरे नाक सांगेल, ती कहाणी थांब ना

* हा संदर्भ राणी मुखर्जीच्या आवाजाबद्दल आहे.

Thursday, July 23, 2009

(शोध रेडीओचा, बोध 'जीवना'चा!)

नमस्कार वाचक,
(चाणाक्ष वाचकांना या विडंबनामागची प्रेरणा कळली असेलच.)

आपल्याला एखादं गाणं का आवडतं?

तीन साधारण उत्तरं - १) त्याचे शब्द आपल्याला आवडतात, २) त्याचं संगीत, त्याची चाल आपल्याला आवडते, ३) एकूण समष्टीने गाणं, गाणारा/री, गाण्याचं चित्रीकरण, गाण्यावर ओठ हलवणारा/री, वाद्यमेळ हे सगळंच आपलं डोकं हलवून जातं.

गाण्यांमधे बोली भाषेचा उपयोग मला नेहेमीच आवडत आला आहे. वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या उपमा, तोच तोच राग आणि त्याच त्याच सुरावटी वापरलेली गाणी रेडीओवर लागतच असतात आणि अचानक मधेच एकदम त्यासगळ्याच्या विपरीत एखादं गाणं लागतं. अचानक वाजवताना तंबोर्‍याची तार तुटावी तसं! क्षणभर वाटतं, "हे काय चाल्लंय?", तरीही गाणं पुढे सुरूच रहातं आणि एकदम टकाटक, २ जीबीची जादा मेमरी मिळाल्यावर हेवी प्रोग्रॅम जसा पळू लागतो तसं आपले विचारही पळत जातात... अगदी सुरांची आवर्तनं चालावीत तसेच!

शंकर-एहसान-लॉयचं निकल भी जा हे गाणं आपल्यापैकी फार लोकांनी ऐकलेलं नसेलच. आवर्जून ऐका. या गाण्यातून, त्याच्या चालीतून, त्याच्या मांडणीतून जावेद अख्तरसाहेबांनी शब्दांच्या माध्यमातून (प्रकटनाच्या शेवटी गाण्याचे बोल दिले आहेत) दिलेला व्यावहारीक जगण्याविषयीचा एक संदेश श्रोत्याच्या मनःपटलापुढे वेगवेगळ्या प्रसंगांना तंतोतंत उभा राहतो. गाण्यातील भावना थेट काळजापर्यंत पोचवणारी चाल, त्याला सुसंगत वाद्यमेळ आणि त्यात करण्यात आलेले प्रयोग या तिन्हींबाबत "क्या केहेने" हीच प्रतिक्रिया उमटू शकते. हे निकल जाणं पतली गलीतून आहे. अगदी चप्पल घालून तयार रहा असंच त्यातून सुचवलं जातं. अर्थातच, चालही त्याच मार्गानंच जाते. "निकल" मधली भावना आणि 'गली'तला ग किती शुद्ध आहे पहा. माझ्यामते या दोन शब्दांमुळे जावेदसाहेबांच्या गाण्यांची दिशाच पूर्ण बदलून जाते. 'निकल'मध्ये 'क'चा उच्चार करताना गायकानं क्षणभरासाठीच केलेला एक खेळ त्या निकलला हुकुमाचाच सूर लावून देतो. या निकल जाण्याचं नातं आधी म्हटल्याप्रमाणे पतली गलीतून आहे. त्यातही 'ग' किंचित आधीच थांबवत लीचा उच्चार दीर्घ करताना शंकरनं त्याच्या गळ्याची तयारी दाखवून दिली आहे. 'ग' वेळीच थांबला तरी त्याची बाधा होत नाही. पुढे यात असलेले सायकेडेलिक आणि इलेक्ट्रीक बीट्स एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.

(वरच्या या परिच्छेदाचं श्रेय एक ज्येष्ठ मित्र श्री. एसेम यांना)

दोन अंतर्‍यांमध्ये एक प्रयोग करण्यात आला आहे. या मधल्या टप्प्यात एका वेगळ्याच आवाजात धृवपद म्हटलं जातं. त्यासाठी जाणीवपूर्वक त्या मुलाचा आवाज किरटाच लागेल याची काळजी घेत गाण्याच्या संदेशाशी प्रामाणीकपणा राखण्याचा प्रयत्न संगीत संयोजकांनी केल्याचे दिसते. या मुलाने 'निकल भी जा'ला एक वेगळेच परिमाण गाठून दिले आहे. मधेच 'फटाफट' या कोरस आवाजाचा जो काही ध्यास घेतला आहे की आपल्यालाही तो आवाज अतिशय दैवी, डिव्हाईन वाटतो. (म्हणजे असं की आपल्याला कोणालाही तो काढता येणार नाही म्हणून दैवी.) स्वतः शंकर-एहसान-लॉयना देखील तो आवडला असावा कारण या संपूर्ण गाण्यात हा आवाज आपल्याला दोन ओळींसाठी ऐकता येतो.
या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची. मुख्य म्हणजे मुखड्यातच ते स्पष्ट होतं. पुढे मात्र "अरे बच्चमजा"वर सरकताना आधुनिक संगीत मुद्रण, ठेका आणि कोरसचा उपयोग एकदम लाजवाबच! दो और दो को बाईस बना, बेच अंगूर के भाव चना या दोन ओळी व्यक्तीशः जावेदसाहेबांच्या काव्यलेखनातला एक मानदंडच, पण त्याबरोबर शंकरने ज्या प्रकारे सूर-लयीचा खेळ केला आहे, अक्षय खन्नाने बोटांचा खेळ दाखवला आहे, चित्रपटाचं अर्ध नाव व्हीडीओत येतं तो अनुभव अंगावर काटे आणतो. अतिशयच उच्च. 'खुल के मुस्कराले', 'मितवा', 'मां' अशा गाण्यांबरोबरच 'कजरा रे', 'हे बेबी', आणि आताचं 'पतली गली' अशी काही कंटेंपररी गाणी ही शंकर-एहसान-लॉय यांची खासियतच. तुम्हा-आम्हाला अगदी आपले वाटणारे, "अरे", "अबे" असे शब्द सहज (सदस्य क्र. ८ नव्हे) गाण्यात वापरणे ही तर शंकरच्या सर्वसामान्य तरीही लवचिक आवाजाची जादू; आणि अशा लयीच्या गाण्यावर अतिशय उच्च नाच हे फक्त अर्शद-अक्षयच करू जाणे!

आपल्याला आवडलेलं आहे का नाही हे सुद्धा समजत नाही अशा एखाद्या गाण्यातील एखाद्या ओळीचा, एखाद्या बीट्सचा अभ्यास करताना, त्यात असलेल्या(!) गूढ अर्थाचा शोध घेताना, मागोवा घेताना खरंच खूप आनंद होतो हेच खरं!

'जीवना'चा बोध! कधीच अनमोल न वाटणारा तरीही ठेवा. मम विडंबनाची ठेव...!

गाण्याचे बोल:
निकल भी जा निकल भी जा पतली गली से निकल भी जा
सही है क्या गलत है क्या सोच के अपना दिल ना जला
अरे बच्चम जा ले ले शॉर्टकट अरे यही अच्छा ले ले शॉर्टकट
अरे सुन बच्चा चल दे तू फटाफट
अरे कर नही गम, ले ले शॉर्टकट, ओये टाईम है कम, ले ले शॉर्टकट
है तुझ को कसम चल दे तू फटाफट॥

दो और दो को बाईस बना बेच अंगूर के भाव चना
फायदा तेरा जो कर सके, उस को लगा मस्का उस को मना
अरे बन चमचा, ले ले शॉर्टकट, अरे यही अच्छा ले ले शॉर्टकट ... ॥

सिधा चलेगा तो गिर जायेगा टेढा चल राह जो टेढी मिले
सब से उपर जाना तो उपर जाना है तो
चढ जहा भी सिढी मिले
कभी ऐसा ले ले शॉर्टकट, अरे कभी वैसा ले ले शॉर्टकट
अरे दे पैसा चल दे तू फटाफट ... ॥

Friday, July 10, 2009

तुमचा खेळ होतो आणि आमचा ... (भाग एक)

निलेश, असाच एक सॉफ्टवेअर इंजिनियर, एका प्रथितयश सॉफ्टवेअर कंपनीमधे नुकताच नोकरीला लागला होता. इंजिनीयरींग कॉलेजमधे नेहेमीच पहिल्या तीनात आल्यावर नोकरी मिळवण्यासाठी फार काही कष्ट करावे लागलेच नाहीत. परिक्षेतल्या मार्कांसाठी अभ्यास करता येत असला तरी वर्षातले परीक्षा, सबमिशन असे तीन-चार महिने सोडले तर हा कायम काही ना काही 'प्रोजेक्ट्स' करत रहायचा! आई मात्र "पोरगा का कायम कंप्यूटरला चिकटून बसलेला असतो" या चिंतेत असायची. घरी मित्रमंडळ आलं तरी चर्चा कायम अगम्य भाषेतच! आईला त्यांची भाषा इंग्लिश, मराठी किंवा हिंदी आहे ते समजायचं पण काय बोलायचे ते कधीच तिच्या पचनी पडलं नाही. पण पोरगं कधी वाईट नादाला लागणार नाही याची खात्री होती आणि परीक्षेतल्या मार्कांवरून त्याची पावतीही तिला मिळायची त्यामुळे तिने कधीच फार चौकशी केली नाही. घरात आणि नातेवाईकांमधे शांत असणारा निलेश, त्याचं मित्रमंडळ आला की मात्र पार बदलून जायचा. उत्साहात काहीतरी चर्चा घडत, दोन मित्र, श्रीराम आणि हृषि, कधीमधी रात्री घरी थांबत आणि आईशीही मस्त गप्पा मारत, एकीकडे काहीबाही कामही सुरू असायचं. त्यांच्या कामातलं काही समजत नसलं तरी पोरांसाठी रात्री कॉफी बनवून देताना, त्यांना रात्री दोन वाजताही काही खायला बनवून देताना आईलाही मनापासून समाधान मिळत असे. आणि एका रात्री निलेशने आईला उठवलं, कंप्यूटरवर तिघांनी मिळून पृथ्वीवरचे ऋतू, चंद्र-सूर्याची ग्रहणं, पृथ्वीची परांचन गती समजावून सांगणारं सिम्युलेशन तयार केलं होतं. पोरांचं रात्री उशीरा जागून काय चालायचं हे आता मात्र आईला व्यवस्थित समजलं.

निलेशला ज्या कंपनीत नोकरी लागली तिथेच श्रीरामलाही मिळाली. पण त्याने आणि हृषीने एकत्र धंदा सुरू करायचं ठरवलं, आय.टी.संदर्भातलाच. निलेशच्या घरची आर्थिक परिस्थिती त्याच्या वडिलांच्या पाठून थोडी खराब झाली होती त्यामुळे त्याने एकीकडे नोकरी सुरू करत दुसरीकडे मित्रांना लागेल तशी मदत करायचं ठरवलं. नव्या नोकरीत रूळायला निलेशला अजिबातच वेळ लागला नाही. ज्या लोकांनी लिहिलेली पुस्तकं तो अभ्यासक्रमात वाचत होता तीच माणसं आता त्या कंपनीत त्याचे सिनीयर्स, बॉस म्हणून नोकरीला होती. मनासारखं काम करायला मिळत होतं, चर्चा करायला एकापेक्षा एक हुशार माणसं आजूबाजूला होती, अननुभवी मुलासाठी पगारही चांगला होता, शिवाय शनिवार-रविवार हृषी आणि श्रीरामबरोबरही काम सुरू होतं. हल्ली आई मागे लागल्यामुळे तो रोज सकाळी उठून ऑफिसच्या जिममधेही जात होता.
आणि हो, ऑफिसमधेच निलेशच्याच मागोमाग एक मुलगी जॉइन झाली होती. कुठल्या डिपार्टमेंटला होती, तिचं नाव काय, निलेशला माहित नव्हतं. पण तीसुद्धा रोज सकाळी याच्याच वेळेला जिममधे असायची. तीही एकटीच असायची आणि हा पण, हळूहळू दोघांना एकमेकांची नावंतरी समजली. काही दिवसातच त्याला समजलं की नंदिनी सायकोलॉजिस्ट आहे आणि ट्रेनी म्हणून ती सध्या त्याच्याच कंपनीत लागली आहे. अतिकामाच्या ताणामुळे कर्मचार्‍यांना होणारे मानसिक आजार टाळण्यासाठी चांगल्या कंपन्या सायकोलॉजिस्टनाही कामावर ठेवतात. पण निलेशचा एक प्रॉब्लेमच होता, सख्खी किंवा जवळची बहिण नसल्यामुळे आणि आजपर्यंत कधी मैत्रिणी नसल्यामुळे मुलींशी नक्की काय बोलायचं हे याला माहितच नव्हतं. तो कायमच तिला तिच्या कामाबद्दल, सायकोलॉजीबद्दल प्रश्न विचारत असे आणि ती पण त्याला प्रश्नांची उत्तरं देत असे. तिच्या कामाच्या स्वरुपामुळे तिला याच्याबद्दल माहिती सरळच कळली आणि एवढ्या हुशार आणि सरळ मुलाशी आपल्याला इतक्या सहजच बोलता येत आहे याची तिलाही गंमत वाटत होती. चांगलं आयुष्य यापेक्षा वेगळं असूच शकत नाही यावर त्याचा ठाम विश्वास बसला होता.

पण मंदीचा फेरा कुणासाठीही थांबणार्‍यातला नव्हता. खर्चात कपात निलेशच्या कंपनीतही सुरू झाली होती. प्लास्टीकच्या वापरून फेकून देणाच्या कपांच्या जागी खरे, चिनीमातीचे कप आले होते. ऑफिसमधे कामाचे तास निश्चित केले होतेच, पण त्यापेक्षा जास्त वेळ थांबायला मनाई होती. शिवाय कामाच्या तासांमधे काय काय काम केलं हे दर शुक्रवारी लिहून द्यायला लागत होतं. चांगली गोष्ट एवढीच होती की काम मात्र खूपच रोचक होतं, डोक्याला चालना देणारं होतं. आणि ही नोकरी सोडायची तर पैशांची दुसरी सोयही होत नव्हती. नुकताच बाळसं धरू लागणारा श्रीराम आणि हृषीचा धंदाही जरा खंगल्यागत होत होता. त्या दोघांच्या पोटापाण्याची चिंता नव्हती एवढंच! आता मात्र या त्रिकूटाला पुन्हा आपले कॉलेजचे दिवस आठवू लागले. पुन्हा काहीतरी नवं प्रोजेक्ट मजेखातर करावं, त्यातून पैसे मिळाले तर ठीक नाहीतर अनुभवतरी मिळेल, असं त्यांच्या डोक्यात येऊ लागलं.

निलेशच्या कंपनीत मोबाईल्ससाठी गेम्स बनवत असत. श्रीराम आणि हृषी त्यावरून कायमच त्याची फिरकी घेत, पण या गेम्सच्या क्षेत्रात पैसा चिक्कार आहे आणि तेवढंच आव्हानात्मक काम करता येईल याची त्या तिघांना खात्री होती. कंपनीच्या पॉलिसीजमुळे काय प्रकारच्या गेमवर काम सुरू आहे हे सांगता येत नव्हतं, पण काय प्रकारचा गेम बनवावा हे या तिघांच्या डोक्यात येतही नव्हतं. जोपर्यंत चांगली कल्पना येत नाही आहे तोपर्यंत काही काम सुरू करता येत नव्हतं. पुन्हा एका शनिवारच्या पावसाळी रात्री तिघे जण निलेशच्या घरी बसले होते. गंमतीत एक फेरी मारून आल्यावर तिघेही भिजले. कपडे बदलून आल्यावर मग कॉफीची लहर आली. "काकूला उठवण्याऐवजी आज मीच कॉफी बनवतो", हृषी उठला. थोडं दूध आणि थोडी साखर 'ओटा'तीर्थी पडल्यावर कॉफी कपांमधे आली. गरमगरम कॉफी पोटात गेल्यावर मात्र तिघांनी झोपायचं ठरवलं. टी-पॉयवर तसेच कॉफीचे कप, सारखेचे दाणे, टाकून तिघंही डाराडूर झोपले आणि सकाळी आईने पोहे फोडाणीला टाकल्यावरच हाक मारली. आळोखेपिळोखे देत असताना श्रीरामला कालच्या टीपॉयवर माशा दिसल्या. त्याने हातात 'टाईम्स' घेऊन माशांवर एक हल्ला चढवला. माशी उडून गेली. मग निलेशला 'सकाळ' दिसला, आणि एक टार्गेट माशीही सापडली. इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि माशी उडून गेली. हृषी मात्र या कडे टक लावून पहात होता. "ए हृष्या, उठ की आता जागा हो जरा, किती वेळ असा मंदसारखा बघत रहाणार आहेस?"

हृषीने शांतपणे आपलं निरीक्षण सुरूच ठेवलं आणि हळूच म्हणाला, "सध्या सुरूवातीला हाच खेळ कंप्यूटरसाठी लिहिला तर?"

गोष्टीसाठी काही सत्य घटना, काही चित्रपटांच्या कथांचा काही भाग आणि माझी कल्पना यांची मिसळ केली आहे. याउप्पर कोणत्याही प्रकारचं प्रकाशित साहित्य कच्चा माल म्हणून वापरल्याचं लेखिकेच्या आठवणीत नाही.

पुढचा भाग पुढची सी.एल. घेईन तेव्हा!

Monday, April 27, 2009

(बहु असोत)

बहु असोत कणगीभर संपत्ती ही अहा
प्रिय अमुचा खाबुगिरी एक धर्म हा॥

गगनभेदी माया तरी पडते ती उणी
लोभाच्या सीमाही वाढती झणी
चटक एक रे पदाची सोडी ना क्षणी
माल मिळे म्हणूनी मी ही राजकारणी
मंत्र्यासी अटक गमे जेथ दु:सहा ॥ १॥

प्रासाद हा हवा अन हवी स्वमंदीरे
कार्यकर्त्यांची हीच भव्य भांडारे
रस्ता वा चौकासही नाव मम पुरे
"भेट"-गाठ हीच साफल्य-धून ठरे
शुद्ध नसे वर्तनही पण नसे मज तमा॥२॥

जात, धर्म आणि पंथ किती हव्या मिती
'फोडा अन राज्य करा' हीच तर निती
धर्म, न्याय याची नसे कधी अम्हा क्षिती
शक्ती, युक्ती एकवटूनी डाव साधती
पसरे मम भीती अशी विस्मया वहा॥३॥

गीत राजनीतीचे हे श्रवणी, मुखी असो
लक्ष्मी, कीर्ती, सत्ता फक्त स्वजनी ही ठसो
वचनी, लेखनीही स्वजनोद्धार हा दिसो
सतत 'उन्नती' हाच मंत्र अंतरी ठसो
देह पडो, मूर्ती असो ही असे स्पृहा॥४॥

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची मूळ कविता:

बहु असोत सुंदर संपन्न की अहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥

गगनभेदी गिरिवीण अणू नच जिथे उणे
आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवरी जेथिल त्या तुरगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय न दाविणे
पौरूषासी अटक गमे जेथ दु:सहा॥

प्रासाद कशास जेथ हृदय मंदीरे
सद्भावांचीच दिव्य भव्य आगरे
रत्ना वा मौक्तिकाही मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणी खनी ठरे
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा गृहा॥

विक्रम वैराग्य एक जागी नांदती
जरीपटका भगवा झेंडा ही डोलती
धर्मराज कारण समवेत चालती
शक्ती युक्ती एकवटूनी कार्य साधती
पसरे यत्कीर्ती अशी विस्मया वहा॥

गीत मराठ्यांचे हे श्रवणी मुखी असो
स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो
देह पडो तत्कारणी ही असो स्पृहा॥

Wednesday, April 22, 2009

भीषण सुंदर

कधी कधी एखादी गोष्ट डोक्यात पक्की बसून रहाते. ती खूप छान, सुंदर, अप्रतिम, या आणि तत्सम विशेषणांनी गौरवावी अशी असतेच असं नाही. कधीतरी असं वाटतं की ही फलाणी गोष्ट इतकी भुक्कड आहे की ते वाचून, पाहून, ऐकून हसू दाबता येत नाही आणि हे हास्य पसरवण्यासाठीही त्या टुकार गोष्टीला आपणच प्रसिद्धी द्यावी असं वाटतं. बर्‍याच दिवसांपासून डोक्यात एक नाच-गाणं आहे, अर्थातच हिंदी सिनेमातलं.इथे पहा ते! http://www.youtube.com/watch?v=sotm1QDsuV0&feature=related

आता सुरूवार करू या सुरूवातीपासूनच! तर सुरूवातील विजा चमकतात, पार्श्वभूमीवर एक बाई भेसूर हसते ज्यावर आपल्याला ना हसायला येतं ना रडायला! आणि मग दिसतो हा आपला हॅण्डसम हंक! कोण रे ते कोपर्‍यातून 'हा हंत, हा हंत' म्हणत आहे? त्याच्याकडे मी साफ दुर्लक्ष केलं आहे. तुम्ही पोरं राखी सावंत, मल्लिका शेरावत वगैरे ओंगळ बायकांना "सुंदर" म्हणता तेव्हा मी काही बोलते का? मग मी या बाब्याला, काय बरं याचं नाव... जे काय असेल ते, मी याला ठोंब्या म्हणणार. ठोंब्या हे माझं आवडत्या नावांपैंकी एक, मी लहान असताना आई मला ठोंबीच म्हणायची (वुडवर्ड्स ग्राईप वॉटरची जाहिरात आठवली का नाही?). तर हा, तर हा आपला हॅण्डसम हंक, ठोंब्या, हातात फूल ना फुलांचा गुच्छ घेऊन सुरूवात करतो, नाचायला हो! तुम्हीकाय समजलात, गाणं म्हणायला? नाही, ते ही करतो तो, पण थोडं उशीरा. आता या प्राण्याला हीरो का म्हणायचं? कारण हिंदी पिच्चरमधे नाच गाणं फक्त हीरोलाच असतं नाहीतर साईड हीरोला. पण ठोंब्या किनई एवढा सुंदर आहे की त्याला साईड हीरो कसं म्हणणार? शिवाय हिंदी पिच्चरमधे आख्खं गाणं फक्त साईड हीरो किंवा साईड हिरविणीवर 'वाया' घालवतात का? तर त्यामुळे आमचा सुंदर ठोंब्या या पिच्चरचा हीरोच आहे. आता या पिच्चरचं नावबिव आठवत नाही. पण नक्की घरी पाहिला असणार हासुद्धा पिच्चर!

मी बारावीत असताना घरी केबल घेतली. दुपारी मी आणि बाबा जेवायला बसायचो तेव्हाच फक्त टी.व्ही. पहायचो. कामांची विभागणी ठरलेली होती, म्हणजे बरीचशी कामं बाबाच करायचे. जेवण गरम करणे, माझी वाट बघणे, मी घरी येऊन, हात-पाय धुतले आणि बसले तशीच की एकदा मला 'कपडे बदलून घे' असा प्रेमळ, खरंच प्रेमळ हो, सल्ला देणे, मी कपडे बदलताना जेवण वाढणे, अशी सगळी कामं बाबा करायचे. मग मी ताटं घेऊन बाहेर आणायचे आणि आम्ही दोघे जमिनीवर स्थानापन्न व्हायचो. मग न चुकता आम्हाला आठवण व्हायची की टी.व्ही. बंद आहे, आणि रिमोट टी.व्ही. जवळच आहे. हे काम मात्र मीच करायचे, उठून मुख्य बटन लावणे आणि रिमोट बाबांच्या हातात देणे. ते अगदी प्रेमाने ही रिमोटचीही जबाबदारी घ्यायचे, पण नियम एकच, जो चॅनल सुरू असेल तो बदलायचा नाही. बर्‍याचदा रात्री जेवताना केबलचा चॅनल गाण्यांसाठी मीच पहायचे, तेव्हा तोच असायचा. आणि तिथे असे एकेक "उत्तम, उदात्त, उन्नत" पिच्चर असायचे. तो पर्यंत आमची पांढरू यायचीच तिथे! पांढरू म्हणजे आमची मांजर. तिच्याबद्दल एक स्वतंत्र लेखच लिहीला पाहिजे तेव्हा इथे लिहित नाही. पण मुद्दा असा की ती कुठेही असली तरी टी.व्ही. सुरू झाला की लगेच यायची ... माझ्या रक्षणाकरता! कारण आमचे हीरो, म्हणजे बाबा हो, चॅनल बदलू द्यायचे नाहीत. केबलवर असे महानआणि हुच्च पिच्चर सुरू असायचे आणि बाबांना त्याचा काही फरक पडायचा नाही. ते तल्लीन होऊन जेवायचे आणि दुसरीकडे मटातला अग्रलेख उघडायचे. तो झाला की इंडीयन एक्सप्रेसच्या अग्रलेखाचा नंबर लागायचा. तोपर्यंत भूक जागृत झालेली असायची त्यामुळे मी कधीच उठून टी.व्ही. बदलायचे कष्ट घ्यायचे नाही. शिवाय पांढरू आली की बाकीच्या जगाकडे कोण लक्ष देणार? एकतर प्रत्येक घास किमान ६४ वेळा चावला का नाही याची गणती करायची, पांढरूला पोळी बळेबळे भरवायची, ती पाठीला पाठ घासायला लागली की तिला धक्का द्यायचा असे खेळ चालायचे. मग टी.व्ही. बॅकग्राऊंडला सुरू आणि आम्ही दोघं आपापल्या विश्वात रमून जेवायचो. तर मुद्दा (मी विसरले नाही आहे मुख्य विषय काय आहे ते!) असा की टी.व्ही. मधूनच पहायचा, एखादा खडा आला चुकून, किंवा तिखट लागलं तर विश्वातून बाहेर यायला लागायचं तेवढाच. तर मी तेव्हा नक्की हा पिच्चर पाहिला असणार. पण तेव्हा मला आजच्याएवढी (तरी) सौंदर्यदृष्टी नसल्यामुळे मी तेव्हा या पिच्चरकडे आणि मुख्य म्हणजे ठोंब्याकडे दुर्लक्ष केलं असणार. असो.

तर ... मी असं म्हणत होते, की सुरूवातीला वीजा चमकल्यावर हा ठोंब्या अचानक दिसतो एका बागेत आणि गंमत म्हणजे हवा एकदम मस्त! अहो, क्षणाक्षणाला बदलणार्‍या हवेसाठी प्रसिद्ध असणार्‍या सायबाच्या देशातही एवढ्या चटकन हवा बदलत नाही. अर्थात पापणी लवायच्या आत मुंबैहून मिलानला जाणार्‍या लोकांसाठी हवा बदलणं म्हणजे नक्कीच 'किस झाड की पत्ती' असणार! तर तिथे दिसतो आपला ठोंब्या, एका बागेत, एका फोटोबरोबर, त्याच्या
बर्‍यापैकी किंचितशा सुटलेल्या ढेरीपोटासकट! आणि मग गाणंही सुरू होतं, "जब से हुई है मुहोब्बत, तब से हुई ..." नाही, माझं गाण्याच्या बोलांकडे लक्षच गेलं नाही. माझं सगळं लक्ष होतं ठोंब्याकडे! काय सुंदर नाच बसवला आहे या गाण्यावर! मला एकदम आमच्या शाळेच्या गॅदरिंगची आठवण झाली. एका वर्षी वानखेडे (का वानरवेडे?) सरांनी एक "डॅन्स" बसवला होता त्याची; गाणं होतं,
हिवर पिवर पिवर पी हिवर पिवर पिवर पी।
पायात पैंजण मी घातलेले, जशी पायमोडी, पायमोडी करणारी ।
असं काहीसं! मी एकदम माझ्या बालपणाच्या 'रम्य' शालेय आठवणीत बुडून गेले. पोहोता येत नाही आठवल्यावर त्या आठवणींतून सरळ पुन्हा गाणं पहायला लागले. तर हा भाई एकदम गडाबडा लोळायला लागला, उठाबशा काय काढायला लागला, गोलगोल काय फिरायला लागला, 'बार' डान्स काय करायला लागला, आहाहा... आणि मग आली एक बया, केशरी ड्रेसवाली, मी तिच्याकडे फारसं पाहिलं नाही. त्या दोघांनी काही नाचायचा प्रयत्न केला.

आता मात्र हसू असह्य झालं; ऑफिसमेट उठून माझ्या डेस्कपाशी आला. मी हेडफोन काढले आणि त्याने लगेच कानावर चढवले. गाणं आणि 'नाच' संपूर्ण पाहूनच त्या स्थितप्रज्ञ माणसाने शांतपणे हेडफोन काढले आणि म्हणाला, "कल के लंच मे मराठी मेन्यू है, तुम्हारा चॉईस क्या है, अळूकी भाजी का मेथी-दाल?"

आता अगदीच भंकसः

एवढं सगळं इथे लिहिताना माझ्या डोक्यात आणखी एक विचार येऊन गेला, आत्तापर्यंत कधीच माझा पहिला नंबर आला नाही, अगदी कुठ्ठे नाही. तेव्हा या भयंकर सुंदर व्हीडीओबद्दल ब्लॉगपोस्ट लिहिणारी मी पहिलीच नसणार. शोधून पहायला पाहिजे!

मला हा व्हीडीओ अनेकांना दाखवायचा आहे. एका वेळेला सगळी नावं आठवतील असं नाही. शिवाय काम करून खूप कंटाळा आला तर हा व्हीडीओ फार मोठी करमणूकही करेल. तर बुकमार्क टाकण्यापेक्षा एक ब्लॉग लिहून ठेवलेला काय वाईट? दिसामाजी काहीतरी(च) ते लिहावे।

Tuesday, April 21, 2009

Beauty and brains

They always says "beauty never comes with brain" or "while choosing your partner, don't look at the beauty". I sometimes wonder why is beauty always compared with brains. Are these two related at all? I think yes, none are under one's control. Well, these days one can undergo a plastic and/or cosmetic surgery and try to be "more beautiful", but let us forget that for a moment. Both beauty and brains are there by birth and one cannot control either. There is some similarity. Why are they considered different then?

Brain is always with you (if you have a non-zero initial value for that!), that is something one can trust upon; again there are some exceptions, like people suffering from dementia, Alzheimer's disorders etc, but that is not (yet!) a big fraction of the society. So whatever inherited is always there when we talk about brains. But that is not really true about beauty. The so called beauty cannot stand aging. Again there are exceptions, but not a lot! That is the reason brains get more votes to beauty!

These thoughts matter when one wants to choose a partner for life (marriage). My choice, I chose a brainy guy who is handsome too!

On a lighter note: What if there are more beautiful people casting their votes compared to brainy ones?

My sincere thanks to two friends, from their conversation I started to think about this.

Monday, April 6, 2009

(मी एकदा चहा केला)

प्रेरणा

काल अचानक डोक्यात आले
चहा बनवून पाहू वाटले

चहा बनवायला लागतेच काय?
चहा, साखर अन थोडीशी साय

भरकन जाऊन खरेदी केली
आधणासाठी छोटी पातेली घेतली

आधी काकूला फोन केला
चहाचा चमचा (किती मोठा) विचारून घेतला

हाय! मांजर आडवं गेलं
दूधच सगळं नासकं निघालं

शोधाशोध करून झाली
दुकानदारांनी नन्ना केली

काय करावं मला समजेना
चहाची तल्लफ शांत बसू देई ना

कपाट सगळं एकदा उचकटलं
एक्स्पायरी उलटलेलं बिस्कीट मिळालं

शेवटी मिल्कमेडचा डबा सापडला
चहाचा पाठलाग सुरू झाला

पातेली घासून सुरूवात केली
आधण आणि साखर मोजली

तेव्हाच उतावळेपणा नडला
मिल्कमेडच्या डब्ब्याला हात लागला

मिल्कमेडच्या डब्यानं नाक घासलं
जमिनीवर पावडरचं साम्राज्य झालं

जाम वैतागून रंगभेद विसरले
काळ्या चहाच्या नादाला लागले

माझंच कर्म, आडवंच आलं
साखरेऐवजी मीठच घातलं

तोंडात घातलेलं घशाशी आलं
चहानं माझं नाकच कापलं

शेवटी सगळा नाद सोडला
सगळा पसारा नीट आवरला

आज जरा विचार केला
जरी कालचा बेत फसला

काय घडले तेच सांगावे
विडंबनरुपाने सादर करावे

आता हे विडंबन संपवते
पोळ्या लाटायला आत जाते

Followers